२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या दहशतवादी तळावंर हल्ले केले. या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारताकडून करण्यात येतोय. दरम्यान, आजही भारत आणि पाकिस्तानाने एकमेकांवर हल्ले केले. हे हल्ले पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर असल्याचं भारताने स्पष्ट केलं आहे. आजही परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी विंग कमांडर व्योमिका सिंग, कर्नल सौफिया कुरेशी यांनी आजच्या दिवसभराची माहिती दिली.
पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
“७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या पत्रकार परिषदेत भारताने आपला प्रतिसाद केंद्रित, संतुलित आणि गैर उत्तेजक असल्याचं म्हटलं होतं. तसंच, यावेळी पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले नव्हते. पण भारतातील लष्करावर कारवाई झाल्यास योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा देण्यात आला होता”, असा पुनरुच्चार विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी केला.
७-८ मेच्या मध्यरात्री…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

“७-८ मे च्या रात्री, पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू , पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना , आदमपूर, भटिंडा , चंदीगड , नाल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज यासह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने हे लक्ष्य निष्क्रिय केले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत जे पाकिस्तानी हल्ल्यांचे पुरावे आहेत”, असं परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आलं.

“आज सकाळी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी हवाई संरक्षण रडार आणि प्रणालींना लक्ष्य केले. भारताने पाकिस्तानप्रमाणेच त्याच क्षेत्रात प्रत्युत्तर दिले आहे. लाहोर येथील हवाई संरक्षण प्रणाली निष्क्रिय करण्यात आले आहे”, असंही त्यांनी म्हटलंय.

आज १६ स्थानिकांचा मृत्यू

लाईन ऑफ कंट्रोलवर पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार वाढवण्यात आला आहे. कुपवारा, बारामुल्ला, उरी, पूछ, मेंधर, राजौरी येथे हल्ले करण्यात आले आहेत. यामध्ये १६ स्थानिकांचा मृत्यू झाला असून यात ३ महिलांचा आणि पाच लहान मुलांचा समावेश आहे. याविरोधातही भारताने प्रत्युत्तर दिलं आहे, असं सरकारने स्पष्ट केलं.

आता पाकिस्ताननेच निर्णय घ्यावा

“यापुढे जर पाकिस्तानने हल्ले वाढवले तर त्याच पद्धतीने भारताकडूनही प्रत्युत्तर दिलं जाईल. त्यामुळे आता पाकिस्ताननेच पुढचा निर्णय घ्यायचा आहे”, असं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटलं आहे.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सामान्य नागरिक मारले गेल्याचा दावा फोल

भारताने ७ मे रोजी राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे सामान्य नागरिक मारले गेले, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत होता. पण दाव्यातील फोलपणा भारताने उघडा पाडला आहे. विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत याबाबतचा सबळ पुरावा दाखवला. ऑपरेशन सिंदूरमुळे १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले असल्याचे भारताने म्हटले होते. मृत दहशतवाद्यांवर पाकिस्तानने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केल्याचे फोटो विक्रम मिस्री यांनी दाखवले आहेत.

दहशतवाद्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार देण्याची पाकिस्तानमध्ये पद्धत असावी, अशी टीका यावेळी विक्रम मिस्री यांनी केली. त्यांनी पत्रकार परिषदेत दाखविलेल्या फोटोमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याचे दिसत आहे. या प्रकारातून पाकिस्तानला कोणता संदेश द्यायचा आहे? असा सवाल विक्रम मिस्री यांनी उपस्थित केला. या फोटोमध्ये लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादीही प्रार्थना करताना दिसत असल्याचे त्यांनी म्हटले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pahalgam attack was the first escalation says govt sofiya kureshi and vyomika singh sgk