आलमपूर गावातील संपत्तीदेवीसारख्या अनेक स्त्रियांनी वर्षानुवर्षें दूध विकून साठवलेले पैसे पोखर बांधण्यासाठी वापरले. त्यानंतर पडलेल्या पावसामध्ये या पोखरमध्ये पाणी साठले आणि ते शेतीच्या कामासाठी वापरले जाऊ लागले. संपत्तीदेवी सांगतात की आता त्यांना मोहरी, गहू, बाजरी आणि भाज्यांची लागवड करता येते. यामुळे अन्नधान्याची ददात मिटली आहे. त्याशिवाय त्या इतरांनाही हे पोखर भाड्याने वापरायला देतात. त्यांच्या कुटुंबाला घरगुती वापरासाठीही हे पाणी पुरते. त्यातून दर हंगामात त्यांना सुमारे एक लाख रुपयांची कमाई होते. तसेच जलसंवर्धनाच्या सामुदायिक प्रयत्नांमुळे या भागात आता पुन्हा स्थैर्य अनुभवायला मिळत आहे.

राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांना एकमेकांशी जोडणाऱ्या भागात आहे चंबळचं खोरं. क्रूर आणि निष्ठूर दरोडेखोरांसाठी प्रसिद्ध. चंबळच्या डाकूंचं पुनर्वसन करण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न झाले. १९२०मध्ये ग्वाल्हेरचे महाराज, १९६०मध्ये विनोबा भावे, १९७१-७२मध्ये जयप्रकाश नारायण यांनी मोठ्या संख्येने दरोडेखांना शस्त्रं त्यागण्याचं आणि शरणागती पत्करून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्याचं काम केलं. या कामांची इतिहासात यथायोग्य नोंदही झाली. त्या-त्या वेळी या घटनांकडे एक प्रकारची क्रांती म्हणून पाहिलं गेलं. अशा ठळक घटनांव्यतिरिक्तही दरोडेखोरांच्या पुनर्वसनाचे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असतात. अनेकदा कोणतेही वलय नसलेल्या साध्यासुध्या लोकांकडून केले जाणारे हे प्रयत्न दीर्घकाळ, शांतपणे होत असतात. एक स्वतंत्र घडामोड म्हणून त्यांची नोंद घेता येत नाही. त्यांचा एकत्रित परिणाम मात्र चकित करणारा असतो. असेच काहीसे घडले आहे राजस्थानच्या करौली जिल्ह्यामध्ये. शांत जीवनासाठी सुरू झालेला हा संघर्ष जलप्रवासाचीही एक गाथा ठरला आहे.

करौली जिल्ह्यामध्ये सुमारे २५ वर्षांपूर्वीपर्यंत पर्जन्यमान सामान्य होतं. हवामान बदलामुळे हळूहळू त्यामध्ये घट होत गेली. आकडेवारीत सांगायचे तर १९५१ ते २००० या कालावधीत सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७२२.१ मिमी इतकं होतं. ते २००१ ते २०११ या कालावधीत ५६३.९४ मिमी इतकं कमी झालं. या भागात बारमाही नद्या जवळपास नव्हत्याच. पण घटत्या पावसामुळे पावसाळ्यातही नदीला पाणी राहिनासं झालं. वारंवार पडणारा दुष्काळ, आटलेल्या नद्या आणि इतर जलस्रोत याचा परिणाम शेती आणि पशुपालनावर झाला. उत्पन्नाचे अन्य साधन नव्हते. परिणामी अनेक पुरुष दरोडेखोरीकडे वळाले. दरोडे टाकणं, पोलिसांपासून लपत जंगलात राहणं आणि स्वतःचं आयुष्य धोक्यात घालत कधीतरी गावात येऊन आपापल्या बायकापोरांना भेटणं हा त्यांचा वर्षानुवर्षांचा नित्यक्रम झाला. साधारण २०१०पर्यंत हे असंच सुरू होतं. आपला पती एकदा भेटून गेल्यावर पुन्हा दिसेल की नाही या भीतीमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या या बायका या अस्थिर आयुष्याला कंटाळल्या. त्यांनी आपले आयुष्य पुन्हा आपल्या हातात घेण्याचा निर्धार केला. जंगलातून बाहेर येऊन शस्त्रं खाली ठेवावीत आणि सामान्य आयुष्य जगावं यासाठी त्यांनी आपापल्या पतीचं मन वळवलं. त्यासाठी दरोडेखोरीच्या मूळ कारणावर उपाय करणं आवश्यक होतं. त्यामुळे पुढील संघर्ष होता पाण्याचा, पाणी मिळवण्याचा आणि ते टिकवण्याचा.

या कामात त्यांना साथ मिळाली अलवरस्थित १९७५पासून जलसंवर्धनासाठी काम करणाऱ्या तरुण भारत संघ या प्रसिद्ध स्वयंसेवी संस्थेचा. तरुण भारत संघाच्या मदतीने ठिकठिकाणी बुजलेल्या तळ्यांचे आणि पोखरांचे पुनरुज्जीवन करण्यात आले. पोखर म्हणजे राजस्थानातील पारंपरिक पावसाचे पाणी साठवण्याचे जलाशय. हे तलाव सामान्यतः बंधाऱ्यांलगत बांधले जातात. पाणी साठवणे, सिंचन आणि इतर कारणांसाठी त्यांचा वापर केला जातो. गावातील विहिरींप्रमाणे हेही बहुतेक वेळा सामूहिक मालकीचेच असतात. तर काही पोखरवर खासगी मालकी असते. कोरड्या प्रदेशात पाणी व्यवस्थापनात ते फार महत्त्वाची भूमिका बजावतात.

