वृत्तसंस्था, नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेअतंर्गत देशात विकसित केलेल्या ५जी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रथमच ५जीची आयआयटी मद्रास येथे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून यशस्वी चाचणी घेण्यात आली. आयआयटी मद्रासने विकसित केलेले हे तंत्रज्ञाना देशातच विकसित करण्यात आल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिली. ५जी तंत्रज्ञान हायपरलूप प्रकल्पासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. चालू वर्षांच्या अखेरीस ५जी तंत्रज्ञान प्रकल्प पूर्ण होणार असून सप्टेंबर-ऑक्टोबपर्यंत भारत स्वत:चे स्वदेशी ५जी तंत्रज्ञान तयार करेल. हेच तंत्रज्ञान एकविसाव्या शतकातील देशाच्या प्रगतीचा वेग ठरवेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, ५जीच्या माध्यमातून देशात सुमारे १.५ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दूरसंचार क्षेत्रासाठी आवश्यक असलेली ५ जी चाचणी अंतिम टप्प्यात पोचली असून ५ जी चाचणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयआयटी बॉम्बे, आयआयटी दिल्ली, आयआयटी हैदराबाद, आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स बंगळूरु, सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग अँड रिसर्च आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन वायरलेस टेक्नॉलॉजी या संस्था गेल्या ३६ महिन्यांपासून कार्यरत आहेत.