Chinnaswamy Stadium Stampede Video: रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं १८ वर्षांनंतर आयपीएल जेतेपदावर नाव कोरल्यानंतर बंगळुरूसह संपूर्ण कर्नाटकमध्ये आणि देशभरातील आरसीबीच्या चाहत्यांनी जल्लोष साजरा केला. RCB च्या टीमचं बुधवारी बंगळुरूमध्ये मोठ्या उत्साहात स्वागतदेखील करण्यात आलं. आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागलं. बुधवारी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेवेळी नेमकं काय घडलं, याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो चेंगराचेंगरी सुरू होण्याच्या काही वेळ आधीचा असल्याचं सांगितलं जात आहे.
चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर काय घडलं?
आरसीबी संघाच्या कौतुक सोहळ्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मोठी व्यवस्था करण्यात आली होती. पण दुर्दैवाने कर्नाटक सरकारने स्टेडियमबाहेर गर्दीचं नियंत्रण करण्यासाठीच्या व्यवस्थेमध्ये मात्र ढिसाळपणा केल्याचं उघड झालं. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठ्या संख्येनं चाहत्यांची गर्दी जमली, मात्र ती नियंत्रित करण्यासाठीची व्यवस्था ढिसाळ असल्याचं या चेंगराचेंगरीतून स्पष्ट झालं. त्यातच फ्री पासेसची एक अफवा गर्दीत उसळली आणि ढकलाढकलीला सुरुवात झाली.
गेट क्रमांक एक व तीनवर प्रामुख्याने ही गर्दी उसळल्याचं दिसून आलं. संध्याकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी गेट क्रमांक एक उघडण्यात आलं आणि तिथून तिकीट नसलेल्या चाहत्यांना मोफत प्रवेश देण्यात येऊ लागले. यातून मोठी गर्दी त्या दिशेनं वळली आणि त्या गेटच्या बाहेर चेंगराचेंगरी झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आधी तीन मुली गर्दीत खाली पडल्या, त्यानंतर गोंधळात आणखी काहीजण पडले आणि तुफान चेंगराचेंगरी झाली.
चेंगराचेंगरीआधीचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, आता चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी सुरू होण्याआधी नेमकं काय घडलं, याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये आरसीबीच्या चाहत्यांची तुफान गर्दी गेटजवळ दिसत आहे. या गर्दीच एक मुलगी खाली पडल्याचं दिसून येत आहे. काही चाहते या गर्दीला बाजूला करून या मुलीला उभं करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण गर्दीत तरीही ढकलाढकली होताना पाहायला मिळत आहे. यातूनच पुढे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. या दुर्दैवी घटनेत ११ चाहत्यांचा मृत्यू झाला तर ३३ जण जखमी झाले.
कर्नाटक सरकारचा हात झटकण्याचा प्रयत्न
एकीकडे ढिसाळ व्यवस्थेमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा बळी गेलेला असताना दुसरीकडे कर्नाटक सरकारकडून मात्र जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एवढी गर्दी तिथे येईल याचा अंदाजच सरकारला नव्हता अशी भूमिका मांडली आहे.
सरकारनं या दुर्घटनेवर दिलगिरी व्यक्त केली असली, तरी एवढ्या मोठ्या गर्दीसाठी आवश्यक असणारं नियोजन का करण्यात आलं नव्हतं? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.