गेल्या दोन दिवसांपासून कॅनडातील हरदीप सिंग निज्जर हत्या प्रकरणाची चर्चा जगभरात चालू झाली आहे. कारण या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप कॅनडानं केला असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील संबध ताणले गेले आहेत. अमेरिका व ऑस्ट्रेलियानं कॅनडाची बाजू घेतलेली असताना भारतानं कॅनडाच्या आरोपांना सडेतोड उत्तर देणं सुरूच ठेवलं आहे. दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केलेली असताना आता भारतानं एक मोठा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कॅनडातील व्हिसा सेवा बंद

खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणावरून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर गंभीर आरोप केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. आता भारत सरकारने कॅनडातील भारताची व्हिसा सेवा तात्पुरती बंद केली असून पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा स्थगित असेल, असं कॅनडातील व्हिसा केंद्राच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं आहे. भारतातून कॅनडामध्ये जाणाऱ्या व कॅनडातून भारतात येणाऱ्या असंख्य भारतीय व कॅनेडियन नागरिकांना या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

नेमकं प्रकरण काय

जून महिन्यात हरदीप सिंग निज्जरची हत्या करण्यात आल्यानंतर त्यावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी या हत्या प्रकरणात भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. भारताच्या कॅनडातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टीही केली. यावर भारतानंही हे आरोप फेटाळताना कॅनडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हकालपट्टी केली.

दोन्ही देशांनी एकमेकांच्या नागरिकांना विशेष सूचना जारी केल्या. या पार्श्वभूमीवर भारतानं कॅनडातील व्हिसा सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून व्हिसा केंद्राच्या संकेतस्थळावर ही बाब अधोरेखित करण्यात आली आहे.

Indians in Canada: “कॅनडातील हिंदू दहशतीच्या छायेखाली”, भारतावरील आरोपांनंतर कॅनडाच्या खासदाराचा दावा; म्हणाले, “खलिस्तानी…”

भारताच्या कॅनडातील भारतीयांना मार्गदर्शक सूचना

दरम्यान, कॅनडाच्या आरोपांनंतर भारत सरकारने कॅनडातील भारतीयांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. “कॅनडामधील भारतविरोधोी कारवाया, राजकीय पुरस्कृत द्वेष-गुन्हे आणि हिंसाचार पाहाता तिथे राहणारे भारतीय नागरिक व तिथे जाऊ इच्छिणारे भारतीय यांनी अतिशय काळजी घेणं आवश्यक आहे”, असं भारत सरकारकडून सांगण्यात आलं आहे”.

“कॅनडातील भारतविरोधी अजेंड्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना व भारतीय अधिकाऱ्यांना धोका पोहोचवण्याचे प्रयत्न झाले. या सर्व घटनांमुळे अशा धोकादायक ठिकाणी किंवा तशा घटना ठरण्याची शक्यता असणाऱ्या ठिकाणी प्रवास करणं भारतीय नागरिकांनी टाळावं. तिथल्या भारतीयांच्या सुरक्षेची हमी निश्चित करण्यासाठी आपले उच्चायुक्त कॅनडा सरकारच्या संपर्कात कायम राहतील. कॅनडातील परिस्थिती पाहाता विशेषत: भारतीय विद्यार्थ्यांनी अतिशय काळजी घेण्याची व कायम सतर्क राहण्याची गरज आहे”, असं या सूचनापत्रात नमूद करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India suspends visa service to canada allegations on hardeep singh nijjar murder case pmw