अनेक दिवसांपासून सुरु असणारी पावसाची संततधार गुरूवारपासून वादळी वा-यांच्या साथीने कोसळत असलेल्या धुवाधार आषाढ सरी, तुडुंब भरलेली भात खाचरे, दुथडी भरुन वाहणारे ओढे नाले, जलमय झालेला परिसर, वातावरणातील बोचरा गारवा यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुळा-भंडारदरा पाणलोट क्षेत्रात धुव्वाधार पर्जन्यवृष्टी सुरु असून रतनवाडी येथे २४ तासात १६० मि.मी पाऊस पडला. मुळा नदीच्या पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली असून तालुक्याच्या उत्तर भागातील आढळा धरणातही नव्याने पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. बदगी बेलापूर ९४.५० दलघफू, सांगवी ७२ दलघफू, घोटी शिळवंडी १४६ दलघफू हे लघु पाटबंधारे तलाव आज भरुन वाहू लागले. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ७१ टक्के झाला आहे.
काल दुपारपासून कळसुबाई, रतनगड, हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगात मुसळधार पाऊस सुरु आहे. आज दिवसभर या परिसरात अंतराअंतराने जोरदार आषाढ सरी कोसळत होत्या. भंडारदरा धरणात दिवसभराच्या बारा तासात ४१७ दलघफू नवीन पाणी आले. सायंकाळी भंडारद-याचा पाणीसाठा ७ हजार ८५८ दलघफू झाला होता. निळवंडे धरणातही दिवसभरात साडेतीनशे दलघफू पाण्याची भर पडली. निळवंडेचा पाणीसाठा १ हजार ९०६ दलघफू झाला आहे. तालुक्यातील बोरी तलावाचा अपवाद वगळता अन्य सर्व लघुपाटबंधारे तलाव भरुन आता वाह लागले आहेत.
पाणलोट क्षेत्रात पडत असणा-या पावसामुळे पश्चिम भागातील भात खाचरे, ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत. आकाशातून सातत्याने बरसणा-या आषाढ सरी, जलमय झालेला परिसर, ओढय़ानाल्यांना आलेले पाणी, सकाळ-संध्याकाळ धुक्यात हरवणारी पर्वतशिखरे, तापमानात झालेली कमालीची घट, पावसाच्या बरोबरच कालपासून वाहत असणारे जोरदार वारे यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Jul 2013 रोजी प्रकाशित
वादळी वा-यामुळे परिसर गारठला
धुवाधार आषाढ सरी, तुडुंब भरलेली भात खाचरे, दुथडी भरुन वाहणारे ओढे नाले, जलमय झालेला परिसर, वातावरणातील बोचरा गारवा यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

First published on: 27-07-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surrounding freezes due to stormy winds