आलमपूर गावातील संपत्तीदेवीसारख्या अनेक स्त्रियांनी वर्षानुवर्षे दूध विकून साठवलेले पैसे पोखर बांधण्यासाठी वापरले. त्यानंतर पडलेल्या पावसामध्ये या पोखरमध्ये पाणी साठले आणि ते शेतीच्या कामासाठी वापरले जाऊ लागले. संपत्तीदेवी सांगतात की आता त्यांना मोहरी, गहू, बाजरी आणि भाज्यांची लागवड करता येते. यामुळे अन्नधान्याची ददात मिटली आहे. त्याशिवाय त्या इतरांनाही हे पोखर भाड्याने वापरायला देतात. त्यांच्या कुटुंबाला घरगुती वापरासाठीही हे पाणी पुरते. त्यातून दर हंगामात त्यांना सुमारे एक लाख रुपयांची कमाई होते. संपत्तीदेवींचे पती जगदीश ५८ वर्षांचे आहेत. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी दरोडेखोरी सोडली आहे. ‘‘मी आतापर्यंत मेलो असतो. तिने मला परत येऊन पुन्हा शेती सुरू करण्यास सांगितले,’’ असे ते सांगतात. शस्त्रे सोडून शांतता निवडण्याचा त्यांना चांगला परिणाम दिसत आहे. भूरखेडा गावातील ५५ वर्षीय प्रेम यांचा विवाह लहानपणीच झाला होता. त्यांनी स्वतःची चार बिघे जमीन पोखर बांधण्यासाठी गावाला दिली. प्रेम यांचे पतीही एकेकाळी दरोडे घालत असत. आता तेही सर्वसामान्य जीवन जगत आहेत.

हा भाग खडकाळ आहे. त्यामुळे पावसानंतर पाणी उतारावर वाहून जातं, ते जमिनीमध्ये झिरपायला फारसा वाव नसतो. त्यामुळे पाणी अडवणं, जिरवणं आणि टिकवणं यासाठी हुशारीपूर्वक विशेष प्रयत्न करावे लागतात. येथील लोकांनीही तेच केलं. गेल्या १५ वर्षांच्या कालावधीत तरुण भारत संघ आणि स्थानिकांनी आलमपूर गावामध्ये एकूण १६ पोखर बांधले आहेत. संपूर्ण करौली जिल्ह्यामध्ये त्यांची संख्या साधारण ५०० इतकी आहे. डोंगरांच्या उतारावरून येणारे पाणी या पोखरांमध्ये साठवल्यांमुळे आता करौलीची भूजलपातळीही जमिनीखाली ५ ते १० फूट इतकी वर आली आहे. इतकेच नव्हे तर येथील शेरनी या हंगामी नदीचे रुपांतर बारमाही नदीत झाले आहे. अगदी दशकभरापूर्वी, दिवाळीनंतर या नदीला पाणी नसे. आता अगदी ऐन उन्हाळ्यातही नदीला भरपूर पाणी आहे. नदीच्या पात्रामध्ये आणि अवतीभवती १५० जलसंवर्धनाची कामे केली आहेत, त्यामुळे हा परिणाम झाल्याची माहिती तरुण भारत संघाचे कार्यकर्ते रणवीर सिंह यांनी दिली. या भागातून दुष्काळ जवळपास नाहीसा झाला आहे असे म्हणता येईल. खरे तर साधारण ४० वर्षांपूर्वी ही नदी बारमाही वाहत असे, पण हवामान बदलामुळे सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे तिचे स्वरूप बदलत गेले. आता तिला पुन्हा पूर्वीचे वैभव प्राप्त झाले आहे.

राजस्थानात दरोडेखोरांचा सर्वाधिक उपद्रव असलेल्या जिल्ह्यांमध्ये करौलीचा समावेश होतो. मात्र, पाण्याच्या या संघर्षाने दरोडेखोरांच्याही जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक ब्रिजेश ज्योती उपाध्याय सांगतात की, जलसंवर्धनाच्या सामुदायिक प्रयत्नांमुळे या भागात आता पुन्हा स्थैर्य अनुभवायला मिळत आहे. अरोरा गावचे ७० वर्षीय सियाराम लोकगायक आहेत. एकेकाळी दुष्काळ पडल्यावर पिके जळून जात आणि लहान मुले भूकेमुळे रडत. त्यावेळी ते गाणे म्हणत असत, ‘‘पानी की डोरी हाथ नहीं, तुम चाहो तो बरसात नहीं. पानी की अजब कहानी है. अब भाई खुवारी बिन पानी है.’’ (खुवारी म्हणजे जमीन). आता त्यांच्या गीताच्या ओळी बदलल्या आहेत : ‘‘पानी ही का साथी, पानी बिन मर जाये हाथी… मिल जायेगा धन रतन, अगर हम पानी रोकने का करें जतन.’’

nima.patil@expressindia.com