उद्या (२४ ऑगस्ट) ‘वर्ल्ड किचन डे’ अर्थात ‘जागतिक परसबाग दिन’. यंदाचे वर्ष कौटुंबिक परसबागकाम वर्ष (Family Kitchen Gardening Year) म्हणून संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने जाहीर केले आहे. जगात ८४ कोटी लोक कुपोषित आहेत. त्यापैकी ६५ टक्के जनता ही एकटय़ा आशिया-पॅसिफिक प्रदेशात आहे. या लोकांचे पोषण होण्यासाठी कौटुंबिक शेतीवर भर द्यावा, असे युनोचे म्हणणे आहे. आपणही आपल्या कुटुंबासाठी शहरी सेंद्रिय शेती करू शकतो का? या विचाराचा ध्यास घेतला. घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला पिकविण्यासाठी शहरी शेती फुलविण्यासाठी गच्ची, गॅलरी किंवा अगदी खिडक्यांवरील ग्रिलचाही वापर करू शकतो. ही शहरी शेती तुमच्याच स्वयंपाकघरातल्या कचऱ्यावर वाढवता येईल, म्हणजे कुटुंबाला सेंद्रिय अन्न, भाज्या मिळेल आणि कचरा डेपोवरचा भारही हलका होईल. कुटुंबाचे पोषण आणि पर्यावरणाचे रक्षण दोन्ही साधणारी ही शेती आनंदही देईल तो विरळाच! स्वयंपाकघरातल्या देठ, साली यापासून घरात खत तयार करून त्यावर भाजीपाला घेण्याच्या प्रयोगांचा हा वेध..
छोटय़ाशा कुंडीतील तो कोंबही मला धरित्रीचे आपल्यावर ऋण असते, हेच तर शिकवत होता. मग सहजच माझी नजर कुंडय़ांमध्ये वाढणाऱ्या माझ्या सगळ्याच झाडांवर फिरली. पानओवा, आंबाडी, विलायती पालक, साधा पालक, अळू, व्हिटॅमिन नावाने ओळखले जाणारे झुडूप, कढीपत्ता हीच ती सारी मंडळी माझ्या कुटुंबाचे हिमोग्लोबीन सुरळीत ठेवण्यासाठी मला मदत करतात. खरं तर आपल्या प्रत्येकाचीच नाळ मातीशी जोडलेली असते. पंचमहाभूतांपासून आपला देह तयार होतो म्हणतात. कदाचित म्हणूनच आपल्या प्रत्येकाला निसर्गाची ओढ असते. हा निसर्गच माझ्या गॅलरीतील कुंडय़ांमधून अवतरला आहे.
आपली तीव्र इच्छा आणि थोडे श्रम घेतले तर आपल्या मुलाबाळांना घरच्या कुंडीत वाढणाऱ्या झाडांपासून अल्प प्रमाणात तरी पूर्णपणे सेंद्रिय अन्न मिळू शकते. याची तर आता मला खात्री पटू लागली. पूूर्वी कुंडीत पण रासायनिक खतांवर फुलझाडे वाढवणारी मी आता घरीच सेंद्रिय खत तयार करून कुंडीतच भाज्या वाढवण्याचे प्रयोग करू लागले. गॅलरी, गच्ची नाहीतर खिडकीचे ग्रिलही या रोपांसाठी पुरेसे असते. या नव्या प्रयोगांसाठी एक निमित्त घडले. माझ्या २० वर्षांच्या भाच्याला कर्करोगाने ग्रासले. मन दु:खाने गोठून गेले. त्याच्याबरोबर रुग्णालयात गेले तेव्हा १० ते ३० या वयातली खूप मुले मला कर्करोगाशी झुंज देताना दिसली. एकीकडे समाजात ८० वर्षांचे आजीआजोबा काठी धरून आजही ‘वॉक’ला जाताना दिसतात आणि दुसरीकडे ही कोवळी मुले! या संदर्भात खूप लोकांशी बोलले, बहुतांश जणांचा सूर एकच. आजकालच्या अन्नातली कमी झालेली पौष्टिकता. पूर्वीची हाडे कशी सकस अन्नावर पोसली जायची! दरम्यानच्या काळात शेतीचा-पॉलीहाऊसचा अभ्यास करताना मला समजले की अलीकडे कोणतंही उत्पादन घेण्यापूर्वी मातीसुद्धा रासायनिक द्रव्याने चक्क
मिरची, टोमॅटो, वांगी तर आलीच, पण करांदे, कणगर, सफेद रताळी, बिरमुळे यासारखे पौष्टिक कंदही कुंडीमध्ये धरले. तोंडली- कारल्याचे वेल वाढले. एकदा तर मातीत हाताला ५ बेबी बटाटे लागले तेव्हा कोण आनंद झाला!
