Air India Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेने संपूर्ण देशाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर अनेक हृदय पिळवटून टाकणार्‍या कहाण्या समोर येत आहेत. या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये जयप्रकाश चौधरी या एका मजूराच्या मुलाचा देखील समावेश आहे. जयप्रकाश हा बीजे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दुसर्‍या वर्षात वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. कॉलेजमध्ये जाणारा त्याच्या कुटुंबातील तो पहिलाच व्यक्ती होता, इतकेच नाही तर तो जिवंत राहिला असता तर त्याच्या अगदी राजस्थानच्या दुर्गम बाडमेर येथील बोर चरणन गावातील तो पहिला डॉक्टर बनला असता.

अहमदाबादहून लंडनला २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्सना घेऊन जाणारे B787 बोइंग ड्रीमलायनर हे एअर इंडियाचे विमाना उड्डाण केल्यानंतर लगेचच बीजे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या वसतिगृहावर कोसळले. या दुर्घटनेत अवघे २० वर्ष वय असलेल्या जयप्रकाश याचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स यांच्यापैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर वसतिगृहाच्या दुसर्‍या मजल्यावरील मेसमध्ये उपस्थित असलेले चार वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि एका डॉक्टरची पत्नी असे पाच जण ठार झाले आहेत. यापैकी विमानात असलेले ११ जण आणि जयप्रकाश असे १२ जण हे राजस्थानचे आहेत.

कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, दुपारच्या जेवणासाठी जाण्यापूर्वीच जयप्रकाशचे त्यांच्याशी फोनवरून बोलणे झाले होते. दोन वर्षांपूर्वी जयप्रकाशने नीटच्या परीक्षेत ७२० पैकी ६८६ गुण मिळवून सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. त्याच्या मागे आता त्याचे वडील, आई आणि शाळेत जाणारी भावंडे आहेत.

“आम्हाला जे सांगण्यात आलं त्यानुसार, जयप्रकाशने त्याचे दुपारचे जेवण संपवले होते आणि तो त्याचे हात धुवत होता जेव्हा विमान त्यांच्या हॉस्टेलच्या इमारतीवर कोसळलं. अपघातानंतर उडालेला भडका आणि अवशेषांचे वजन या दोन्हींमुळे त्यांचा मृत्यू झाला. प्राथमिक अहवालात त्याचे शरीर ३० टक्के भाजल्याचे सांगण्यात आले,” असे कुटुंबातील सदस्याने सांगितले.

शुक्रवारी त्यांच्या कुटुंबियांनी त्याचे पार्थिव गावात परत आणले तेव्हा बाडमेरच्या जिल्हाधिकारी टीना दाबी यांच्यासह अनेक अधिकारी श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल झाले होते.

या अपघातात जीव गमावलेला जयप्रकाश हा एकमेव तरुण नव्हता. उदयपूरच्या सहेली नगरमध्ये, संगमरवरी व्यापारी संजीव मोदी यांच्या दोन्ही मुलांचा – मुलगा शुभ (२५) आणि मुलगी शगुन (२३) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यामुळे त्यांच्या घरी देखील शोककळा पसरली आहे. हे दोघेही सुट्टीसाठी लंडनला जात होते.