UPSC-MPSC With Loksatta : यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. त्या अंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
१) काश्मीरमध्ये बर्फवृष्टी न होण्याची कारणे
यंदा या काश्मीरच्या पर्यटनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे जानेवारी महिन्याचे १५ दिवस उलटून गेले तरीही काश्मीरमध्ये बर्फवृष्टी झालेली नाही. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात गुलमर्गला एकूण ९५ हजार ९८९ पर्यटकांनी भेट दिली होती. त्यापैकी ५४७ जण विदेशी पर्यटक होते. मात्र, यंदा ही संख्या ६० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील भारत आणि जगाचा भौतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील महत्त्वाच्या भौगोलिक घटना तसेच भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्थान या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये डिसेंबर महिन्यात २० टक्के; तर जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांपर्यंत शून्य टक्का बर्फवृष्टीची नोंद झाली आहे. लडाखबाबत बोलायचे झाल्यास डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात लडाखमध्ये एकदाही बर्फवृष्टी झालेली नाही. काश्मीरमध्ये होणारी बर्फवृष्टी ही केवळ पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची नाही, तर पर्यावरण, हिवाळी पिके, पाणी व्यवस्थापन व स्थानिक अर्थव्यवस्था या सर्व दृष्टींनेही महत्त्वाची आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीत घट होताना दिसून आली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, वेस्टर्न डिस्टर्बन्सेस, तापमानात झालेली वाढ व प्रशांत महासागरातील एल निनोची घटना, अशी याची मुख्यत: तीन कारणे असू शकतात
वेस्टर्न डिस्टर्बन्सेस : जेव्हा देशातील हवामान बदलते तेव्हा भूमध्य समुद्र, कॅस्पियन व लाल समुद्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. या दाबामुळे समुद्रातल्या आर्द्रतेसोबत हवा फिरू लागते. वाऱ्याची दिशा असेल, त्याच दिशेला हा डिस्टर्बन्स निर्माण होतो. ही दिशा समजून घेऊन, हवामान शास्त्रज्ञ वेस्टर्न डिस्टर्बन्सचा अंदाज वर्तवतात.
हिमालयीन प्रदेशात, तसेच उत्तर व वायव्य भारतात हिवाळ्यात होणारी बर्फवृष्टी ही मुख्यत्वे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे होते. दरवर्षी हिवाळ्यात वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या सरासरी चार ते सहा घटना अपेक्षित असतात. मात्र, यंदा डिसेंबर महिन्यात केवळ एक घटना घडली. त्यामुळे या भागात म्हणावी तशी बर्फवृष्टी झालेली नाही.
या संदर्भात द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना, हवामान शास्त्रज्ञ तथा मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझमचे संचालक एपी डिमरी म्हणाले, “मागील काही वर्षांत वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या घटनांमध्ये घट होत चालली आहे. हिवाळ्यात साधारणपणे वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या पाच किंवा सहा घटना अपेक्षित असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत केवळ दोन ते तीन घटना घडल्या आहेत. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात कमी बर्षवृष्टी बघायला मिळाली.”
वाढते तापमान : पुढे बोलताना डिमरी म्हणाले, ”बर्फवृष्टी कमी होण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे या भागातील वाढते तापमान. मागील काही दिवसांत श्रीनगरमधील तापमान बघता, त्याची तुलना दिल्लीच्या तापमानाशी करता येईल. अनेकदा तर श्रीनगरचे तापमान दिल्लीपेक्षा जास्त असल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे काश्मीरमधील घटत्या बर्फवृष्टीला वाढते तापमानही कारणीभूत आहे.”
अल निनो : मागील दशकाचा विचार केला, तर २०१५, २०१८ व २०२२ ही काही वर्षे आहेत; ज्या वर्षी अल निनोची घटना घडली आहे. या वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमधील हिवाळा हा तुलनेने कोरडा राहिला आहे, तसेच कमी बर्फवृष्टीची नोंद झाली आहे. या संदर्भात बोलताना, श्रीनगर येथील हवामान विभागाचे प्रमुख मुख्तार अहमद म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून प्रशांत महासागरात एल निनो कायम आहे. पुढचे काही दिवस अल निनो कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम जागतिक हवामानावरही दिसून येतो आहे. अल निनोचा परिणाम कदाचित उत्तर भारतातील बर्फवृष्टीवरही होण्याची शक्यता आहे.”
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
२) इराणमधील चाबहार बंदराचे महत्त्व
काही दिवसांपूर्वीच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे दोन दिवसीय इराण दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी इराणचे रस्ते आणि शहरी विकासमंत्री मेहरदाद बजरपाश (Mehrdad Bazrpash) यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये चाबहार बंदराच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती आहे.
परीक्षेसाठी महत्त्वाचे का?
हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडमोडी तसेच महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घटना याबरोबरच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील विकसित आणि विकसनशील देशांच्या धोरणांचा भारताच्या हितसंबंधांवर परिणाम या घटकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
तुमच्या माहितीसाठी :
वर्ष २००२ मध्ये इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हसन रुहानी आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांच्यातील द्विपक्षीय चर्चेनंतर भारताने चाबहार बंदराचा विकास करण्याची घोषणा केली होती. त्याच्या एक वर्षानंतर म्हणजे २००३ मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद मोहम्मद खातमी हे भारत दौऱ्यावर आले. यावेळी भारत आणि इराण यांच्यात विविध करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या. यामध्ये चाबहार बंदराच्या विकासासंदर्भातील कराराचाही समावेश होता. गल्फ ऑफ ओमनच्या किनाऱ्यावर असलेले चाबहार बंदर हे इराणचे पहिले खोल पाण्याचे बंदर आहे. जागतिक सागरी व्यापाराच्या दृष्टीने हे बंदर अतिशय महत्त्वाचे आहे. हे बंदर इराण-पाकिस्तान सीमेवर पश्चिमेस आणि पाकिस्तानमध्ये चीन विकसित करत असलेल्या ग्वादर बंदराच्या पूर्वेस आहे. सामरिकदृष्ट्या चाबहार बंदर हे इराण आणि भारत या दोन्ही देशांसाठी महत्त्वाचे आहे. या बंदरामुळे भारताला पाकिस्तानच्या हद्दीत न शिरता थेट अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी व्यापार करता येऊ शकतो. याशिवाय हे बंदर प्रस्तावित इंटरनॅशनल नॉर्थ-साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (INSTC)चादेखील एक भाग आहे. हा कॉरिडोर हिंद महासागराला पर्शियन गल्फ, इराण कॅस्पियन समुद्रमार्गे पुढे रशियातील सेंट पीटर्सबर्ग आणि उत्तर युरोपला जोडतो. भारताने चाबहार बंदर प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :
यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.