UPSC-MPSC With Loksatta : ‘यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह. या आमच्या उपक्रमांतर्गत आम्ही दररोज यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे लेख तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. याअंतर्गतच आम्ही ‘यूपीएससी सूत्र’ हा उपक्रमही सुरू केला आहे. त्याद्वारे चालू घडामोडींचा आढावा, परीक्षेसाठी ते का महत्त्वाचे आहे? आणि त्या संदर्भातील इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) पार्थेनॉन शिल्पांमुळे ब्रिटन-ग्रीसमध्ये वाद

मागील अनेक वर्षांपासून आम्ही पार्थेनॉन शिल्पांची मागणी करत असून ब्रिटनकडून या शिल्पांसदर्भात चर्चा करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप ग्रीसकडून केला जातो आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना आणि मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर १ मधील कला व संस्कृती, इतिहास या घटकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. त्यामुळे पार्थेनॉन शिल्पं नेमकं काय आहे? ही शिल्पे ब्रिटनमध्ये कशी आली? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

ब्रिटनच्या संग्रहालयात एकूण ३० पेक्षा अधिक पार्थेनॉन शिल्पे आहेत. ही शिल्पे २ हजार वर्षांपूर्वीची असल्याचे म्हटले जाते. यातील बहुतांश शिल्पे, मूर्ती या अथेन्समधील एक्रोपोलिस (Acropolis)टेकडीवरील पार्थेनॉन मंदिरातील असल्याचे सांगितले जाते. ब्रिटनच्या ताब्यात असलेली ही शिल्पे पार्थेनॉन मंदिराच्या भिंतीवर तसेच खाली मैदानावर सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेली होती. या मंदिराचे काम इसवी सनपूर्व ४३२ मध्ये पूर्ण करण्यात आले होते. हे मंदिर अथेना देवीचे आहे. अथेन्सच्या सुवर्ण युगाची साक्ष म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.

ब्रिटनकडे असलेल्या अनेक शिल्पांमध्ये एक ७५ मीटर उंचीचे विशेष शिल्प आहे. अथेना देवीच्या जन्मदिनानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक या शिल्पावर चितारलेली आहे. तर अन्य शिल्पांवर देव-देवता, पौराणिक प्राणी कोरण्यात आलेले आहेत. ऑटोमन साम्राज्याचे तत्कालीन ब्रिटिश राजदूत तसेच सातवे अर्ल ऑफ एलिग्न थॉमस ब्रुस यांनी १९ शतकाच्या पूर्वार्धात पार्थेनॉन मंदिरातून हलवले होते. त्यानंतर ही शिल्पे १८१६ मध्ये ब्रिटनमध्ये आणण्यात आली.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

२) अखिल भारतीय न्यायिक सेवा

संविधान दिनानिमित्त (२६ नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी “अखिल भारतीय न्यायिक सेवा” अशी व्यवस्था राबविण्याविषयी भाष्य केले.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील संविधानातील महत्त्वाच्या तरतुदी आणि शासन धोरण या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

तुमच्या माहितीसाठी :

अखिल भारतीय न्यायिक सेवा ही व्यवस्था सर्व राज्यांसाठी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आणि जिल्हा न्यायाधीशांच्या स्तरावरील न्यायाधीशांच्या भरतीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करते. ज्याप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) देशभरातून केंद्रीय नागरी सेवेसाठी भरती प्रक्रिया राबविली जाते आणि या परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना देशभरातील केडरमध्ये नियुक्त केले जाते, त्याप्रमाणेच कनिष्ठ न्यायव्यवस्थेतील न्यायाधीशांची भरती केंद्रीय करण्याचा प्रस्ताव आहे. यात यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना राज्यांमध्ये नियुक्त केले जाईल.

संविधानाच्या अनुच्छेद ३१२ नुसार केंद्रीय नागरी सेवा आयोगाप्रमाणे ‘अखिल भारतीय न्यायिक सेवा’ (AIJS) व्यवस्थेची स्थापना करण्याची सोय करण्यात आलेली आहे. या अनुच्छेदानुसार, “राज्यसभेने उपस्थित असलेल्या व मतदान करणाऱ्या तिच्या सदस्यांपैकी कमीतकमी दोन तृतीयांश सदस्यांनी पाठिंबा दिलेल्या ठरावाद्वारे जर तसे करणे राष्ट्रहितार्थ आवश्यक किंवा इष्ट आहे, असे घोषित केले असेल तर संसदेला, कायद्याद्वारे संघराज्ये आणि राज्ये यांच्यासाठी एक किंवा अनेक अखिल भारतीय सेवा (अखिल भारतीय न्यायिक सेवा धरून) निर्माण करण्याची तरतूद करता येईल.”

