प्रवीण चौगले आजच्या लेखामध्ये यूपीएससी मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ अंतर्गत महत्त्वाचा मुद्दा भारत व शेजारील देश यांच्यातील संबंधांचा आढावा घेणार आहोत. यामध्ये चीन, म्यानमार, अफगाणिस्तान, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि मालदीव यांचा समावेश होतो. या घटकाचा अभ्यास करताना या देशांची वैशिष्टय़े त्यांच्यातील परस्परसंबंध, बहुपक्षीय संबंध, त्यांच्यावरील अंतर्गत व बाह्य दबाव टाकणारे घटक, जागतिक आंतरराष्ट्रीय राजकारणातील त्यांचे स्थान या बाबी जाणून घेणे आवश्यक ठरते. भारताचे शेजारील देशांशी संबंध आरंभापासूनच समानता व परस्परांचा आदर या मूलभूत तत्त्वावर आधारित आहेत. या घटकाची तयारी समकालीन परिप्रेक्ष्यात करणे आवश्यक ठरते. भारत-चीन संबंध भारत व चीनमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये स्पर्धा व सहकार्य या दोन्ही पैलूंचा समावेश होतो. या संबंधांमध्ये धोरणात्मक अविश्वास हे आव्हान दिसून येते. सीमापार नद्यांच्या पाण्याचा वापर, व्यापार असमतोल, सीमा प्रश्न इत्यादी द्विपक्षीय मुद्दे दिसून येतात. चीन हा देश आर्थिक व लष्करी महासत्ता म्हणून उदयास आलेला आहे. चीनने आपल्या आर्थिक सामर्थ्यांच्या साहाय्याने दक्षिण आशियाई राष्ट्रांवर आपला प्रभाव स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चीनच्या या दृष्टिकोनाचा भारतावरती परिणाम दिसून येतो. Q. The newly tination partnership AUKUS is aimed at countering China's ambitions in the Indi- Pacific region. Is it going to supersede the existing partnerships in the region? Discuss the streangth and impact of AUKUS in the present scenario. (२०२१). भारत-पाकिस्तान संबंध १९४७ पासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आजवर तणावपूर्ण राहिलेले आहेत. १९४७, १९६५, १९७१ आणि १९९९ अशी भारत आणि पाकिस्तान यांमध्ये युद्धे झाली आहेत. सद्य:स्थितीमध्ये पाकिस्तानची चीनशी अधिक जवळीक असल्यामुळे भारताच्या या चिंतेमध्ये वाढ झालेली आहे. भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढला. त्यानंतर पाकिस्तानने यावर तीव्र आक्षेप घेत संयुक्त राष्ट्रात धाव घेतली. भारत-बांगलादेश संबंध बांगलादेशच्या स्वातंत्र्यामध्ये भारताने कळीची भूमिका बजावली होती. त्यानंतर बांगलादेशचे पहिले अध्यक्ष शेख मुजीब उर रहमान यांच्यानंतर भारत-बांगलादेश संबंध बिघडले होते. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील १९७४ असून प्रलंबित असणारा भू-सीमा रेषा करार पूर्णत्वास गेला आहे. तसेच हा दोन्ही देशांतील भूखंडांच्या अदलाबदलीचा क्लिष्ट मुद्दा, तिस्ता नदीच्या पाणीवाटपातील वाद या समस्यांचे निराकरण झाल्याने दोन्ही देशांतील संबंध मैत्रीपूर्ण बनले आहेत. अलीकडे आसाममध्ये बेकायदेशीर वास्तव्यास असणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरित लोकांची ओळख पटविण्यासाठी लागू करण्यात आलेला नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या उपक्रमांमुळे या संबंधांमध्ये किंचित तणाव जाणवतो. भारत-म्यानमार संबंध म्यानमारमध्ये १९६२ साली झालेल्या लष्करी उठावानंतर त्या देशाने जगापासून अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले होते. परिणामी, भारत आणि म्यानमार संबंध थंडावले होते. नंतर १९९०च्या दशकामध्ये भारताने म्यानमारमधील नेत्या आंग सान सूची यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीवादी चळवळीला पािठबा दिला होता. ईशान्येकडील अनेक बंडखोर गटांचा बीमोड करण्यासाठी म्यानमारने भारताला पािठबा दिला. भारत-श्रीलंका संबंध श्रीलंकेतील संघर्ष संपून तेथे लोकशाही मजबूत करण्यासाठी भारताने शांतिसेना पाठविली होती. राजपक्षे यांच्या कार्यकाळात भारत-श्रीलंका संबंध तणावपूर्ण होते. कारण त्या काळात श्रीलंकेवर चीनचा प्रभाव वाढत होता. मात्र, सिरीसेना यांचा चीनचे वर्चस्व झुगारून देण्याचा आणि भारतशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याकडे कल असल्याचा दिसतो. या दोन्ही देशांमध्ये झालेला नागरी अणुकरार अतिशय महत्त्वाचा आहे. भारत-नेपाळ संबंध अलीकडे नेपाळने एक नवा राजकीय नकाशा प्रसिद्ध केला होता त्यामध्ये उत्तराखंडमधील कालापणी लीपूल्लेख ही गावे नेपाळचा भाग असल्याचे दाखवले होते. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला. भारत आणि चीनला जोडणाऱ्या रस्त्याचे भारताने उद्घाटन केले. मात्र, ज्या भागात हा रस्ता उभारण्यात आला तो नेपाळचा आहे, असा नेपाळकडून दावा करण्यात आला. त्यानंतर सदर नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. दोन्ही देशांमधील समान सांस्कृतिक वारसा, खुली सीमा तसेच पर्यटन स्थळ म्हणून नेपाळ नेहमीच भारतासाठी आकर्षण राहिलेले आहे. मात्र नेपाळमध्ये भारतविरोधी भावनांचा अंत:प्रवाह अजूनही जाणवतो. भारत-मालदीव संबंध भारत आणि मालदीव यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध आहेत. भारत हा मालदीवचा जवळचा द्विपक्षी भागीदार देश आहे. मालदीव महत्त्वाच्या वस्तूंच्या पुरवठय़ासाठी भारतावर अवलंबून आहे. तसेच मालदीवचे लोक वैद्यकीय उपचारासाठीही भारतामध्ये येतात. भारतीयांमध्ये पर्यटनासाठी मालदीवला प्राधान्य दिले. अलीकडे मालदीव येथील चीनचा वावर भारतासाठी चिंतेची बाब आहे. मालदीवने चीनसोबत फ्री ट्रेड अॅग्रीमेंट केले आहे. हा करार भारतासाठी धक्कादायक आहे. मालदीव येथील विरोधी पक्षनेते अब्दुल्ला यामीन हे भारतविरोधक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पुढाकाराने सध्या मालदीव येथे ‘इंडिया आऊट’ मोहीम सुरू आहे. मात्र मालदीवचे अध्यक्ष सोलेह यांनी ‘इंडिया फस्र्ट’ या धोरणाचा पुरस्कार केला आहे. तसेच ‘इंडिया आऊट’ या मोहिमेला पायबंध घालण्यासाठी त्यांच्या सरकारने पावले उचलली आहेत. हा घटक चालू घडामोडींशी संबंधित असल्याने तयारीसाठी ‘इंडियन एक्स्प्रेस’सारख्या वर्तमानपत्रांसोबत ‘वल्र्ड फोकस’ हे नियतकालिक वापरता येईल. याबरोबरच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे संकेतस्थळ आणि वार्षिक अहवाल पाहणे श्रेयस्कर ठरेल.