शिक्षण हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. मात्र आजकाल मुलांना शिक्षण देणं हे खर्चिक होत चाललं आहे ही वस्तुस्थिती आहे. इंग्रजी माध्यमातल्या शाळांची वार्षिक फी खूप जास्त आहे. याबाबत चर्चाही होत असते. पालक आवाजही उठवत असतात. पण या शाळांची फी काही कमी झालेली नाही. गुरुग्राममधल्या एका माणसाने त्याच्या मुलाची तिसरीची महिन्याची फी ३० हजार रुपये असल्याचं म्हटलं आहे. तसंच सोशल मीडियावर पोस्ट करुन आपलं म्हणणं मांडलं आहे.

उदीत भंडारी यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर मांडली व्यथा

उदीत भंडारी यांनी एक्स पोस्ट करत असं म्हटलं आहे की माझ्या तिसरीतल्या मुलाची सध्याची शाळेची एका महिन्याची फी ३० हजार रुपये आहे. तिसरीत असून त्याची इतकी फी आहे. शाळेने दरवर्षी १० टक्के फी वाढ केली तर माझा मुलगा १२ वी ला जाईपर्यंत त्याची वर्षाची फी जवळपास ९ लाख रुपये होईल.

उदीत भंडारी यांनी केलेली पोस्ट व्हायरल

उदीत भंडारी यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. उदीत भंडारी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात गुरुग्रामची शाळा कुठलंही योग्य कारण न देता फी वाढवत आहे. आम्ही पालकांनी याबाबत प्रश्न विचारला की ते खुशाल सांगतात तुम्हाला शाळा बदलायची असेल तर बदला. माझा मुलगा तिसरीत आहे त्याची दर महिन्याची फी ३० हजार रुपये आहे. तो बारावीत जाईपर्यंत त्याची वर्षाची फी नऊ लाख रुपये होऊ शकते.

पालकांनी व्यक्त केला संताप

उदीत भंडारी यांच्या व्हायरल पोस्टनंतर अनेक पालकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलं आहे की माझा मुलगा ज्या शाळेत जातो तिथेही अशीच अवस्था आहे. दरवर्षी १० टक्के फी वाढही ठरलेली. तसंच महागडी पुस्तकंही शाळाच देते. स्टेशनरीही बाहेरुन घ्यायची नाही शाळेतूनच. दरवर्षी गणवेश आणि बूट बदलतात म्हणजे आदल्या वर्षीचे गणवेश आणि बूट पुढच्या वर्षी वापरता यायला नकोत. असं म्हणत पालकांनी व्यथा मांडली आहे.

हे पण वाचा- Health Special : टीनेजर्स मुलं आणि आईवडील यांच्यात संघर्ष का होतो?

आणखी एका युजरने म्हटलं आहे माझ्या मित्राची मुलगी बंगळुरुच्या एका इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळेत दुसऱ्या इयतेत्त शिकते. तिची वर्षाची फी ८ लाख रुपये आहे. त्यात जेवण आणि ट्रान्सपोर्ट या सेवाही प्रदान करण्यात आल्या आहेत. त्याच्या शाळेतही दरवर्षी १० टक्के फी वाढ केली जाते. ही मुलगी जेव्हा बारावीत जाईल तेव्हा तिची वार्षिक फी ३५ लाख रुपये झाली असेल. काही युजर्स असंही म्हणत आहेत की मुलांचं होम स्कुलिंग करा. त्यांना घरीच शिकवा. कारण शाळा असंही चांगल्या दर्जाचं शिक्षण घेत नाही आणि भरमसाठ फी घेतात. पालकांची एक संघटना असली पाहिजे जी याविरोधात आवाज उठवेल असंही एका युजरने सुचवलं आहे.