अनुच्छेद ३१२ (२) नुसार, खंड (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या अखिल भारतीय न्यायिक सेवेमध्ये, अनुच्छेद २३६ मध्ये व्याख्या केलेल्या जिल्हा न्यायाधीशाच्या पदापेक्षा कनिष्ठ असलेल्या कोणत्याही पदाचा समावेश असणार नाही. (शहर दिवाणी न्यायालय न्यायाधीश, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, सह जिल्हा न्यायाधीश, सहाय्यक जिल्हा न्यायाधीश, स्मॉल कॉज न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, मुख्य न्यायदंडाधिकारी, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, सत्र न्यायाधीश, अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि सहाय्यक सत्र न्यायाधीश… यांचा जिल्हा न्यायाधीश म्हणून समावेश आहे)

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

३) गुरुपतवंतसिंग पन्नू

न्यूयॉर्कमधील एका दहशतवाद्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेने थेट भारताकडे बोट दाखविले आहे. निखिल गुप्ता या भारतीयाविरोधात आरोप निश्चित करण्यात आले असून त्याने एका भारतीय अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून हा कट रचल्याचा दावाही आरोपपत्रात करण्यात आला आहे. या दहशतवाद्याचे नाव गुरपतवंतसिंग पन्नू असून तो खलिस्तानी समर्थक आहे.

परीक्षेसाठी महत्त्वाचे का?

हा विषय यूपीएससी पूर्व परीक्षेतील चालू घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना तसेच मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या घटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे गुरपतवंतसिंग पन्नू नेमका कोण आहे? अमेरिकेने नेमका काय आरोप केला आहे? अमेरिकेच्या आरोपांवर भारताची भूमिका काय? आणि या आरोपांमुळे भारत-अमेरिका संबंधांवर कितपत परिणाम होईल? यासंदर्भात माहिती असणे आवश्यक आहे.

तुमच्या माहितीसाठी :

गुरुपतवंतसिंग पन्नू हा अमृतसरच्या शेजारी असलेल्या खानखोट या गावातील असून त्याने १९९० मध्ये पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. तो सध्या अमेरिकेत असून तिथे वकीलीचा व्यवसाय करतो. तो काही दिवस कॅनडातील खलिस्तान्यांच्या चळवळीतही सक्रीय होता. तसेच तो न्यूयॉर्कमधील शीख ऑफ जस्टीस या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे. ही संघटना २००७ मध्ये स्थापन करण्यात आली होती. या संघटनेच्या वेबसाईटनुसार, भारतातील शीख लोकांसाठी खलिस्तान हा वेगळा देश स्थापन करणे हा संघटनेचा उद्देश आहे. कॅनडातील पत्रकार टेरी मिलेव्स्की यांच्यानुसार, ‘बॅलेट नॉट बुलेट’ हे यासंघटनेचं ब्रीदवाक्य आहे.

पन्नू हा कॅनडा आणि अमेरिकेचा दुहेरी नागरिक आहे. खलिस्तानवादी चळवळीचा भाग म्हणून दहशतवादी कारवाया आणि कट-कारस्थान रचल्याचा आरोप त्याच्यावर आहे. भारत सरकारने २०२० मध्ये त्याला दहशतवादी घोषित केले. जानेवारी २०२१ मध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान हिंसाचारास चिथावणी दिल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात नोंदविण्यात आला होता. भारत सरकार आणि राज्यकर्त्यांविरोथात चिथावणी देणाऱ्या चित्रफिती तो समाजमाध्यमावरून प्रसृत करतो.

एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका, असे त्याने अलिकडेच एका चित्रफितीद्वारे धमकावले होते. १९८५ मध्ये कॅनडाहून भारताकडे निघालेले विमान खलिस्तानी फुटीरवाद्यांनी पाडले होते. त्यात सुमारे ३०० भारतीयांना प्राण गमवावे लागले होते, या घटनेचे यानिमित्ताने स्मरण झाले. खलिस्तानबाबत जगभरातील शिखांचे सार्वमत घेण्याचा प्रयत्न करत असल्याने भारत सरकार माझी हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप पन्नू याने बुधवारी नव्या चित्रफितीद्वारे केला.

यासंदर्भातील महत्त्वाचे लेख :

यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास आता ‘लोकसत्ता डॉटकॉम’सह! – यूपीएससी परीक्षेसंदर्भातील महत्त्वाचे लेख आणि प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही लोकसत्ताचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc key current affairs parthenon sculptures all india judicial servies and gurpatwant singh pannu lsca spb