ऑस्ट्रेलियाला नोकरीच्या निमित्ताने जाणाऱ्या ३ भारतीयांचं इराणमध्ये अपहरण करण्यात आलं होतं. या तिघांचीही आता सुटका करण्यात आली आहे. भारतातील इराणी दूतावासाने ही माहिती दिली. हुशनप्रीत सिंग (संगरूर), जसपाल सिंग (एसबीएस नगर) आणि अमृतपाल सिंग (होशियारपूर) हे तिघे १ मे पासून बेपत्ता आहेत. टाइम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

तीन भारतीयांच्या अपहरणाची तक्रार १ मे रोजी तेहरान पोलिसांकडे करण्यात आली होती. याप्रकरणी अपहरण झालेल्या मुलांचा शोध सुरू असल्याची माहिती २९ मे रोजी इराणी दूतावासाने दिली. दरम्यान, अपहरणकर्त्यांनी तिघांच्याही कुटुंबियांना व्हिडिओ कॉल केला होता, असं इराणच्या मेहरन वृत्तात म्हटलं आहे.

पंजाबमधील सर्व भारतीय नागरिक १ मे रोजी ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी इराणमध्ये थांबले होते. एका स्थानिक ट्रॅव्हल कंपनीने त्यांना ऑस्ट्रेलियात आकर्षक नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. तेहरानस्थित तस्निम वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, दक्षिण तेहरानमधील वरमिन येथे ओलिसांवर कारवाई करून या तिघांनाही मुक्त करण्यात आले आहे.

नवी दिल्लीतील इराणी दूतावासाने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “तेहरान पोलिसांनी तीन बेपत्ता भारतीय नागरिकांना मुक्त केले. इराणमधील स्थानिक माध्यमांचे म्हणणे आहे की पोलिसांनी इराणमध्ये बेपत्ता झालेल्या तीन भारतीयांना शोधून त्यांची सुटका केली आहे.” संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वाणिज्य दूतावास व्यवहार विभागाकडून तीन भारतीय नागरिकांच्या प्रकरणाचा पाठपुरावा केला जात आहे.

“इराणला गेल्यानंतर हे तिघेही बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी भारतीय दूतावासाला दिली आहे. दूतावासाने हा विषय इराणी अधिकाऱ्यांकडे जोरदारपणे उपस्थित केला आहे आणि बेपत्ता भारतीयांचा तातडीने शोध घ्यावा आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी विनंती केली आहे”, असं भारतीय दूतावासाने सुरुवातीच्या निवेदनात म्हटलं होतं.

इराणमार्गे ऑस्ट्रेलियाला नेण्याचे आश्वासन

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील होशियापूर येथील एका एजंटने तिघांना दुबई-इराण मार्गाने ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी त्यांना इराणमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे. परंतु १ मे रोजी ते इराणमध्ये उतरल्यानंतर लगेचच त्यांचे अपहरण करण्यात आले.

एक कोटींची खंडणी अथवा हत्या करणार

अपहरणकर्त्यांनी तिघांच्या कुटुंबियांना व्हिडिओ कॉल केल्याचे वृत्त आहे. त्यात त्यांना दोरीने बांधलेले आणि त्यांच्या गळ्यावर चाकू असल्याचे दाखवण्यात आले होते. त्यांनी पाकिस्तानमधील बँक खात्यांची माहिती दिली आणि जर त्यांना १ कोटी रुपयांची खंडणी दिली नाही तर त्यांना ठार मारण्याची धमकी दिली, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले.