हिंदू राष्ट्रवादी आणि गुजरातमधील २००२ च्या दंगलींबाबत कुत्र्याच्या पिल्लाचे दिलेले उदाहरण (पपी) यावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर विविध राजकीय पक्षांकडून टीकेची झोड उठविली जात आहे. मोदी यांचे विधान धोकादायक असून त्यांना नैराश्याने ग्रासले असल्याचे काँग्रेस आणि जद(यू)ने म्हटले आहे.
दरम्यान, बसपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार विजय बहादूर सिंग यांनी मात्र मोदी यांचे जाहीर समर्थन केले आहे. मोदी यांनी पपी हा केलेला उल्लेख त्यांच्यातील संवेदनक्षमता दर्शवितो, तर मोदी यांच्यावर टीका करणारे देशविरोधी आहेत, असे बसप खासदारांनी म्हटले आहे.
मोदी स्थिर स्वभावाचे नाहीत, आपल्याला जनतेला कोणता संदेश द्यावयाचा आहे त्याची त्यांनाच कल्पना नाही, असे काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक व्यवहारमंत्री रेहमान खान यांनी म्हटले आहे. काही वेळा ते हिंदू राष्ट्रवादी असतात, तर काही वेळा ते केवळ राष्ट्रवादी असतात, असेही खान म्हणाले.
गुजरातमध्ये २००२ मध्ये उसळलेल्या दंगलीच्या वेळी आपण योग्य भूमिका घेतली आणि आपण हिंदू राष्ट्रवादी आहोत, असे नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केल्याने राजकीय वादळ निर्माण झाले आहे.
मोदी यांना २००२ मध्ये झालेल्या दंगलीतील मनुष्यहानीबाबत विचारले असता ते म्हणाले की, गाडीच्या चाकाखाली कुत्र्याचे एखादे पिल्लू आले तरी आपल्याला वाईट वाटते. मोदी हे मुस्लीम बांधवांची तुलना कुत्र्याच्या पिल्लाशी करीत असल्याचे यामधून ध्वनीत होते, असा त्यांच्या विधानाचा अर्थ लावला जात आहे.
मोदी स्वत:ला हिंदू राष्ट्रवादी संबोधत आहेत, हे धोकादायक आहे. नथुराम गोडसेही हिंदू राष्ट्रवादी होते, पण त्यांनी म. गांधीजींची हत्या केली, असे जद(यू)चे नेते अन्वर अली यांनी म्हटले आहे.
भयभीत काँग्रेसकडून विधानाचा विपर्यास – रविशंकर प्रसाद
मोदी यांच्यावर काँग्रेसकडून टीकेची झोड उठविली जात असल्याने आता भाजप मोदी यांच्या बचावासाठी पुढे सरसावली आहे. मोदी यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालल्याचा धसका काँग्रेसने घेतला असल्याने त्या पक्षाकडून मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचे भाजपने म्हटले आहे.
नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, त्यांच्या कारभाराची पद्धत याचा काँग्रेसने धसका घेतला असल्याने मोदी यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्याची काँग्रेसला सवयच जडली आहे. भारतात प्रत्येक प्राणी पूजनीय आहे आणि काहीही चुकीचे घडले तर ती क्लेशदायक बाब आहे, असे मोदी यांनी म्हटल्याचे भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही आधाराविना काँग्रेस मोदींचा तिरस्कार करतील तितकी देशातील जनतेच्या मनात त्यांची प्रतिमा अधिकाधिक उजळ होईल, असेही प्रसाद म्हणाले.