रेणू दांडेकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचा आरसा तिथली मुलं असतात. मुलांमधील आत्मविश्वास, भविष्याचा वेध घेण्याची ताकद, आनंदी वातावरण, अशा अनेक गोष्टींतून काम बोलत असते. जयपूरमधली ‘बोध शिक्षा समिती’ची अशीच एक शाळा. आपल्याला माहीत असलेल्या शाळांपेक्षा इथली शिकवण्याची पद्धत खूप वेगळी आणि महत्त्वपूर्ण आहे. जाणीवपूर्वक आखलेला अभ्यासक्रम आणि मुलांमध्ये रमलेल्या  शिक्षिका यामुळे मुले जगण्यासाठी पूर्णपणे ‘तयार’ होतात..

जयपूरमध्ये ‘बोध शिक्षा समिती’ ही संस्था शिक्षणाची गुणवत्ता आणि दर्जा या क्षेत्रात काम करते. शिवाय इतर ठिकाणी चालणाऱ्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ही संस्था जशी मदत करते तशीच या संस्थेच्या स्वत:च्या जवळजवळ चाळीसच्या वर शाळा राजस्थानात आहेत.

योगेंद्र भूषण आणि त्यांचा परिवार हे काम पाहातात. प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, बालशिक्षण या क्षेत्रात वेगळं काही करू पाहाणारी ही संस्था राजस्थान सरकारबरोबरही शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्यासाठी काम करते. संस्थेत पोचण्यापूर्वी ‘गूगल’वर शोध घेऊन संस्थेविषयी जाणून घेतलेच होते, अनेक क्लिप्सही पाहिल्या. तेव्हाच जाणवलं एवढे पुरेसे नाही. प्रत्यक्ष पाहायला, बोलायला, जाणून घ्यायला हवेच. संपर्कासाठी खूप धडपड करावी लागली. अखेर एका रात्री ‘बोध’मध्ये उशिरा का होईना पण पोचले. मुलींच्या वसतीगृहाजवळ गेस्ट हाऊसही आहे. तिथे उतरले. रात्री मेसमध्ये जेवायला आलेल्या मुलींबरोबर गप्पा झाल्या. इथे संस्थेचे मुख्य कार्यालय तर आहेच, पण बारावीपर्यंत असणारी मुलींची ‘मानसगंगा’ नावाची शाळाही आहे. सकाळी उठून अलवर जिल्ह्य़ातील शाळा पाहायला जायचं ठरलं होतं.

शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचा आरसा तिथली मुलं असतात. मुलांमधील आत्मविश्वास, भविष्याचा वेध घेण्याची ताकद, आनंदी वातावरण अशा अनेक गोष्टींतून काम बोलत असते. इथे राहाणाऱ्या मुली अशा भागातून येतात ज्यांना शिक्षणाची संधी, सोय नाही. त्यामुळे मुलींना ही जाणीव होती. मुलींबरोबर त्यांच्या तिथे रहाणाऱ्या शिक्षिकाही भेटल्या. मुलींनी मोकळेपणाने गप्पा मारल्या. उद्या काय काय पाहायचंय, कुणाकुणाला भेटायचंय, काय काय बोलायचंय याची तयारी करत करतच झोपी गेले. अशा ठिकाणी लवकर जाग येते. तसंच झालं. लवकर आवरून मी बाहेर पडले. माझ्याही आधी उठलेल्या मुली कामात दंग होत्या.

