पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर मोठी लष्करी कारवाई करत भारताने पाकिस्तानमधील बालाकोट भागात थेट हल्ला केला असून या हवाई हल्ल्याद्वारे तेथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय वायुसेनेच्या या हल्ल्यानंतर सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘ पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावार भारतीय वायुसैनेने हल्ला केला आहे. भारताने कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा तोडलेला नाही, स्वरक्षणासाठी हा हल्ला केला आहे.’

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना सलाम केला आहे. दरम्यान, भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० किलोग्रॅम वजनाचा बॉम्ब फेकल्याचे वृत्त ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. पाकिस्तान हद्दीत घुसून भारतीय वायूसेनेने केलेली ही आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते. १२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून दहशतवादी तळावर हल्ले केले. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदची अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगितले जाते. तत्पूर्वी, पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी भारतीय वायूसेनेच्या विमानांनी एलओसीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, या हल्ल्यात सुमारे २०० ते ३०० दहशतवादी ठार झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.