प्रेसिंडट ऑफ इंडियाचे नाव बदलून प्रेसिडंट ऑफ भारत करण्यात आल्यावरून विरोधकांनी नरेंद्र मोदी सरकारला पुन्हा एकदा लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश यांनी मोदी सरकावर शरसंधान साधलं आहे.
“बातमी खरी आहे. राष्ट्रपती भवनाने ९ सप्टेंबर रोजी G20 डिनरसाठी नेहमीच्या ‘प्रेसिडंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडंट ऑफ भारत’ या नावाने आमंत्रण पाठवले आहे. आता, घटनेतील कलम १ असे वाचू शकतो -“भारत, जो इंडिया होता. राज्यांचा संघ असेल. परंतु, या राज्यसंघावरच हल्ला होत आहे”, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.
मोदी सरकारला सत्तेबाहेर काढण्यासाठी देशभरातील विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधी पक्षांच्या या एकजुटीला इंडिया असं नाव देण्यात आलं आहे. या इंडिया नावावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. तसंच, इंडिया आघाडीवर शरसंधान साधलं आहे. या इंडिया आघाडीचं महत्त्व कमी करण्याकरता प्रेसिडंट ऑफ इंडियाच्या जागी प्रेसिडंट ऑफ भारत करण्यात येत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान, ८ ते २२ सप्टेंबर दरम्यान सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच, आता भारताचे नाव बदलण्याचाही विचार या अधिवेशनात केला जाऊ शकतो, अशी अटकळही बांधण्यात येत आहे.