India Pakistan War Tensions: भारतानं मध्यरात्री केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्ताननं आता थयथयाट सुरू केला आहे. भारतावर निराधार आरोपांचा कांगावा करण्याबरोबरच पाकिस्तानकडून सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यापासून पाकिस्तानकडून वारंवार सीमेपलीकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार केला जात होता. आज पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून एअर स्ट्राईक केल्यानंतर काही वेळातच पाकिस्ताननं सीमेवर गोळीबार सुरू केला. भारतीय लष्करानंही त्याला चोख प्रत्युत्तर देत तिथेही पाकिस्तानला गप्प केलं!
नऊ ठिकाणी भारतीय हवाई दलाचा एअर स्ट्राईक
दरम्यान, भारतानं पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (POJK) आणि पाकिस्तानच्या हद्दीतील एकूण ९ ठिकाणी एअर स्ट्राईक केल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पाकिस्तानमधून कारवाया करणारे लष्कर ए तैय्यबा, जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवाद्यांच्या तळांवर भारतानं हा हल्ला केला आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे मोठे तळ उद्ध्वस्त झाले आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतानं हा हवाई हल्ला केला असून त्यात भारतानं कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केला नाही. फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य करून भारतानं जगासमोर आदर्श ठेवल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.
पाकिस्तानकडून पुन्हा आगळीक
एकीकडे भारतानं पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांना लक्ष्य केल्यानंतर त्यावर पाकिस्ताननं सीमेवर गोळीबार करून थयथयाट करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर काही वेळातच पाकिस्तानी लष्कराकडून राजौरी आणि पूंछ जिल्ह्याच्या सीमांवर गोळीबार करण्यात आला. काही स्फोटकंही सीमेपलीकडून फेकण्यात आली.
“पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. पूंछ व राजौरीमध्ये भिमबर गली परिसरात हा गोळीबार झाला. पाकिस्तानच्या या कारवाईला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे”, असं भारतीय लष्कराकडून सोशल मीडियावर सांगण्यात आलं आहे.
स्थानिक महिलेचा मृत्यू
दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या या हल्ल्यामध्ये मेनधारच्या मानकोट परिसरातील एक स्थानिक महिला मृ्त्यूमुखी पडली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
याव्यतिरिक्त कृष्ण घाटी, शाहपूर आणि मानकोट या पूंछ जिल्ह्यातील ठिकाणी, तसेच लाम, मांजाकोट आणि गंबीर ब्राह्मना या राजौरी जिल्ह्यातील ठिकाणी सीमेपलीकडून गोळीबार होत असल्याची माहितीही काही स्थानिकांनी दिली आहे. त्याव्यतिरिक्त काश्मीरच्या उरी आणि तांगधर सेक्टरमध्येही काही प्रमाणात गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे.