– मृण्मयी पाथरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोनेक आठवडय़ांपूर्वी ‘गेहराईयाँ’ हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. आतापर्यंत आपल्यापैकी काही जणांनी हा चित्रपट कदाचित पाहिला असेल किंवा किमान या चित्रपटाचं विश्लेषण तरी वाचलं/ ऐकलं असेल. कोणत्याही चित्रपटात असतात अशा काही उणिवा आणि बॉलीवूड चित्रपटांतील नेहमीचा मसाला याही चित्रपटात आहेच. मात्र त्याचबरोबर मानसिक आरोग्याचे अनेक संदर्भही आहेत. चित्रपटाचा नुसता ट्रेलर पाहिला तरी यात फिजिकल चीटिंगव्यतिरिक्त अजून कोणती समस्या आहे, असा प्रश्न चित्रपटप्रेमींना पडू शकतो. आणि त्यांच्या या वाटण्यात काही अंशी तथ्यही आहे. कारण या चित्रपटातील व्यक्तिरेखा जशा वरवर दिसतात, त्या तशा नसून त्यांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू यात आहेत.

मूल जन्माला येतं तेव्हा या जगात कसं वावरावं आणि इतरांशी कसं वागावं याचे काही ठोकताळे त्याला माहिती नसतात. आपल्या आसपासची मोठी माणसं (उदाहरणार्थ, आपले आई-बाबा, आजी-आजोबा वगैरे) एकमेकांशी कसे वागतात, आपल्या भावना कशा प्रकारे व्यक्त करतात, आयुष्यातील निर्णय कसे घेतात, मतभेद आणि भांडणांना कशा पद्धतीने सामोरे जातात अशा अनेक गोष्टींचं ते मूल निरीक्षण करत असतं. कालांतराने त्यांच्या काही सवयी, वागण्या-बोलण्याची रीत, व्यक्त होण्याचे मार्ग आपल्याही कळत-नकळत अंगीकारत असतं. आपल्या आजूबाजूला असलेल्या या मंडळींचं ते अनुकरण करू लागतं.  

‘गेहराईयाँ’मधील दीपिका पादुकोण हिने साकारलेली व्यक्तिरेखा- अलिशा हीसुद्धा घरच्यांच्या वागण्या-बोलण्याचं लहानपणापासून निरीक्षण करत आलेली आहे. आपल्या आई-बाबांचे वाद, सततच्या भांडणांमुळे बाबांची होणारी चिडचिड, आईला सभोवती माणसं असूनही वाटणारं एकाकीपण, त्यातून आयुष्य एका टप्प्यावर येऊन जणू थबकलंय अशी तिच्यात निर्माण झालेली भावना, ती व्यक्त करूनही इतरांकडून मानसिक आणि भावनिक आधार न मिळणं आणि त्यातून आपल्याला कोणीच समजून घेत नाही या उद्विग्नतेतून आलेली वैफल्यग्रस्तता.. या घुसमटीतून आपली सुटका व्हावी म्हणून तिने स्वत:ला करून घेतलेली दुखापत.. या सगळय़ाची छाया अलिशावर न पडती तरच नवल.

 आई-बाबा विभक्त होण्याच्या मार्गावर असताना आपण नक्की कोणाची बाजू घ्यायची? एकत्र राहून त्यांच्यातले मतभेद आणि वाद कधीच संपणार नसतील तर आपण त्यांची भांडणं संपवायला काय करायला हवं? सभोवताली इतकी माणसं असूनही आईला एकटं, एकाकी वाटतंय म्हणजे नक्की काय होतंय? तिचं बाबांसोबत पटत नसलं तरी मी आहे ना तिच्यासोबत? मूल म्हणून माझं कुठे काही चुकतंय का? हे घर तुटण्यापासून वाचवण्यासाठी मी नेमकं काय करायला हवं? माझ्यावर खरंच आई-बाबा प्रेम करतात का? आणि जर ते माझ्यावर प्रेम करू शकत नसतील तर इतर कोणी कसं माझ्यावर प्रेम करेल? इतरांचं सोडा, पण मी तरी स्वत:वर प्रेम करू शकेन का? आपल्या मनात काय घालमेल चालली आहे हे कुणाला सांगूनही आपल्याला मानसिक आधार मिळू शकत नसेल तर आपल्या भावना व्यक्त करून काय उपयोग, असे अनेक उलटसुलट विचार लहानग्या अलिशाच्या मनात कदाचित आलेही असतील. या विचारांच्या कोलाहलात वाढलेल्या अलिशाने मग मोठेपणी तिच्या नात्यात पटत नसतानाही बरीच तडजोड केली.

