Bangladesh on India-Pakistan Tension: पाकिस्तानचे सैन्य बांगलादेशमधील जनतेवर अत्याचार करत असताना भारताने आपल्या सैन्याच्या मदतीने बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले होते. मात्र आता बांगलादेश चीनच्या जोरावर भारताविरोधातच गरळ ओकू लागला आहे. बांगलादेशच्या लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी आणि सध्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे निकटवर्तीय असलेल्या एएलएम फझलूर रहमान यांनी भारताविरोधात विधान केले आहे. ‘भारताने जर पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशने ईशान्य भारतातील राज्ये ताब्यात घ्यावीत’, असे विधान त्यांनी केले.
निवृत्त लष्करी अधिकारी एएलएम फजलूर रहमान यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून सदर विधान केले आहे. तसेच बांगलादेशने आतापासूनच चीनशी संयुक्त लष्करी कारवाईबाबत संवाद सुरू करावा, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.
“भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास बांगलादेशने ईशान्य भारतातील सर्व सात राज्य ताब्यात घ्यावीत. या विषयासंदर्भात चीनबरोबर संयुक्त लष्करी कारवाई करण्यासाठी आतापासूनच चर्चा सुरू करावी, असे मला वाटते”, अशा आशयाची एक पोस्ट रहमान यांनी फेसबुकवर लिहिली आहे. एएलएम फजलूर रहमान हे २००९ साली घडलेल्या बांगलादेश रायफल्स (बीडीआर) हत्याकांडाची चौकशी करणाऱ्या राष्ट्रीय स्वतंत्र चौकशी आयोगाचेही अध्यक्ष आहेत.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर बांगलादेशचे हे विधान समोर आले आहे. मात्र बांगलादेशच्या अंतरिम सरकारने फजलूर रहमान यांच्या विधानापासून अंतर राखले आहे. मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या कार्यालयातील प्रेस सचिव शफीकुल आलम यांनी म्हटले की, फजलूर रहमान यांनी केलेले विधान त्यांचे वैयक्तिक मत आहे.
शफीकुल आलम पुढे म्हणाले, “अंतरिम सरकार कोणत्याही प्रकारची भूमिका जाहीर व्यक्त करत नाही आणि रहमान यांनी केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही. बांगलादेश सर्व राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचा आणि स्वातंत्र्याचा आदर करतो. तसेच इतरांकडूनही याचप्रकारची अपेक्षा ठेवतो. मेजर जनरल फजलूर रहमान यांनी केलेली टिप्पणी वैयक्तिक असून त्यात बांगलादेश सरकारला ओढू नका, असे आवाहन आम्ही करत आहोत.”
मोहम्मद युनूस यांचा चीन दौरा
अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी अलीकडेच चीनचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी बांगलादेशबरोबर चीनने व्यापार वाढवावा, असे आवाहन केले. तसेच ईशान्य भारतातील राज्यांबाबतही मोठे विधान केले होते.
युनूस म्हणाले, “भारताच्या ईशान्येकडील असलेली सात राज्यांना सेव्हन सिस्टर म्हटले जाते. या सातही राज्यांच्या सीमा इतर देशांच्या सीमांनी वेढलेल्या आहेत. या भागातून समुद्राकडे जाण्याचा कोणताही मार्ग नाही. त्यामुळे या महासागराचे आम्ही एकमेव रक्षक आहोत. ही एक मोठी संधी असून या माध्यमातून चीनच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होऊ शकतो.”