MPSC, UPSC Preparation Tips : १० वी, १२ वी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण- ही दोन वर्षे तुमच्या करिअरला खऱ्या अर्थाने दिशा देणारी असतात. सध्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. पण, तरीही अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळताना दिसतात. पण, त्यासाठी कोणत्या शाखेत प्रवेश घेणे योग्य, परीक्षेसाठी तयारी नेमकी कशी करायची अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) नेमकी आवड ओळखा?

१० वी, १२ वीच्या फार कमी विद्यार्थ्यांना भविष्याबाबत योग्य निर्णय घेणे जमते. या काळात ऐकलेल्या आणि पालकांनी सांगितलेल्या माहितीवरून ते द्विधा मन:स्थितीतच आपला निर्णय घेतात. त्यांना काय आवडते, ते कोणत्या गोष्टी करू शकतात याचा विचार करीत नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो आधी स्वत:च्या आवड ओळखा. कारण- तुम्ही अपुऱ्या माहितीवरून केलेली निवड आणि त्याबाबतचा निर्णय चुकू शकतो. पुढे जाऊन तुमची आवड-निवड बदलू शकते. तुम्ही खरंच स्पर्धा परीक्षेत मन लावून अभ्यास करू शकाल का याचा विचार करा. कारण- पुढे जाऊन अभ्यास न झेपल्याने पदरी निराशा येऊ शकते. अशा वेळी तुम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घ्या.

२) अभ्यास कधी सुरू करावा?

१० वी, १२ वीनंतर अनेक जण स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतात. अशा वेळी त्यांना अभ्यास कसा आणि कधी सुरू करावा ते समजत नाही. तर यात एक गोष्ट लक्षात घ्या की, स्पर्धा परीक्षांचे स्वरूप सामान्य ज्ञान आणि विषयांशी निगडित ठेवून सातत्याने बदलत असते. दर दोन ते चार वर्षांनी या परीक्षांचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम बदलतो. तसेच या परीक्षा देत असताना तुम्हाला चालू घडामोडींविषयीची अधिक माहिती वा ज्ञान असणे आवश्यक असते. तुम्हाला २१ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय आणि पदवीच्या शेवटच्या वर्षापर्यंत स्पर्धा परीक्षा देता येत नाहीत. त्यामुळे थेट सगळाच अभ्यास करण्यापेक्षा अभ्यासाची सवय लावून घ्या. त्यातही उत्तम पर्याय म्हणजे १० वी, १२ वी नंतर अनेक सरकारी जागांसाठी परीक्षा होत असतात. त्या परीक्षा देण्याचा सराव करा आणि त्यासाठी कोणता अभ्यासक्रम गरजेचा असतो, त्याची माहिती करून घ्या.

३) प्लॅन बी तयार ठेवा

स्पर्धा परीक्षांमधील यश हे अनिश्चित असते. त्यामुळे प्रत्येकालाच त्यात यश मिळेलच, असे नाही. त्यात अभ्यासाबरोबर इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या क्षेत्रात येताना तुमचा प्लॅन बी तयार ठेवा. तीन-चार वर्षं प्रयत्न करूनही तुम्हाला यश न मिळाल्यास, त्यातून बाहेर पडून, चांगले करिअर करता येईल असे क्षेत्र ठरलेले असावे. १० वी, १२ वीपासून या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेताना तुमचे पदवीच्या अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष होऊ शकते. त्यामुळे आधी तुम्ही पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याला प्राधान्य असू द्या. हा निर्णय तुमच्या क्षमतेवर अवलंबून असतो; पण हुशार विद्यार्थी ‘टाईम मॅनेजमेंट’द्वारे दोन्ही गोष्टी एकत्रितपणे सांभाळू शकतात.

४) स्पर्धा परीक्षांसाठी कोणते क्षेत्र चांगले?

स्पर्धा परीक्षा देण्यासाठी कोणत्या क्षेत्रातून पदवीपर्यंतचे शिक्षण घ्यावे, असा प्रश्न विचारला जातो. पूर्वी कृषी शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या जास्त असायची आणि कला शाखेतील जास्त विद्यार्थी या परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हायचे. पण, आता अभ्यासक्रमात बदल झाल्याने कोणत्याही एका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यात विशेष यश मिळत नाही. आता अभियांत्रिकी क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल दिसून येतो. स्पर्धा परीक्षांमध्येही या क्षेत्रातील विद्यार्थी जास्त प्रमाणात दिसतात.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prepare for mpsc upsc exams after 10th 12th how to start government exams preparation from zero level sjr