नगर शहरात गेल्या २५ वर्षांपासून नेतृत्व करणारे परिपक्व नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे, केवळ भावनिक राजकारण करून लोकांची दिशाभूल केली जाते आहे, आपणही त्याला भुलून मतदान करत आहोत, लगतची शहरे विकसित होत असताना नगर मागे का याचा विचार करण्याची वेळ आली आहे, एकदा गेलेली वेळ परत येत नसल्याने नगरकरांनी वेळीच निर्णय घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत लोढा यांनी केले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने प्रभागवार बैठका घेण्यास सुरुवात केली आहे, प्रभाग ३९ मध्ये आयोजित केलेल्या बैठकीत लोढा बोलत होते. मनपाच्या आगामी निवडणुकीत मनसे सर्वच जागांवर उमेदवार उभे करणार आहे, त्यांना निवडून दिल्यास राज ठाकरे यांना अभिप्रेत असलेला कायापालट शहरात घडेल, असेही लोढा म्हणाले.
प्रत्येक प्रभागातील प्रश्नांसाठी समिती स्थापन केली जाणार असल्याचे जिल्हा संघटक सचिन डफळ यांनी सांगितले. शहर उपाध्यक्ष नितीन भुतारे, विनोद काकडे, गणेश शिंदे, अशोक दातरंगे, भंडारी आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No progress in city due to immature leadership