घरच्या पानांची अळुवडी होऊ लागली. विलायती पालक, लसूणपात, व्हिटामिनचे झाड, लिंबे या खास झाडांनी पराठय़ाची चव वाढवली. बेल, तुळस, पातीचहाच्या पानांचा सर्दीसाठी काढा आणि ग्रीन टी होऊ लागला. १ लिटरच्या बाटलीत पुदीना वाढला. त्याचा सुंदर स्वाद चहाला मिळू लागला. बाटलीत मुळादेखील घेऊन पाहिला. या आमच्या भाज्या. त्यावर आमच्या कुटुंबाची गरज भागत नाही हे खरे, पण त्या इतर ‘बाजारी भाज्या’ नाहीत. त्या रसायनमुक्त, विषमुक्त भाज्या आमच्या कुटुंबात काही अंश रसायनं कमी करू शकल्या आणि ते दिवसेंदिवस अधिकाधिक कमी होईल यात शंका नाही.
मुंबईसारख्या काँक्रीटच्या जंगलात शहरी ‘शेती’ नक्की पिकेल, पण त्यासाठी हवी इच्छाशक्ती. समजा कुणाच्या घराला गॅलरी नसेल किंवा खिडकीला ग्रिल नसेल तर काय करणार? अशा वेळी सहकार्याने काम करावे. सोसायटीतील किंवा एका इमारतीतील लोकांनी एकत्र येऊन गच्चीचा उपयोग करावा. गच्चीवर ऊन चांगले मिळाल्याने झाडे सुंदर वाढू शकतील. तसेच प्रत्येक घरातील कचऱ्यापासून घरातच खत करावे आणि झाडांना घालावे. एकीचे बळ मोठे असते. फक्त हवी त्यासाठी इच्छाशक्ती आणि दिवसाची अवधी ९-१० मिनिटे! प्रत्येक इमारतीने जर आपल्या कुटुंबांना लागणारी रोपं स्वत: लावायला सुरू केली तर हा हा म्हणता आपल्या परिसरातील लोकांना रसायनमुक्त, सकस फळभाज्या, फळं खायला मिळतील आणि हळूहळू ही चळवळ होऊ शकेल.
‘इवलेसे रोप लावियेले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ ही ज्ञानेश्वरांची संतवाणी केवळ त्या रोपापुरती राहणार नाही; ती आपल्या बाळासाठीही उपयुक्त ठरेल. मोगरा फुलला.. फुले वेचिता बहरू कळियासी आला.. या अभंगातल्या मोगऱ्याचा बहर तुम्हाला तुमच्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वात दिसू शकेल. त्यासाठी गरज आहे फक्त ती इवलेसे रोप दारी लावण्याची!
घरच्या कुंडीतील औषधे
कोरफड- कोरफड कुंडीत लावताना मातीत थोडी वाळू मिसळावी. कोरफडीच्या पानांचा उपयोग रोज चमचाभर खाण्यासाठी, केसाला, चेहऱ्याला लावण्यासाठी करता येतो.
तुळस- रोज चहात पाने घालावी किंवा मुलाला एखादे पान खायला द्यावे.
अडुळसा आणि बेल- सर्दीसाठी तुळस, बेल आणि अडुळशाचा काढा सर्दी सुरू झाली की लगेच द्या, म्हणजे अँटिबायोटिक घेण्याची वेळ टळेल.
पुदिना- चटणीत वापरा किंवा चहात घाला.
शतावरी- याचे कोवळे कोंब सहज चावून खाऊ शकता. पौष्टिक असतात.
गवती पातीचहा- चहात वापरा किंवा सर्दीसाठी काढय़ात वापरा. एखाद्या चायनीज भाजीतही उत्तम लागतो.
आले- याची पाने चहात वापरू शकता किंवा कुंडीतले आले थोडे थोडे काढून जेवणात घेऊ शकता.
ऑरिगेनो, बेसिल, रोझमेरी, पार्सली, सेलरी या वनस्पतीही कुंडीमध्ये वाढवू शकता. ही यादी अशीच वाढत जाऊ शकते. फक्त एकेक गोष्ट करत जाऊ या, म्हणजे नवनवीन गोष्टी सापडत जातील.