ही कथा आहे एका अशा व्यापाऱ्याची, ज्याने ज्या पद्धतीने बँकांना फसविले आहे ते कल्पनेच्या पलीकडील आहे. ज्याच्याकडे कदाचित सगळे काही होते पण संयम नव्हता, त्यामुळे तुमचे-आमचे सुमारे ३,६९५ कोटी रुपये बुडाले. ही कथा आहे विक्रम कोठारी यांची. ज्यांच्या वडिलांनी म्हणजे मनसुख कोठारींनी पान परागची स्थापना केली. त्यांच्या हयातीतच मुलांनी आपले उद्योग वाटून घेतले. दीपक कोठारी यांच्या वाट्याला पान पराग आले तर विक्रम कोठारींना मिळाली रोटोमॅक नावाची स्टेशनरी बनवणारी कंपनी आणि काही आयात-निर्यात करणाऱ्या कंपन्या. तसे बघायला गेले तर १९९२ मध्येच रोटोमॅकची स्थापना झाली होती आणि त्यावर विक्रम कोठारींनी बरीच मेहेनत घेतली होती. कंपनीचे नाव देशात नाही तर परदेशातसुद्धा झाले होते. चांगल्या जाहिराती आणि विपणन व्यवस्थेमुळे कंपनी लवकरच नावारूपाला आली होती. रेनॉल्ड्ससारख्या आंतरराष्ट्रीय नाममुद्रेला रोटोमॅक चांगलीच टक्कर देत होता. सलमान खान आणि रविना टंडनसारखे गाजलेले कलाकार त्याच्या जाहिरातीत दिसत होते. वाचकांपैकी कित्येकांनी आपल्या महत्त्वाच्या परीक्षा याच कंपनीच्या पेनांनी लिहिल्या असतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> भेटी करपात्र आहेत का?

रोटोमॅकने ग्रीटिंग कार्ड्स आणि गृहनिर्माणसारख्या क्षेत्रातसुद्धा आपले पाय रोवण्याचा प्रयत्न केला होता. काही प्रतिष्ठित पुरस्कारांनी विक्रम कोठारी हे नाव घराघरांत पोहोचले होते. पण शेवटी विनाशकाले विपरीत बुद्धी आणि या साम्राज्याला उतरती कळा लागली. पेनांच्या आयत आणि निर्यातीसाठी आपल्या कंपनीत विक्रम कोठारी कर्ज घ्यायचे. त्यासाठी त्यांनी परदेशात काही बोगस कंपन्या स्थापन केल्या होत्या. सुमारे ७ बँकांनी २,९०० कोटी रुपयांचे कर्ज रोटोमॅक कंपनीला दिले होते, जे पर्यायाने सिंगापूरमधील बगाडिया ब्रदर्समध्ये जमा होत होते. तिथून हेच पैसे बऱ्याच मार्गांनी परत विक्रम कोठारी यांच्याकडे जमा व्हायचे. या पैशाचे ते काय करायचे हा तसा गुलदस्त्यातच असलेला प्रश्न आहे. पण तरीही केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) मिळवलेल्या माहितीनुसार, हे पैसे स्वतःच्या वापरासाठी उपयोगात आणले जायचे किंवा अधिक जास्त नफा मिळवणाऱ्या स्रोतांकडे वळवले जात होते. ज्याचा नवी वाहने खरेदी करणे आणि सामाजिक वर्तुळात मेजवान्या देऊन खोटा मानसन्मान मिळवण्यासाठी वापर केला जात होता. तसेच परदेशी विनिमयाचे काही व्यवहारसुद्धा ते करायचे त्यातच त्यांना बराच तोटा झाला होता.

हेही वाचा >>> टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?

गुंतवणुकीच्या नफ्यातून बँकांची देणी परत दिली जात असत. पण शेवटी अशा व्यवहारांचा कधी तरी अंत होतोच. वर्ष २०१८ मध्ये तेच झाले. जेव्हा बँकांची देणी परत देऊ शकले नाहीत, तेव्हा बँक ऑफ बडोदाने सीबीआयमध्ये तक्रार दाखल केली आणि अंताची सुरुवात झाली. सीबीआयने चौकशीअंती फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांना अटक केली आणि १९ महिने ते तुरुंगात राहिले. बँकेने तक्रारसुद्धा नीरव मोदी प्रकरणानंतरच केली, कारण विक्रम कोठारी आता नीरव मोदीप्रमाणेच देश सोडून पळून जातील अशी चर्चा सुरू झाली होती. १९ महिन्यांनंतर तब्येतीच्या कारणामुळे त्यांचा जामीन मंजूर झाला. जामिनावर असतानासुद्धा त्यांचा दिखाऊपणा जरा देखील कमी झाला नसल्याचे निकटवर्तीय सांगतात. दुर्दैवाने ४ जानेवारी २०२२ रोजी घरात पाय घसरून त्यांचे निधन झाले. हजारो कोटींचा अपहार करणाऱ्या माणसाच्या बंगल्याचे नाव ‘संतुष्टी’ असावे हाही विरोधाभासच. रोटोमॅक कंपनीनंतर डबघाईला आली होती आणि त्यांनी आपला कानपूरचा प्रकल्प बंद केला. मला अनुभव नाही, पण कुणीही मनुष्य एखादी तलवार घेऊन बँकेत गेला तर जास्तीत जास्त १० ते २० कोटी रुपये लुटू शकेल. विक्रम कोठारी यांचा अपहार ३,७०० कोटींचा होता. कारण ते बँकेत रोटोमॅक पेन घेऊन गेले होते. बँकेने कंपनीकडे बघून त्यांना एवढे भरमसाट कर्ज दिले. एडवर्ड बुलवर-लिट्टोन यांनी बहुतेक पावणेदोनशे वर्षांपूर्वीच हे बघितले होते आणि आपल्या नाटकात लिहून ठेवले ‘तलवारीपेक्षा लेखणी बलवान!’

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about the rise and fall of rotomac pen owner vikram kothari print eco news zws