“मुस्लिमांमध्ये भिती पसरवण्याचा प्रयत्न केले जात आहेत,” असा आरोप बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलाय. “नरेंद्र मोदींच्या भारतामध्ये मुस्लीम असणं कसं वाटतं?,” या प्रश्नावर उत्तर देताना मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक पद्धतीने केला जातोय, असा आरोप करतानाच शाह यांनी आपण याला घाबरत नसल्याचं म्हटलंय. हा देश आमचा आहे, आमच्या अनेक पिढ्या इथेच राहिल्यात आणि मरण पावल्यात. त्यामुळेच मुस्लिम नरसंहारासारख्या वक्त्यव्यांविरोधात लढण्यासाठी आम्ही तयार असल्याचं शाह यांनी म्हटलंय.
मुस्लिमांना उपेक्षितांप्रमाणे वागणूक
‘द वायर’चे वरिष्ठ पत्रकार करण थापर यांना शाह यांनी विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये शाह यांनी धर्म संसदेमध्ये करण्यात आलेल्या वक्तव्यावरुन प्रश्न विचारण्यात आला असता मुस्लिमांच्या देशातील परिस्थितीसंदर्भात शाह यांनी भाष्य केलं. “मुस्लिमांना उपेक्षितांप्रमाणे वागणूक दिली जातेय आणि ते अनावश्यक असल्याचं भासवलं जात आहे,” असं म्हटलं.
आम्हाला असुरक्षित वाटावं असे प्रयत्न केले जातायत, मात्र…
“मुस्लिमांना दुय्यम नागरिक बनवण्याचं काम सुरु आहे. हे सर्वच क्षेत्रांमध्ये होतंय. मुस्लिमांना असुरक्षित वाटावं यासाठी नियोजित प्रयत्न केले जात आहेत. आम्हाला असुरक्षित वाटावं असे प्रयत्न केले जातायत. मात्र आपण याला घाबरता कामा नये,” असंही शाह म्हणाले. “मुस्लिमांमध्ये भिती पसरवण्याचा प्रयत्न केले जात आहेत. यामुळे आपण घाबरलोय असं आपण मान्य करता कामा नये,” असंही शाह म्हणालेत.
नक्की वाचा >> नसीरुद्दीन शाहांनी पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा; म्हणाले, “ते स्वत:च्या धार्मिक श्रद्धा जपतात पण मुस्लिमांविरोधात…”
मला असुरक्षित वाटत नाही पण…
याचसंदर्भात स्वत:बद्दल बोलताना शाह यांनी, “मला देशामध्ये असुरक्षित वाटत नाही कारण हेच माझं घर आहे. मात्र माझ्या मुलांचं काय होणार याची मला चिंता आहे,” असं म्हटलंय. धर्म संसदेमध्ये झालेल्या मुस्लिम नरसंहाराच्या वक्तव्यासंदर्भात बोलताना, २० कोटी लोकसंख्येला तुम्ही अशाप्रकारे संपवण्याचं वक्तव्य करु शकत नाही, असं नसीरुद्दीन शाह यांनी म्हटलंय.
आम्ही इथलेच आहोत…
पुढे बोलताना शाह यांनी अशाप्रकारच्या वक्तव्यांविरोधात लोक लढण्यासाठी मुस्लीम तयार आहेत, असाही विश्वास व्यक्त केलाय. मुस्लीम अशा वक्तव्यांविरोधात लढण्यास तयार आहेत कारण आम्ही सर्वजण इथलेच आहोत. आमच्या पिढान् पिढ्या इथेच राहिल्यात आणि इथेच मरण पावल्यात, असं शाह म्हणाले. जे लोक अशाप्रकारची वादग्रस्त आणि भावना भडवणारी वक्तव्य करत आहेत ते लोक नक्की काय बोलतायत त्यांचा त्यांना अंदाज नसेल, असा टोलाही शाह यांनी लगावलाय.
