कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन करण्याची क्षमता गेल्या चार दशकांत तीन पट वाढली. त्यामुळे आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो. पण अन्नधान्य प्रक्रिया व साठवण यामध्ये मागे पडलो. जागतिक बाजारपेठेत प्रक्रिया उद्याोगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आपण ‘कृषी अन्न प्रक्रिया’ यामध्ये आज नोकरीच्या संधी कशा आहेत पाहूया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या भारतामध्ये अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे म्हटले जाते. पण आज आपण जे खातो त्यातील ७० अन्न हे दूषित आहे. म्हणून शुद्ध अन्न मिळवण्याची आपणास खूप गरज आहे. जागतिकीकरणामुळे जगातील सर्व देशांमध्ये महासत्तेसाठी स्पर्धा सुरू आहे. भारताला या स्पर्धेमध्ये अव्वल स्थान मिळवायचे असेल, तर अर्थव्यवस्था मजबूत करणे गरजेचे ठरणार आहे आणि त्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा खूप महत्त्वाचा ठरत आहे. मागील दोन वर्षांत करोनानंतरच्या टाळेबंदीतही भारतीय अर्थव्यवस्थेला अर्थसंजीवनी केवळ कृषी क्षेत्राच्या योगदानामुळे प्राप्त झाली आहे.

कृषी उत्पादन मुबलक, पण नाशवंत

जगात खाद्यापदार्थाच्या उत्पादनात भारताचा तिसरा क्रमांक लागतो. देशात दरवर्षी ६२५ दशलक्ष टनाहून अधिक खाद्यापदार्थांचे किंवा पिकांचे उत्पादन होते. डाळी, चहा, मसाले व दूध उत्पादनात भारत जगात प्रथम स्थानावर आहे. फळे व भाजीपाला उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. तृणधान्ये, तेलबिया व कुक्कुटपालनात पाचवा क्रमांक आणि मत्स्य उत्पादनात सातवा क्रमांक लागतो. कृषी शिक्षणातील आधुनिक तंत्रज्ञानामुळे नवनवीन पिकांचे अधिक व उत्कृष्ट प्रतीचे उत्पन्न देणारे वाण आधुनिक सिंचन पद्धती, संरक्षित शेती म्हणजे पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस व शेडनेट मधील शेती यांत्रिक शेती असे विविध पर्याय उपलब्ध झालेले आहेत. या पुढील काही वर्षांमध्ये जागतिक स्तरावर वाढत्या लोकसंख्येचा विचार करता कृषी उत्पादनाची क्षमता वाढवणे हे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सहज शक्य होईल, असे अपेक्षित आहे. परंतु सर्व प्रकारचे कृषी उत्पादन हे नाशवंत आहे.

शेतीमाल प्रक्रिया

एका विशिष्ट कालावधीपर्यंत त्याची हाताळणी व साठवणूक शक्य आहे. शेतीमाल प्रक्रिया हे म्हणजेच अन्नप्रक्रिया सध्याच्या आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरू शकतो. कारण शेतीमालावरील प्रक्रिया, साठवणूक, अत्याधुनिक वेष्टन (पॅकेजिंग) यामुळे कृषी उत्पादने व त्यापासून तयार केलेले पदार्थ यांची साठवणूक व वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण करणे शक्य होईल. अमेरिका युरोप खंडातील पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये कृषी प्रक्रियेचे प्रमाण केवळ ६ आहे. म्हणून येत्या काही वर्षांमध्ये अन्नप्रक्रिया उद्याोग व त्याकरिता लागणारे मनुष्यबळ व अन्न तंत्रज्ञ (फूड टेक्नॉलॉजिस्ट) ची आवश्यकता आहे. म्हणजेच अन्न तंत्रज्ञान (फूड टेक्नॉलॉजी) अर्थातच अन्नप्रक्रिया उद्याोग हे भारतासह जगातील विविध देशांमध्ये सर्वात जलद विकसित होणारे क्षेत्र असून याचा पाचवा क्रमांक लागतो. दहा वर्षात वीस लाख कोटींची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे.

हमखास नोकरीची संधी

कृषी शिक्षणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अन्न तंत्रज्ञान (फूड टेक्नॉलॉजी) हे हमखास नोकरीची संधी व उज्ज्वल भविष्याचे क्षेत्र म्हणून उदयास येत आहे. या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय फूड प्रोसेसिंग कंपन्यांमध्ये फॅक्टरी मॅनेजर, सुपरवायझर, प्रोडक्शन ऑफिसर, क्वालिटी कंट्रोल ऑफिसर, रिसर्च व डेव्हलपर पदांवर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. सेंट्रल फूड टेक्नॉलॉजीकल रिसर्च इन्स्टिट्यूट (सीएफटीआरआय), म्हैसूर; भाभा ऑटोमिक रिसर्च इन्स्टिट्यूट (बीएआरसी) मुंबई; डिफेन्स फूड रिसर्च लॅबोरेटरी (डीएफआरएल) म्हैसूर; यांसारख्या केंद्रीय तसेच राज्यस्तरीय रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये वैज्ञानिक म्हणून संधी मिळू शकते. अन्न व औषध प्रशासन, अन्न सुरक्षा अधिकारी (फूड इन्स्पेक्टर) भारतीय खाद्या निगम यासारख्या सरकारी विभागामध्ये संधी मिळू शकते. याशिवाय अन्नतंत्रज्ञानाची (फूड टेक्नॉलॉजी) पदवी घेतलेला विद्यार्थी कृषी व अन्य प्रक्रिया संबंधित व्यवसाय सुरू करू शकतो.

यावर्षीपासून शासनाने १२ वी ला जीवशास्त्र विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयात प्रवेशाची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता अशा विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी आहे.

● sachinhort. shinde@gmail. com

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Job opportunities in agriculture sector agri food technology sector production capacity amy