Raja Raghuvanshi Murder Case Meghalaya minister Alexander Laloo Hek : गेल्या महिन्यात इंदूरहून मेघालयला मधुचंद्रासाठी गेलेल्या नवविवाहित जोडप्यामधील पतीच्या (राजा रघुवंशी) हत्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली आहे. २३ मे रोजी हे जोडपं शिलॉन्ग येथून बेपत्ता झालं आणि २ जून रोजी शिलॉन्गजवळील एका दरीत पतीचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला पोलिसांनी अपघाताचा संशय व्यक्त केला होता. मात्र पोलीस तपासांत समोर आलं आहे की ही पूर्वनियोजित हत्या होती. दरम्यान, पत्नी (सोनम रघुवंशी बेपत्ता होती. दरम्यान, नवविवाहितेनेच तिचा प्रियकर व भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने या हत्येचा कट रचल्याचं पोलीस तपासांत उघड झालं आहे.

न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, कॉल रेकॉर्ड्स व आरोपींची कबुली याच्या मदतीने पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. ‘ऑपरेशन हनीमून’ या नावाने एक पोलीस पथक स्थापन करून पोलिसांनी हे गुंतागुंतीचं प्रकरण जवळपास सोडवलं आहे. सध्या या प्रकरणातील आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.

“मेघालय पोलिसांनी हे गुंतागुंतीचं प्रकरण सात दिवसांत सोडवलं”

दरम्यान, या प्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. पत्नीनेच तिचा प्रियकर व भाडोत्री मारेकऱ्यांच्या सहाय्याने ही हत्या घडवून आणल्याचं समोर आल्यानंतर मेघालय सरकारमधील मंत्री अलेक्झांडर लालू हेक यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. सात दिवसांत मेघालय पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल त्यांनी आधी पोलिसांची पाठ थोपटली. तसेच मेघालय राज्याची बदनामी केल्याप्रकरणी सोनम व राजा रघुवंशीच्या कुटुंबीयांनी माफी मागावी अशी मागणी हेक यांनी केली आहे.

राजा व सोनमच्या कुटुंबियांनी मेघालयची माफी मागावी : मंत्री अलेक्झांडर लालू हेक

मंत्री अलेक्झांडर लालू हेक म्हणाले, “ईशान भारतातील सुंदर अशा मेघालयमध्ये इंदूरमधील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी याच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाची बरीच चर्चा चालू आहे. मात्र, चर्चेची कारणं चुकीची आहेत. या प्रकरणात मेघालय पोलिसांवर टीका झाली. मात्र, त्यांनी अवघ्या सात दिवसांत हा गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. तत्पूर्वी राजा व सोनम बेपत्ता झाल्यानंतर अनेकांनी ईशान्य भारताची, मेघायल राज्याची बदनामी केली. राजा व सोनमच्या कुटुंबियांनी आमच्या राज्याची बदनामी केली. त्यामुळे त्यांनी आता माफी मागायला हवी. राजा व सोनमच्या कुटुंबियांनी मेघालयची माफी मागितली नाही तर आमचं राज्य सरकार दोन्ही कुटुंबांविरोधात मानहानीचा खटला दाखल करेल.