डॉ .स्मिता प्रकाश जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकदा घटना मनाविरुद्ध किंवा मनाप्रमाणे घडली नाही की अनेकजणी नशिबाला दोष देत राहातात आणि नाराज, वैताग, चिडचिड, संताप या नानाविध नकारार्थी भावनांना गोंजारत बसतात. तसं करण्याने परिस्थिती बदलत नाही, मग अशावेळी आहे ती परिस्थिती कशी स्वीकाराल?

 “विमलबाईचं हे नेहमीचंच आहे, घरात सणवार असले, माझ्याकडं कुणी येणार असलं की हिची दांडी ठरलेली असते. सरला तर आठ दिवसांची सुट्टी घेऊन तिच्या गावाला गेली आहे, घरात दोन बायका कामाला ठेवल्या आहेत, पण माझ्या मदतीला कुणीही नाही. शेवटी, आपला हात जगन्नाथ म्हणायचं आणि कामाला सुरुवात करायची, माझं नशीब असंच आहे, माझ्या आयुष्यात जेवढे कष्ट आहेत तेवढे मला करावेच लागणार, सर्वजण येण्यापूर्वी घरातील सजावट करून छान तयार होण्याचं मी ठरवलं होतं, पण कसलं काय? सर्व वेळ किचनमध्येच जाणार, निवांतपणा माझ्या नशीबातच नाही.”

स्वयंपाक करता करता कामिनीची बडबड चालू होती. गौरी गणपतीच्या सणाला किमान २५ पाहुणे तरी तिच्याकडे जेवायला असायचे आणि अशा वेळेस कामवाल्या बायकांनी अचानक सुट्टी घेतली तर चिडचिड होणार हे साहजिकच होतं. तिची मैत्रीण सुमित्रा तिचं हे स्वगत ऐकत होती.

हेही वाचा >>> मोटार अपघाताबाबतच्या सुरक्षा टेस्टिंगमध्ये स्त्री डमी वापरूनही अभ्यास!

कोणतीही गोष्ट मनाविरुद्ध घडली तर लगेचच स्वतःच्या नशिबाला दोष देत बसायचं हे तिचं नेहमीचंच होतं. मध्यंतरी त्यांचा सर्व ग्रुप ट्रेकिंगला गेला होता, त्या दिवशी मध्येच तिचा पाय मुरगळला आणि ती ठरवलेल्या ठिकाणी पोहचू शकली नाही तेव्हाही ती सुमित्राला म्हणाली, “इतके दिवस तुमच्या सर्वांसोबत ट्रेकिंगला यायचं ठरवलं, पण जमलं नाही. यावेळेस घरातील सर्व गोष्टी मॅनेज करून मी आले, तर माझा पाय मुरगळला. आता मला हॉटेलच्या रूमवर राहण्याशिवाय पर्याय नाही. माझं नशिबच असलं. मी जे ठरवते ते कधी पूर्णच होत नाही.”

स्वयंपाक करताना एखादा पदार्थ बिघडला,ऑफिसमध्ये प्रमोशन लिस्टमध्ये नंबर नाही लागला, गावाला जाताना गाडी लेट झाली, मुलांना कमी मार्क मिळाले, नवऱ्याने काही गोष्टी तिच्या मनाविरुद्ध केल्या इत्यादी कोणतीही कारण असो, त्या सगळ्या गोष्टींना, ‘माझं मेलीचं नशीबच फुटकं,’ असं ती नेहमी म्हणत असायची. स्वतःला आणि नशिबाला दोष देण्याचा तिचा स्वभावच झाला होता. खरं तर आज सुमित्रा मुद्दामच लवकर तिच्या मदतीला आली होती, पण आहे त्या परिस्थितीत काहीतरी चांगलं आहे हे ती बघतच नव्हती, म्हणून सुमित्रानचं तिला विचारलं,

“ कामिनी, प्रत्येक वेळी नशिबाला कशाला दोष देतेस?”

