संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात गाजलेल्या माढा तालुक्यातील हणमंत आतकर खून खटल्यात सर्व पाच आरोपींना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरविले असून फाशीच्या शिक्षेबाबत उद्या मंगळवारी सुनावणी ठेवली आहे.
गणेश हणमंत घुगे (वय ३०), अमोल अरूण उकरंडे (वय २८), जितेंद्र मोहन वाल्मीकी (वय २८), रवी ऊर्फ लाल्या सुरेश लेंगरे (वय २७, रा. कुर्डूवाडी, जि. सोलापूर) व दादा ऊर्फ प्रवीण सतीश पवार (वय ३०, रा. मांजरी, हडपसर, जि. पुणे) अशी दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मृत हणमंत आतकर यांचे अपहरण करून त्यांचा खून केला व नंतर गुन्ह्य़ाचा पुरावा नष्ट क रण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा या सर्व आरोपींनी केल्याचे न्यायालयात सिध्द झाले आहे. अतिरिक्त न्यायधीश व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयाने या सर्व दोषी आरोपींना फाशी की जन्मठेप, यापैकी कोणती शिक्षा द्यावी याची सुनावणी उद्या मंगळवारी निश्चित केली आहे.
या खटल्याची पाश्र्वभूमी अशी की, माढा तालुक्यातील बारलोणी येथे महात्मा ज्योतीराव फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष हणमंत नवनाथ आतकर गुरुजी (वय ४५) यांचे दि. २५ जून २००८ रोजी कुर्डूवाडी-बारलोणी रस्त्यावरून अपहरण करण्यात आले होते. कुर्डूवाडी येथील शिवलाल शहा यांच्या डाळिंबाच्या बागेत आतकर गुरुजींना डांबून ठेऊन त्यांच्यामार्फत म. फुले पतसंस्थेचे सचिव सोमनाथ आतकर यांना फोन करावयास भाग पाडून दहा लाखांची खंडणीची रक्कम उकळण्यात आली होती. नंतर आतकर गुरुजींचा दोरीने गळा आवळून खून करून त्यांचा मृतदेह वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मदनवाडी येथील पुलाखाली फेकून देण्यात आला होता. यावरून दि. २७ जून २००८ रोजी वालचंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुध्द खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
दरम्यान, म. फुले पतसंस्थेचे सचिव सोमनाथ आतकर यांनी हणमंत आतकर यांच्याबाबत कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दाखल केली होती. यात स्थानिक पोलीस तपास करीत होते. तपासात प्रथमदर्शनी खंडणीची दहा लाखांची रक्कम घेण्यासाठी आलेली दादा शिंदे नामक व्यक्तीजवळ ९८२२७४५२३९ या क्रमांकाचा मोबाइल असल्याचे निदर्शनास आले. तसेच सचिव सोमनाथ आतकर यांनी दहा लाखांची रक्कम दादा शिंदे यास देत असताना स्वत:च्या मोबाइलच्या कॅमेऱ्यातून त्याचे छायाचित्र टिपून छायाचित्रणही केले होते. यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे त्या दिशेने फिरविली असता मृत आतकर व आरोपी तथा साक्षीदार यांचे मोबाइल कॉल डिटेल्स मिळाले. यात सर्व आरोपींचा गुन्ह्य़ामध्ये सहभाग आढळून आला.
पोलिसांनी तपासाला आणखी वेग दिला असता आरोपींचा ठावठिकाणा कुर्डूवाडी परिसरात लागत नव्हता. हे आरोपी एमएच १३ बी-२२२७ या क्रमांकाच्या इंडिगो कारमधून फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी नियंत्रण कक्षाद्वारे राज्यातील सर्व पोलीस यंत्रणेला माहिती कळवून आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा ठाणे जिल्ह्य़ातील रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहपाडा येथे सहायक पोलीस निरीक्षक एस. डी. हजारे यांनी आरोपी गणेश हणमंत घुगे, अमोल उकरंडे व दादा ऊर्फ प्रवीण पवार यांना इंडिगो कारसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा सिमकार्ड, रोख रक्कम, कॅमेरा व कपडय़ांचे जोड हस्तगत करण्यात आले.
