देवी दुर्गेच्या प्रतिष्ठापनेच्या काळात काही खास संयोग तयार होत आहेत. हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीचा आरंभ होत आहे. यावर्षी २६ सप्टेंबरला ही तिथी असणार आहे. तर शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता ५ ऑक्टोबरला होईल. नवरात्रीत नऊ दिवस देवी दुर्गेच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाच्या स्थापनेने शुभ संयोगाची सुरुवात होईल. विशेष संयोगांमुळे या दिवसाचे महत्त्व वाढत आहे. जाणून घ्या शारदीय नवरात्रीचा शुभ मुहूर्त आणि इतर खास गोष्टी. नवरात्र कधी सुरू होत आहे? यावेळी २६ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. ५ ऑक्टोबर रोजी या उत्सवाची सांगता होईल. एका वर्षात चार नवरात्र असतात. त्यापैकी दोन गुप्त आणि दोन सामान्य नवरात्री आहेत. धार्मिक मान्यतेनुसार चारही नवरात्र आदिशक्तीच्या उपासनेसाठी खास आहेत. नवरात्रीचा शुभ मुहूर्त आणि कलशाची स्थापना नवरात्रीची प्रतिपदा तिथी २६ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून २४ मिनिटे ते २७ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजून ८ मिनिटांपर्यंत असेल. दुसरीकडे, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून २० मिनिटे ते १० वाजून १९ मिनिटे या वेळेत कलश स्थापनेसाठी चांगला काळ असेल. अभिजीत मुहूर्त २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५४ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असेल. ऑक्टोबर महिन्यात एक नाही तर तब्बल पाच वेळा होणार ‘या’ ग्रहांचे राशी परिवर्तन; कसा असेल यांचा प्रभाव? जाणून घ्या नवरात्रीमध्ये तयार होत आहेत दोन विशेष योग २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजून ६ मिनिटे ते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत शुक्ल योग राहील. यानंतर ब्रह्मयोग सुरू होईल म्हणजेच २६ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपासून, ब्रह्मयोग तयार होत आहे जो दुसऱ्या दिवशी २७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ४४ मिनिटांपर्यंत राहील. ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार शुक्ल आणि ब्रह्मयोगात पूजा करणे शुभ आणि फलदायी असते. देवीची आराधना करून व्रत पाळल्यास असाध्य मनोकामना पूर्ण होतात. यंदा कोणत्या वाहनावरून होणार देवीचं वाहन? देवीचं वाहन नवरात्रौत्सवाच्या सुरुवातीच्या वारावरून ठरवलं जातं. यंदा नवरात्राची सुरुवात सोमवारी होणार आहे. सोमवारपासून नवरात्र सुरू होत असेल तर त्यादिवशी देवी हत्तीवर बसून येते असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हे शुभ संकेत आहेत. हत्ती हा गणरायचं म्हणजेच साक्षात बुद्धीच्या व कलेच्या देवतेचं प्रतीक आहे त्यामुळे हत्तीवरून येणारी देवी आपल्या भक्तांच्या आयुष्यात ज्ञान व समृद्धीचं वाण घेऊन येते अशी श्रद्धा असते. (येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)