“ मग काय करू? माझ्याच बाबतीत नेहमी असं का घडतं? मी काही चांगलं करायला गेले की अडचणी येतातच.”

कामिनी त्यातून बाहेर येतच नव्हती.

“अगं, गौरी माय आणि गणपती बाप्पाला आज तुझ्या हातचा प्रसाद हवा आहे, असा अर्थ का नाही लावत. तो आनंदानं कर. तुझ्या मदतीला आज कामवाल्या बायका नसल्या तरी मी आहे ना, मीही तुला मदत करू शकते.”

“म्हणजेच काय? स्वतःचं समाधान करून घ्यायचं, पण त्यामुळं परिस्थिती बदलते का? जो त्रास व्हायचा तो होणारच. तूच सांग सुमित्रा, माझ्याच बाबतीत असं नेहमी का घडतं? माझं खरंच काही चुकतंय का? अशा अडचणी नेहमी का येतात माझ्या आयुष्यात?” कामिनी रडवेली होऊन बोलत होती.

हेही वाचा >>> स्त्री आरोग्य : कंबरदुखी सतावतेय ?

आता मात्र सुमित्राला हसावं की रडावं हेच सुचेना, किती किरकोळ गोष्टी ही मनाला लावून घेते आणि त्याचा त्रास करून घेते, याचं तिलाच वाईट वाटलं, ती म्हणाली, कामिनी,हो खरंच तुझं चुकतंय. तू स्वतःला दोष लावून घेतेस, नशिबाला टोकत राहातेस आणि तुझ्या मनासारखं सगळ्या गोष्टी व्हायलाच हव्यात असा अट्टहास करतेस, अगं, तुझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी बाकी कोणाच्याच आयुष्यात कधीच आल्या नाहीत असं आहे का? या सर्वसामान्य गोष्टी आहेत, आणि प्रत्येकाला अशा प्रसंगातून केव्हा ना केव्हा जावंच लागतं, त्याचा एवढा बाऊ कशाला करायचा?शेवटी प्राप्त परिस्थिती प्रत्येकालाच स्वीकारावी लागते, ती स्वीकारताना रडत खडत स्वीकारायची की, स्वतःला दोष देत स्वीकारायची, आहे त्या परिस्थितीत आनंद घ्यायचा की जे मिळालं नाही त्याचं दुःख करतं बसायचं? आपलं आपणच ठरवावं लागतं. या परिस्थितीत स्वतःशी स्वतःच नातं विश्वासार्ह असावं लागतं. तूच सांग, आपण स्वतःशीच किती गोष्टी बोलत असतो. स्वतःलाच किती गोष्टी समजावत असतो, हो की नाही? पण हे नातं बिघडलं ना की विचार भरकटतात, आपण स्वतःला आणि परिस्थितीला दोष देऊ लागतो. स्वतःचीच प्रतारणा करू लागतो,  कधी कधी हे खूप वाढलं की मानसिक आजारही होतात. जे करायचं आहे आणि जे करावंच लागणार आहे, हे आनंदानं स्वीकारायला हवं. प्रत्येक परिस्थिती माझ्यासाठी चांगली असायलाच हवी हा अट्टाहास करण्यापेक्षा, जी परिस्थिती निर्माण होईल, ती माझ्यासाठी चांगलीच आहे, ती मी चांगली करेन, असा विश्वास ठेवायला हवा.” 

सुमित्रा जे सांगत होती, त्याचा कामिनी विचार करीत होती. जे मनासारखं घडतं नाही त्याचा आपण विचार करून स्वतःला किती त्रास करून घेतो हे तिलाही आता पटतं होतं. आपला दृष्टीकोन बदलायला हवा हे तिच्याही लक्षात आलं, त्यासाठी प्रयत्न करायचा आणि स्वतःशी स्वतःचं नात सुदृढ करायला हवं हे तिच्याही लक्षात आलं आणि ती नैवेद्याच्या स्वयंपाकाला लागली.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about unfair blaming luck in life zws