सगळ्यात आधी योगेंद्र यांना भेटायला हवं. सगळं जाणून घ्यायला हवं. कसं भेटावं त्यांना?असा विचार करत असतानाच एक मुलगी म्हणाली ‘‘ते समोरच राहतात.’’ समोर तर मुलींचे वसतीगृह होते. तिथे कुठे राहात असतील ते? मी विचार करत असतानाच एक भारदस्त व्यक्ती गॅलरीत आली. पांढरी स्वच्छ दाढी, खादीचा कुडता.. तेच होते योगेंद्र! मी कुठून आलेय ते त्यांना सांगितलं पण ते म्हणाले, ‘‘अभी तो मैं नही मिल सकता लेकिन १२ बजे के बाद शायद मिलेंगे।’’ थोडीशी निराश होऊन मी तशीच उभी होते. पण ते केव्हाच आत निघून गेले होते. फोनवर मी मीनाक्षी दीदींशी बोलले होते. त्यांची चौकशी केली तर त्या १० वाजता येणार होत्या. ‘चला तर आधी इमारतींशी गप्पा मारू या.’ असं म्हणून मी फिरत होतेच. संस्थेचं वेगळेपण जाणवू लागलं. अर्धवर्तुळाकार इमारत नि त्या मधोमध संस्थेचे अद्ययावत कार्यालय आहे. समोरच संस्थेचं बोधवाक्य लिहिलंय नि बऱ्याच ठिकाणी आपले शिक्षणविषयक विचार व्यक्त करणारी कविताही मोठय़ा अक्षरात लिहिलीय. एका बाजूला प्रशासकीय कामं करणारा संगणकीय विभाग आहे, एका बाजूला स्वागत कक्ष आहे. समोरच ‘बोध’ला मदत करणाऱ्या विविध संस्थांची चिन्हं नि वर बोधवाक्य आहे. डाव्या बाजूला योगेंद्र यांचं ग्रंथालय आणि त्यांची खोली आहे नि उजव्या बाजूला लहानसं चर्चा कक्ष आहे. परिसर हिरवागार आहे. ऑफिसच्या मागच्या बाजूला वर्ग आहेत. तळ मजल्यावर कलादालनं (संगीत, चित्रकला, पपेटस्, मातीकाम आदी) आहेत नि तिथेच प्रधान आचार्य आणि इतर अध्यापक कक्ष आहे. तर उरलेल्या अर्ध्या गोलात संशोधन विभाग आहेत. प्रत्येक विषयाचा ‘रिसर्च सेक्शन’ आहे. इथेच अध्यापक आणि संशोधक परस्परांना भेटतात. अनुभव सांगतात, अपेक्षित बदल नोंदवतात, अभ्यासक्रम पाठय़पुस्तके यावर चर्चा होते, त्याप्रमाणे संशोधक विचार करून थेअरी आणि प्रॅक्टिकल यात बदल करतात.

इथे सर्व कामांच्या नोंदीसाठी स्वतंत्र विभाग आहे. मैदानावर विविध आकार (पृथ्वी, सूर्यमाला, विज्ञान प्रयोग, खेळ) मोठय़ा आकारात तयार केले आहेत. वर्गातली बाकांची रचनाही मुलींना चर्चा करता येईल अशी आहे. चार बाकं एकत्र जोडलेली असून त्यांची रचना अशी केलीय की आठ-दहा जणींचा गट गोलात बसून चर्चा करेल. एका बाजूला रॅक नि त्यात प्रत्येकाविषयी नोंद असणारी फाइल आहे. याला मूल्यमापन म्हणता येईल. अनेक विषय मुली चर्चा, कृती, निरीक्षण करत शिकतात. वाचन साहित्य, शिक्षण साहित्य वर्गातच आहे नि मुली शाळेत वेळेपूर्वी आपणहून येतात. हे साहित्य वापरतात. या साहित्याच्या मांडणीत वारंवार बदल केला जातो. उपक्रमातून होणारे बदल नोंदवण्याची पद्धत मला विशेष वाटली. आपल्याकडे उपक्रम खंडीभर केले जातात, पण त्यांचा परिणाम मोजला जातोच असं नाही. इथे मुलांच्या फाइल्स बघताना हे जाणवलं की उपक्रमांचा परिणाम मोजला जातोय. हा परिणाम सर्व मुलांचा नाही तर प्रत्येक मुलाचा व्ययक्तिकरीत्या मोजला जातोय.

काही वेळ गेल्यानंतर पुन्हा मी कार्यालयामध्ये आले. मीनाक्षीताईंची भेट झाली. तेव्हा त्यांनाही बोलायला वेळ नव्हता. पुन्हा वर्गाकडे वळले. इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग जिथे जमले होते त्या मैदानात आले. मुलं लोकगीतं,  वेगवेगळी गाणी म्हणत होती. त्यांच्यात त्यांच्या शिक्षिकापण होत्या. इथे शिक्षकाच्या जोडीला एक मदतनीस असतो. काही वेळाने सगळेजण नाचायला लागले. नाचगाण्यात दंग झाले. गाऊन – नाचून मुलं दमली होती. मग कळलं की हाच त्यांचा परिपाठ होता. प्राणायाम, योगासन हे काहीच नव्हतं. जाता जाता पूर्व प्राथमिक इयत्तांच्या वर्गात डोकावले तेव्हा लक्षात आलं इथेही वेगळेपण आहे. वर्ग चकचकीत होते. अद्ययावत शैक्षणिक साधनं होती, भरपूर खेळणी होती, मुलं सामान्य आर्थिक स्तरातील होती. बाई गाणं नाचून शिकवत होत्या, ज्याला जमत नव्हतं त्याला जवळ घेऊन शिकवत होत्या. गाणं झाल्यावर बाईंच्या भोवती मुलांनी गराडा घातला होता. खूप वेगवेगळ्या गाण्यांचा संग्रह इथे दिसला. गोष्टी विविध माध्यमातून मुलांपर्यंत जात होत्या.

