Cyber Attack Attempts From Pakistan: पहलगाम दहशवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊल उचलली आहे. यामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात आता पाकिस्तानातून भारतीय संकेतस्थळांवर सातत्याने सायबर हल्ले करण्याचे प्रयत्न होत आहेत. “सायबर ग्रुप HOAX1337” आणि “नॅशनल सायबर क्रू” सारख्या पाकिस्तान-पुरस्कृत हॅकर गटांनी काल (गुरुवारी) काही संकेतस्थळे हॅक करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. सायबर सुरक्षा संस्थांना पाकिस्तानातून हॅकिंगचे होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ते परवून लावले.
ताज्या सायबर हल्ल्यात, आर्मी पब्लिक स्कूल नागरोटा आणि सुंजवानच्या संकेतस्थळांना लक्ष्य करण्यात आले होते. ज्याद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची खिल्ली उडवणाच्या प्रयत्न करण्यात आला. दुसऱ्या एका घटनेत, माजी सैनिकांच्या आरोग्यसेवेशी संबंधित असलेल्या संकेतस्थळाचे स्वरूप विकृत करण्यात आले होते. सततच्या होणाऱ्या या सायबर हल्ल्यांमुळे पाकिस्तानच्या वाढत्या नैराश्याचे संकेत मिळत आहेत.
पाकिस्तानमधून काम करत असलेल्या हॅकर्सनी मुले, वृद्ध सैनिक आणि इतर निष्पाप लोकांशी संबंधित संकेतस्थळांवर हल्ले करण्याचे वारंवार प्रयत्न केले आहेत. २९ एप्रिल रोजी, मिशन-क्रिटिकल नॅशनल नेटवर्क अभेद्य असल्याचे आढळल्यानंतर पाकिस्तानने सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या कल्याणकारी आणि शैक्षणिक वेबसाइट्सकडे आपले प्रयत्न वळवले होते.
“आयओके हॅकर” इंटरनेट ऑफ खिलाफा या टोपणनावाने कार्यरत असलेल्या या गटाने संकेतस्थळांची मुखपृष्ठे खराब करण्याचा, ऑनलाइन सेवांमध्ये व्यत्यय आणण्याचा आणि वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न केला.
पाकिस्तानविरोधात भारताची कठोर पाऊले
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले चरण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून भारताने सिंधू जल करार स्थगित गेला आहे. तसेच भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याची आदेश दिले आहेत. भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्ताननेही त्यांची हवाई हद्द भारतासाठी बंद केली आहे. याचबरोबर हजारे भारतीय नागरिक पाकिस्तानातून मायदेशात परतले आहे.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याबाबत खुलासे
दरम्यान, केंद्र सरकारने पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. एनआयएने त्यांच्या प्राथमिक तपासात पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या नियोजनात आणि अंमलबजावणीत पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा, इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) आणि पाकिस्तानी लष्करातील घटकांचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे उघड केले आहेत.
एनआयएच्या तपासात असे आढळून आले आहे की, या भयानक हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यात त्यांची शस्त्रे लपवली होती, असे सूत्रांनी टाइम्स नाऊला सांगितले आहे. यासाठी त्यांना ओव्हरग्राउंड वर्कर्सकडून मदत मिळाली होती. ओव्हरग्राउंड वर्कर्सनी दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर महत्त्वाची माहिती पुरवल्याचा आरोप आहे. एनआयएच्या सूत्रांनुसार, दहशतवादी अजूनही दक्षिण काश्मीरच्या जंगलात लपले असण्याची शक्यता आहे.