बांगलादेशविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यामध्ये भारतीय सलामीवीरांनी धमाकेदार सुरुवात केली आहे. विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करत दीडशेहून अधिक धावांची भागिदारी केली. २३ व्या षटकाचा खेळ होईपर्यंत रोहितने ७० चेंडून ८१ धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकाच विश्वचषक स्पर्धेत ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा रोहित हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरने दोन वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माला नऊ धावांवर खेळताना तमीम इक्बालने त्याला जीवदान दिले. त्यानंतर नऊ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा रोहित शर्माने पुरेपूर फायदा घेत अवघ्या ४५ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. आपल्या कारकिर्दीतील ५४ वे अर्धशतक झळकावणाऱ्या रोहितने दोन महत्वाचे विक्रम शतक पूर्ण करण्याआधी आपल्या नावावर केले. रोहितने या खेळीमध्ये विश्वचषक स्पर्धेतील ५०० धावांचा टप्पा गाठला. या आधी हा विक्रम सचिनने १९९६ आणि २००३ च्या विश्वचषकामध्ये केला होता. रोहित हा विक्रम करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने २०११ साली सचिनने केलेल्या ४८२, सौरभ गांगुलीने २००३ च्या विश्वचषकात केलेल्या ४६५ आणि राहुल द्रविडने १९९९ साली केलेल्या ४६१ धावांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

या विक्रमाबरोबर रोहितने २०१९ च्या विश्वचषकामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आता आपल्या नावावर केला आहे. या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता रोहित अव्वल स्थानी आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरला (५१६ धावा) मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

एकीकडे रोहित तुफान फलंदाजी करत असताना दुसरीकडे के. एल. राहुललाही चांगला सूर गवसला असल्याने या सामन्यात भारत तीनशेहून अधिक धावांची मजल मारेल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma completed 500 runs in world cup also become leading run scorer in cwc19 scsg