भारतातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था (भाग – २)
तृतीय स्तर : या स्तरावर वैशिष्टय़पूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध केल्या जातात. येथे हृदयरोग, मेंदूरोगावर उपचार सेवा उपलब्ध असतात. उदा. (AIIMS नवी दिल्ली)
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम (National TB Control Programme) :
क्षयरोगाचे नियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणी राष्ट्रीय स्तरावर देशात १९६२ सालापासून करण्यात आली. मात्र, यात अजूनही अपेक्षित यश न मिळाल्याने केंद्र सरकारने सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम हाती घेतला (Revised National TB Control Programme)या सुधारित कार्यक्रमात लागण झालेल्या रुग्णांना DOTS (Directly Observed Treatment Short Course)) द्वारे तपासणी केली जाते आणि रुग्ण पूर्ण बरा होईपर्यंत त्याच्यावर उपचार केले जातात. उपचार पद्धतीची अंमलबजावणी देशात २६ मार्च १९९७ पासून करण्यात आली.
बहुऔषधी प्रतिकारक्षम क्षयरोग (MDR – TB) : क्षयरोग बरा करण्यासाठी जी DOT पद्धती वापरली जाते किंवा तो बरा करण्यासाठी जी औषधे वापरली जातात, त्या औषधांना वेगवेगळ्या कारणांपायी काही रुग्णांमधील क्षयरोगाचे विषाणू दाद देत नाहीत. त्यांनी या औषधांविरुद्ध प्रतिकारक्षमता विकसित केली आहे, असे या प्रकारच्या क्षयरोगाला असे म्हटले जाते. अशा प्रकारच्या क्षयरोगावर नियंत्रण मिळवणे हे भारतीय वैद्यकीय पद्धतीसमोर मोठे आव्हान आहे. शासनाने क्षयरोग नियंत्रणासाठी २०१२ ते २०१७ हा व्यूहरचनात्मक दृष्टिकोन स्वीकारला आहे. त्याद्वारे क्षयरोग उपचार सुविधा सर्वांपर्यंत पोहचवणे हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, पक्षाघात निवारण व नियंत्रण कार्यक्रम : जर भारताचा विचार केल्यास वरील आजारांमुळे ओढवणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देशात सुमारे ४० टक्के आहे. हे आजार ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांत आढळून येतात. आज भारतात उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग व पक्षाघात यांचे प्रमाण वाढलेले आढळते. यासाठी उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने २०१०-२०११ पासून (NPC DCS) हा कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमाचा प्रमुख भर आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये बळकटी आणणे तसेच या आजारांच्या संदर्भात लवकरात लवकर निदान व उपचार करणे हा कार्यक्रम सध्या २१ राज्यांमधील १०० जिल्ह्यांमध्ये राबवला जात आहे. या योजनेत खर्चाचे गुणोत्तर केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात ८०:२० असे आहे. वरील १०० जिल्ह्यांपकी प्रत्येक ठिकाणी हृद्रोग जडलेल्यांसाठी एक स्वतंत्र युनिट स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी जीवन सुरक्षा औषधांचा पर्याप्त साठा केला जाईल. याशिवाय कर्करोगाच्या निदानासाठी प्राथमिक व अत्यावश्यक शस्त्रक्रिया, केमोथेरपीसारखे उपचार उपलब्ध करून देण्यात येतील. कर्करोगाच्या निदानासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा तसेच मॅमॉग्राफीची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. केमोथेरपीच्या रुग्णांना औषधोपचारांची सुविधा उपलब्ध असेल.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान : उद्दिष्ट- सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात खर्च केली जाणारी रक्कम दरडोई उत्पन्नाच्या दोन ते तीन टक्क्य़ांपर्यंत नेणे हा या योजनेचा महत्त्वाचा उद्देश होता. हा कार्यक्रम देशभरातील ग्रामीण जनतेला परिणामकारक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी- विशेषत: ज्या राज्यांमध्ये आरोग्यसेवांचा अभाव आढळतो, त्यांच्याकरता आखण्यात आली आहे.
अभियानाअंतर्गत कार्यक्रम : = कुटुंबकल्याण कार्यक्रम = जननी सुरक्षा योजना = सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम = शालेय आरोग्य कार्यक्रम = सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम = राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम = राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रम तसेच हिवताप, हत्तीरोग, मेंदू ज्वर, चिकनगुणीया इ. रोगांच्या उपचार व नियंत्रणासाठी देशात कार्यक्रम राबवणे. या कार्यक्रमांतर्गत आशा ((ASHA) स्वयंसेविका योजना राबविण्यात येते.
आशा स्वयंसेविकेचे कार्य : माता व बाल आरोग्याविषयी गावातील स्त्रियांमध्ये प्रबोधन करणे, प्रसूतीपूर्वी तपासणी, लसीकरण, स्तनपान, लोहयुक्त गोळ्या इ. माहिती मातांना देणे, आरोग्य संस्थेतील प्रसूतींमध्ये वाढ करणे. गेल्या सात वर्षांचा आढावा घेतला तर असे लक्षात येते की, ‘एनआरएचएम’ कार्यक्रमाने देशाच्या आरोग्य क्षेत्रात मोठा बदल घडवला आहे.
डॉ. जी. आर. पाटील -grpatil2020@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व उपक्रम बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta mpsc guidence