Air India Express Flight : गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्यांच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या कारणास्तव विमानांच्या उड्डाणांमध्ये व्यत्यय आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यानंतर आता एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानाचंही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. दिल्लीहून जम्मूच्या दिशेने हे एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान निघालं होतं. मात्र, मध्येच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे विमान पुन्हा दिल्लीला परतलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसच्या आयएक्स २५६४ या विमानाला सोमवारी उड्डाणानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे विमानाला पुन्हा दिल्लीला परतावं लागलं आहे. एअरबस ए ३२० द्वारे चालवले जाणारे फ्लाइट आयएक्स २५६४ या विमानाने सकाळी ११:०४ वाजता दिल्लीहून उड्डाण केलं होतं. हे विमान दुपारी १२:०५ वाजता जम्मूमध्ये उतरणार होतं. मात्र, जम्मूमध्ये उतरण्याऐवजी हे विमान पुन्हा दिल्लीला परतलं. या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

या घटनेची पुष्टी करताना एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “जीपीएसमध्ये अडथळा निर्माण झाल्याच्या संशयानंतर खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीवरून जम्मूला जाणारं विमान पुन्हा दिल्लीला परतलं आहे. मात्र, त्यानंतर जम्मूला जाण्यासाठी त्या विमानातील प्रवाशांना पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. पण तरीही झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे”, असं प्रवक्त्याने म्हटलं आहे.

तसेच काही संवेदनशील क्षेत्रांवरून उड्डाण करताना इतर कंपन्यांकडून जीपीएस सिग्नलमध्ये व्यत्यय आल्याची तक्रार करण्यात आल्याचं एअरलाइनने मान्य केलं आहे. पण प्रवाशांना जम्मूला कमीत कमी विलंबाने पोहोचता यावं यासाठी एका बदली विमानाची व्यवस्था करण्यात आली असल्याचंही एअरलाइनने म्हटलं आहे. दरम्यान, एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानांत तीन दिवसांत हा दुसरा व्यत्यय आहे. याआधीही २१ जून रोजी दिल्लीहून पाटणाला जाणारे विमान आयएक्स १०१४ हवामानामुळे वाराणसीकडे वळवण्यात आलं होतं.