या गुन्ह्य़ाचा तपास वालचंदनगर पोलिसांनी पुढे चालू करून आरोपींकडून गुन्ह्य़ाची कबुली घेतली. मृत हणमंत आतकर यांचे अपहरण केल्याचे व त्यांचा खून केल्याचे व खून केल्यानंतर मृतदेह टाकल्याचे ठिकाण आरोपींनी दाखविले. नंतर हा गुन्हा कुर्डूवाडी पोलिसांकडे वर्ग झाला. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी पुढील तपासाची सूत्रे घेतली. यात आरोपी गणेश घुगे याने खंडणीच्या रकमेपैकी एक लाख रुपये आपला भाऊ समाधान घुगे यास दिल्याचे तसेच एक लाख ९५ हजार पिंपळ खुंटे येथील त्याची मावशी शोभा देवकर हिच्याकडे दिल्याचे सांगून गुन्ह्य़ामध्ये वापरलेली दोरी व मृत आतकर गुरुजींच्या मोटारसायकलची चावी काढून दिली. तर आरोपी अमोल उकरंडे याने आतकर गुरुजींना धाक दाखविण्यासाठी वापरलेला कोयता व खंडणीची सहा लाखांची रक्कम शिवलाल शहा यांच्या डाळिंबाच्या बागेत जमिनीत पुरून ठेवलेली काढून दिली. आतकर गुरुजींचा खून करताना त्यांच्या तोंडाला लावलेली चिकटपट्टीही आरोपींनी काढून दिली.
पुढील तपासात दि.५ सप्टेंबर २००८ रोजी आरोपी दादा ऊर्फ प्रवीण पवार याची माढा तहसीलदार यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार ओळख परेड घेतली. दादा पवार हा खंडणीची रक्कम घेण्यासाठी म. फुले पतसंस्थेत आला होता. ओळख परेडमध्ये सात-आठ साक्षीदारांनी त्यास ओळखले. तर दि.१७ सप्टेंबर २००८ रोजी साक्षीदार सोमनाथ आतकर याने पोलिसांना मोबाइलमधून दादा पवार याचे छायाचित्रण केल्याची सीडी दिली. तपासाअंती ३० सप्टेंबर २००८ रोजी सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी सर्व आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हारून शेख यांनी आरोपींविरुध्द फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १७३ (८) प्रमाणे जादा पुरावा न्यायालयात सादर केला.
या खटल्यासाठी सरकारतर्फे कामकाज पाहण्यासाठी अॅड.मिलिंद थोबडे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली. या खटल्याच्या सुनावणीत विशेष सरकारी वकील मिलिंद थोबडे यांनी एकूण ४३ साक्षीदार तपासले. ही सोलापूरच्या न्यायालयीन इतिहासात उल्लेखनीय बाम समजली जात आहे. यात साक्षीदार तथा मृत हणमंत आतकर यांच्या पत्नी चंदाराणी आतकर यांच्यासह सोमनाथ आतकर, संतोष शेलार, वैद्यकीय अधिकारी, आयडिया व एअरटेल कंपनीचे नोडल्स अधिकारी तसेच पोलीस तपास अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली. अंतिम युक्तिवादामध्ये अॅड. थोबडे यांनी सरकार पक्षाने सदरच्या परिस्थितीजन्य पुराव्याच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सकृतदर्शनी पुरावा असल्याचे न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने संसदेवरील हल्ला व लाल किल्ल्यावरील हल्ल्यातील आरोपींविरुध्द दिलेले निवाडे सादर केले. विशेष सरकारी वकील मिलिंद थोबडे यांना सहायक म्हणून अॅड. राजकुमार म्हात्रे, अॅड. अभिजित इटकर यांनी काम पाहिले. तर आरोपींतर्फे अॅड. श्रीकांत जाधव यांच्यासह अॅड.जगदीश परदेशी, अॅड.रझाक शेख, अॅड. व्ही. डी. फताटे, अॅड.विद्यावंत पांढरे यांनी बाजू मांडली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2012 रोजी प्रकाशित
हणमंत आतकर खून खटल्यातील सर्व पाच आरोपी न्यायालयात दोषी
संपूर्ण सोलापूर जिल्ह्य़ात गाजलेल्या माढा तालुक्यातील हणमंत आतकर खून खटल्यात सर्व पाच आरोपींना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने दोषी ठरविले असून फाशीच्या शिक्षेबाबत उद्या मंगळवारी सुनावणी ठेवली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 20-11-2012 at 03:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hanmant aatkar murdered case five arrested are find convict in court