भारताने आज रशियाकडून एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी केली तर कदाचित अमेरिकेकडून भारतावर निर्बंध घातले जाऊ शकतात. मात्र अमेरिकेची नाराजी ओढवून घेऊनही भारत हा पाच अब्ज डॉलरचा करार करण्यावर ठाम आहे. त्यामागे काही कारणे आहेत.
कशी आहे एस-४०० सिस्टिम
एस-४०० ही जगातील सर्वात अत्याधुनिक एअर डिफेन्स सिस्टिम आहे. शत्रूचे कुठल्याही प्रकारचे हवाई हल्ले निष्प्रभ करण्याची क्षमता या तंत्रज्ञानामध्ये आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम भारतासाठी हवाई सुरक्षा कवचाचे काम करेल. शत्रूची शक्तिशाली बॅलेस्टिक मिसाइल, फायटर विमाने हवेतच नष्ट करण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. रशियाने विकसित केलेल्या एस-४०० ट्रायम्फ मिसाइल सिस्टिमला नाटोने एसए-२१ ग्रोलर असे नाव दिले आहे.
जमिनीवरुन हवेत मारा करणारी लांब पल्ल्याची ही जगातील सर्वात धोकादायक मिसाइल सिस्टिम आहे. अमेरिकेने विकसित केलेल्या टर्मिनल हाय अॅल्टिट्यूड एरिया डिफेन्स सिस्टिमपेक्षा एस-४०० जास्त परिणामकारक आहे.
एस-४०० बहुउद्देशीय रडार, स्वयंचलित शोध यंत्रणा, विमान विरोधी क्षेपणास्त्र, लाँचर्स तसेच कमांड कंट्रोल सेंटरने सुसज्ज सिस्टिम आहे. युद्धाच्या प्रसंगात ही सिस्टिम फक्त पाच मिनिटात तैनात करता येईल. तीन वेगवेळया प्रकारची मिसाइल डागण्याची क्षमता एस-४०० मध्ये आहे.
४०० किलोमीटरच्या रेंजमधील सर्व प्रकारच्या टार्गेटसना भेदण्याची क्षमता या सिस्टिममध्ये आहे. एस-४०० फायटर तसेच टेहळणी विमाने, बॅलेस्टिक आणि क्रूझ मिसाइलचा लक्ष्यभेद करु शकते. ही सिस्टम एकाचवेळी १०० लक्ष्यांचा माग काढू शकते. अमेरिकेचे रडारला न सापडणारे एफ-३५ हे अत्याधुनिक फायटर विमानही या सिस्टिमच्या नजरेतून सुटू शकत नाही.
२००७ सालापासून रशियाने एस-४०० चा वापर सुरु केला. मॉस्कोच्या सुरक्षेसाठी ही सिस्टिम तैनात आहे. २०१५ साली रशियन नौदल आणि फायटर विमानांच्या सुरक्षेसाठी सीरियामध्ये ही सिस्टिम तैनात करण्यात आली.