RCB Victory Parade Bengaluru Stampede Updates: आरसीबीच्या विजयी परेडमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीच्या घटनेत १५ जणांपेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत किमान १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे. तसेच ४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचंही सांगितलं जात आहे. आता या घटनेवर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी प्रतिक्रिया दिली असून नेमकं घटना कशामुळे घडली? याची माहिती सांगितली आहे.

उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार काय म्हणाले?

“चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात पोलीस आयुक्तांसी मी बोललो आहे. तसेच आता मी रुग्णालयात जाऊन जखमींशी संवाद साधणार आहे. या घटनेत किती जणांचा मृत्यू झाला हे आत्ता सांगता येणार नाही. आम्ही नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत आहोत. आम्ही आरसीबीच्या विजयी परेडचा कार्यक्रम देखील १० मिनिटांत आटोपला आहे. तसेच सर्व परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत”, असं उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटलं आहे.

‘अभिमान असू द्या, पण जीवनापेक्षा मोठा नाही’

आरसीबी विजय परेड दरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. डीके शिवकुमार यांनी म्हटलं की, “आरसीबीच्या विजय उत्सवाचा साक्षीदार असलेल्या लोकांना या दुर्घटनेमुळे खूप वेदना झाल्या आहेत. या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना माझी संवेदना आहे. आरसीबी विजयाचा अभिमान असू द्या, पण जीवनापेक्षा मोठा नाही. मी सर्वांना सुरक्षित राहण्याचं आवाहन करतो”, असं एक्सवरील पोस्टमध्ये डीके शिवकुमार यांनी म्हटलं.

भाजपाची कर्नाटक सरकारवर टीका

आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना भाजपाने कर्नाटक सरकारवर टीका केली आहे. भाजपाचे नेते बीवाय विजयेंद्र यांनी म्हटलं की, “या दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी कर्नाटक सरकारने घेतली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश कर्नाटक आरसीबीच्या विजयाचा आनंद साजरा करत होतं तेव्हा कर्नाटक सरकारने कोणतीही पूर्व तयारी न करता विजय रॅली काढण्याची घाई केली. त्यामुळे ही दुर्घटना घडली. कर्नाटक सरकारने पूर्वतयारी केली नाही, त्यांना फक्त प्रसिद्धीमध्ये जास्त रस होता. याचा परिणाम या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला. तसेच काही लोकांवर उपचार सुरु आहेत. मी आता काही पीडितांशी बोललो आहे, त्यांनी सांगितलं की रुग्णवाहिकेची सुविधा नव्हती. या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी”, अशी मागणी बीवाय विजयेंद्र यांनी केली.