Narayana Murthy on &0 Hours Work Remark : इन्फोसिसचे सह-संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी अलीकडेच एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मूर्ती यांनी तरुणांना आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यांचं हे वक्तव्य अनेक दिवस चर्चेत राहिलं. त्यावर देशभरात साधकबाधक चर्चा देखील झाली. त्यामध्ये प्रामुख्याने मूर्ती यांना ट्रोल केलं गेलं. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. यावर स्पष्टीकरण देताना नारायण मूर्ती म्हणाले, “कोणालाही जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडणे हा त्यामागचा उद्देश नव्हता. मी केवळ तरुणांना आत्मपरिक्षणाचा सल्ला म्हणून तसं वक्तव्य केलं होतं”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायण मूर्ती एका कार्यक्रमात म्हणाले होते की “तरुणांनी त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी अधिक परिश्रम केले पाहिजेत. त्यासाठी त्यांनी आठवड्यातून किमान ७० तास काम करायला हवं”. मूर्ती यांचं हे वक्तव् तरुणांना अधिक काम करण्यासाठी दबाव आणणारं असल्याची टीका झाली. अनेकांनी समाजमाध्यमांद्वारे मूर्ती यांच्यावर टीका केली.

नारायण मूर्तींनी दिलं स्पष्टीकरण

सोमवारी (२० जानेवारी) मुंबईतील किलाचंद स्मृती व्याख्यानमालेत सहभागी होऊन नारायण मूर्ती यांनी उपस्थितांना संबोधित केलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी वार्ताहरांनी त्यांना ७० तास काम करण्याबाबतच्या वक्तव्यावर प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले, “मी माझ्या कारकिर्दीतील सुरुवातीची ४० वर्षे दर आठवड्याला ७० तास काम करत होतो. मी दररोज सकाळी ६.३० ते सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत काम करायचो. परंतु, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. याचा अर्थ असा नव्हे की इतरांनी देखील असंच करायला पाहिजे. प्रत्येकाने आपल्या गरजा व आसपासची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा”.

मूर्ती म्हणाले, “७० किंवा त्याहून अधिक तास काम करायला पाहिजे असा काही नियम नाही. हा केवळ माझा अनुभव आहे. त्याचबरोबर आपण किती तास काम करतो ही गोष्ट महत्त्वाची नाही. आपलं काम लोकांसाठी, समाजासाठी किती महत्त्वाचं आहे हे अधिक महत्त्वाचं आहे. मी केवळ सल्ला देण्याचं काम केलं आहे. त्यावर अधिक चर्चा करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा व त्याच्या करिअरचा विचार करावा”.

नारायण मूर्ती काय म्हणाले होते?

याआधी नारायण मूर्ती म्हणाले होते, “वर्क-लाइफ बॅलन्स या संकल्पनेवर विश्वास नाही”. १९८६ मध्ये भारताने सहा दिवसांच्या वर्क वीकवरून पाच दिवसांच्या वर्क वीकमध्ये बदल केल्याबद्दलही त्यांनी निराशा व्यक्त केली. ते म्हणाले, “भारताच्या आर्थिक वाढीसाठी कठोर परिश्रम आणि समर्पण महत्त्वपूर्ण आहे आणि देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी भारतीयांनी आठवड्यातून ७० तास काम केले पाहिजे”.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayana murthy says cant force anyone on 70 hour work in week remark asc