Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत आता एक बेताल वक्तव्य केलं आहे. भगवंत मान म्हणाले भाजपाने ऑपरेशन सिंदूरची खिळ्ली उडवली आहे. आता काय वन नेशन वन हसबंड योजना आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. लुधियाना या ठिकाणी असलेल्या पोटनिवडणुकीच्या आधी भाजपाने ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा प्रचारात उपस्थित केला. त्यावर बोलत असताना भगवंत मान यांनी हा प्रश्न उपस्थित केला आह. ज्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होते आहे.

काय म्हणाले भगवंत मान?

“भाजपाने आता ऑपरेशन सिंदूरचं नाव घेऊन मतं मागण्यास सुरुवात केली आहे. या भाजपाच्या लोकांनी ऑपरेशन सिंदूरची खिल्ली उडवली आहे. प्रत्येक घरात सिंदूर पाठवत आहेत. आता काय मोदींच्या नावाचा सिंदूर लावणार का? ही काय वन नेशन वन हसबंड योजना आहे का?” असा सवाल भगवंत मान यांनी केला आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

ममता बॅनर्जी यांनीही केली होती टीका

भगवंत मानच नाही तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही भाजपावर टीका केली होती. ऑपरेशन सिंदूर हे नाव भाजपाने राजकीय फायदा मिळवण्यासाठी ठेवलं आहे असं मला म्हणायचं नाही. पण आधी मोदी स्वतःला चहावाला म्हणायचे, मग चौकीदार म्हणायचे, आता सिंदूर विकायला आले आहेत असं ममता बॅनर्जींनी म्हटलं होतं.

ऑपरेशन सिंदूर मे महिन्यात राबवण्यात आलं

पहलगाम या ठिकाणी जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे हे समजल्यानंतर भारताने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर राबवत उत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक करत ९ ठिकाणचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले.

एससी समाजासाठी जाहीर करण्यात आली कर्जमाफी

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ३ जूनला पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पंजाबच्या एससी समाजासाठी कर्जमाफी जाहीर केली. यावेळी मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले आम्ही जी आश्वासनं देतो ती पूर्ण करतो. आम्ही जो अर्थसंकल्प सादर केला त्यात कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आम्ही पूर्ण केलं आहे. आम आदमी पार्टीला व्होट बँक वगैरेचा विचार करत नाही. पंजाबमध्ये आमच्या आधीच्या सरकारांनी फक्त त्यांच्या व्होट बँकेचा विचार केला. आमचं सरकार तसं मुळीच नाही. असंही भगवंत मान यांनी म्हटलं आहे.