आता मी आले होते पाचवी ते बारावी इयत्तेच्या वेगवेगळ्या विभागांत. मुलं एकाजागी नि शिक्षक वर्ग बदलतात असं दृश्य सामान्यत: सगळीकडे दिसतं. इथे मात्र मुलं वर्ग बदलतात. सर्वच विषयांचे विभाग साधनं, साहित्य यांनी समृद्ध होते. मुलांना शिकण्याचं ते माध्यम होतं असं जाणवलं. त्या माध्यमातून आपापल्या पद्धतीने शिकण्याचा आनंद मुलींच्या चेहऱ्यावर जाणवत होता. ज्या वर्गात बसले होते तो वर्ग नववीचा आणि तास गणिताचा होता तरीही मुली आनंदात होत्या. मुली बोलत होत्या, उत्तरं देत होत्या, शंका विचारत होत्या नि जिला शंकेचं निरसन करता येत होतं ती ते करत होती.

त्यांचे शिक्षक म्हणाले, ‘‘बीजगणित-भूमिती प्रत्यक्ष जगण्यात आणतो आम्ही. प्रत्यक्ष अनुभूती देतो.’’ ‘परिमाप एवं क्षेत्रफळ’ असा घटक होता. आधीच्या तासाला काय शिकलो हे मुलीच फळ्यावर नोंदवत होत्या. ज्या टप्प्यावर अर्थ स्पष्ट झाला नाही तिथे सरांनी मुलींचे गट ताबडतोब केले, (साधनं शोधावी लागली नाहीत की कमीही पडली नाहीत.) साधनं घेऊन जेवढे गट तेवढी ठिकाणे नक्की करून मुलींना त्या त्या ठिकाणी जायला सांगितलं नि परत येण्याची वेळ सांगून मुली बाहेर गेल्याही. परत आल्यावर काय सादर करायचं हेही सांगितलं गेलं. या सगळ्यात मन:पूर्वक नियोजन होतं. मुली म्हणाल्या, ‘‘आम्हाला गणित खूप आवडतं. आमचं आम्ही शिकतो. मजा येते.’’ जरा पुढे आले तर अकरावीचा समाजशास्त्राचा तास योगेंद्रसर घेत होते. रोजच ते हा तास घेतात. संस्थेचे संस्थापक रोज मुलींच्या एका विषयाचा तास घेतात हेच मुळी आश्चर्यकारक होतं. समाजशास्त्राचा तास ते हेतूपूर्वक घेतात कारण संस्थेचं मिशन प्रत्यक्षात यावं, मुलींशी संवाद साधता यावा.. खूप वेगळ्या रीतीने ते हा विषय शिकवत असावेत, कारण मुलींचं बोलणं आणि वर्गातलं वातावरण!

फिरताना प्राचार्याची भेट झाली. नोंद वह्य़ा, नोंदी करण्याची पद्धत, कमीत कमी लिखापढी, संस्थेची स्वत:ची मूल्यमापन पद्धत, गुणवत्तेत वाढ करण्याच्या प्रयत्नांची दिशा, काम आणि संशोधन यांची एकरूपता, प्राचार्याचे सर्व वर्गाशी, सर्व विषयांशी असलेलं नातं.. अशा अनेक गोष्टी पाहात होते. नवल वाटत होतं. पपेट्सच्या वर्गात पारंपरिक, आधुनिक सर्व प्रकारच्या प्रतिकृती होत्या, त्या त्या राज्याची लोककला यातून टिकवून ठेवली जात असावी. संगीताच्या वर्गात संगीत विशारद झालेली तरुण शिक्षिका तिसरी, पाचवीतल्या मुलींना शास्त्रीय संगीताचे धडे देत होती. त्यांचं असं गाण्यांचं पुस्तक आहे नि मुलींची खूप गाणी (लोकगीतं नि शास्त्रीय संगीत) पाठ होती. सगळं कसं जिवंत, चैतन्यमय वातावरण होतं..

(क्रमश:)

शाळेचा पत्ता- बोध शिक्षा समिती / कुकर्सजवळ / जयपूर (राजस्थान)

http://www.bodhashikshansamiti.org

renudandekar@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shrujanachya navya vatta article by renu dandekar