अलिशाच्या आणि तिच्या आईच्या जीवनात अनेक समान धागे आढळतात. दोघींच्याही नात्यांत आलेला दुरावा आणि एकलेपण दूर करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड, एका नात्यात घुसमट झाल्यामुळे दुसऱ्या नात्याकडे वाढत गेलेली त्यांची ओढ आणि या असह्य ताणतणावाचा सामना करताना वैफल्यग्रस्ततेतून त्यांनी स्वत:ला इजा करणं किंवा आयुष्य संपवण्यासाठी पाऊल उचलणं.. लहानपणीच्या या अनरिझॉल्व्हड जनरेशनल ट्रॉमामुळे (unresolved generational trauma) मोठेपणी नव्या नात्यांची सुरुवात करताना, ती निर्माण करताना, बहरवताना आणि  निभावताना अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.

कित्येकदा लहानपणी अनुभवलेल्या अशा गोष्टी लहान मुलांना अकाली प्रौढ होण्यास भाग पाडतात. या अनुभवांमुळे त्यांचा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. आपल्या घरात होणारी भांडणं आपल्यामुळेच होत आहेत असा समजही काहींच्या मनात निर्माण होतो. त्यातून मग काही जण माणसांपासून जितकं दूर राहता येईल तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करतात. नात्यातले नस्ते गुंते आणि त्यातल्या ताणतणावांचा सामना करण्यापेक्षा आयुष्यात नाती कमीच असलेली बरी असंही काहींना वाटू लागतं. अगदी आयुष्यात आलेले सुखाचे क्षण अनुभवतानाही त्यावर दु:खाचं सावट पडेल की काय अशी भीती त्यांच्या मनात दाटून येत असते. त्यातून मग कधी कधी लग्नसंस्थेवरचा विश्वासही उडतो, तर काही जण आपल्या जोडीदारासोबत होणाऱ्या लहानसहान दुमतांनाही कधीच न संपणारी भांडणं समजून नातं संपवण्याचा विचार करतात. अशांच्या बाबतीत बऱ्याचदा अगदी आपल्या अपेक्षांप्रमाणे जोडीदार मिळाला/ मिळाली तरीही त्यांच्या गुणांपेक्षा दोषांकडेच जास्त लक्ष केंद्रित केलं जातं.

लहानपणीच्या घरातील समस्यांमुळे किंवा आधीच्या नात्यांत खाल्लेल्या खस्तांमुळे आपण पुन्हा नव्या नात्यात दुखावले जाऊ नये म्हणून आपल्याभोवती काही जण मग एक अदृश्य मानसिक भिंत उभी करतात. त्यामुळे आपल्या जोडीदाराला आपल्याला त्याचं वा तिचं काय पटतं किंवा पटत नाही हे सांगण्याऐवजी त्यांच्यापासून अलिप्त राहणंच पसंत केलं जातं. या माणसांनी स्वत:भोवती उभारलेल्या या संरक्षक भिंतीला तडा देऊन ती नाहीशी करण्यासाठी धडपडणाऱ्यांना खूप कष्ट घ्यावे लागतात. या व्यक्तींना आपलंसं करण्यासाठी जोडीदाराने किंवा इतर माणसांनी कितीही धडपड केली तरी त्यांच्यासमोर ‘व्हल्नरेबल’ (vulnerable) होणं यापैकी बऱ्याच जणांना अवघड जातं. अशी व्यक्ती आतून कितीही दु:खी आणि असमाधानी असली तरी त्याची कारणं समोरच्या व्यक्तीजवळ स्पष्ट करता न आल्याने ती व्यक्ती खूप भाव खाते आहे किंवा नखरे करीत आहे असा गैरसमजही निर्माण होऊ शकतो. अशात कधी कधी गोष्टी फार ताणल्या गेल्याने नाती तुटूही शकतात. 

आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या भूतकाळाचं गाठोडं घेऊनच जगत असतो. हा लेख केवळ अलिशा आणि तिच्या आईच्या भावभावनांवर प्रकाश टाकत असला तरी त्यांच्या आजूबाजूची इतर मंडळीही (अगदी त्यांचे जोडीदारसुद्धा!) त्यांच्या जीवनातील समस्यांना आपापल्या परीने तोंड देत असतातच. फक्त प्रत्येकाची त्यांच्या समस्यांना सामोरं जाण्याची पद्धत वेगवेगळी असते, एवढंच. यातील काही पद्धती आपल्याला पटतात किंवा पटतही नाहीत. परंतु आपलं आणि इतरांचंही आयुष्य कधीच ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट नसतं, नाही का? त्यामुळे चीटिंग करणाऱ्या व्यक्तीकडे सतत मॉरलिस्टिक (moralistic) आणि जजमेंटल (judgemental) दृष्टीने पाहण्यापेक्षा त्यांना ‘सेल्फ सबोटेजिंग’ (self- sabotaging) पद्धती न वापरता मानसिक समस्यांना सामोरं जाण्यासाठी आपण बळ दिलं तर..?

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man spandane author mrunmayi pathare depths of relationships bollywood movies actor actress drama ysh