लालूप्रसाद यादव यांचे मोठे पुत्र आणि आमदार तेजप्रताप यादव यांची पत्नी ऐश्वर्या यांनी माझं आयुष्य बरबाद का केलं? असा सवाल तेजप्रताप यादव यांना केला आहे. ३७ वर्षीय तेजप्रताप यादव यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांची पत्नी ऐश्वर्याने हा प्रश्न उपस्थित केला आहे.
काय आहे हे प्रकरण?
३७ वर्षीय तेजप्रताप यादव हे नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात सापडतात. आताही एका महिलेबरोबर समाज माध्यमात त्यांचे छायाचित्र आल्याने हा वाद सुरू झाला. १२ वर्षांपासून संबंधात असल्याचे त्या मजकुरात नमूद केले. अर्थात तेजप्रताप यांनी हा मजकूर नंतर काढून टाकला. आपल्याला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान आहे, आपले समाज माध्यम खाते कुणीतरी हॅक केले, अशी कारणे त्यांनी दिली. मात्र विवाह झालेला असताना वेगळ्याच महिलेबरोबर असे छायाचित्र येण्याने वादाची ठिणगी पडली. तेजप्रताप हे बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची नात ऐश्वर्या हिच्याशी २०१८ मध्ये विवाहबद्ध झाले. पुढे काही महिन्यांतच त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला.
ऐश्वर्या तेजप्रताप यादव यांनी काय म्हटलं आहे?
हे सगळे लोक मिळालेले आहेत. मला सगळी माहिती मीडियातून मिळते आहे. मला जर हे काही माहीत असतं तर मी तेजप्रताप यांना भेटलेच नसते. त्यांना विचारा जेव्हा मला मारहाण झाली तेव्हा त्यांचा सामाजिक न्याय कुठे गेला होता? त्यांना (तेजप्रताप यादव) विचारा आता माझं काय होईल? सात वर्षांपासून सगळं आम्हीच करत आहोत. लालूजी असोत, राबडीजी असोत किंवा तेजस्वी त्यांना हे सगळं आधीच माहीत असेल. मला न्याय हवा आहे आणि मी त्यासाठी माझा लढा सुरुच ठेवणार असं ऐश्वर्या राय -यादव यांनी म्हटलं आहे.
तेजप्रताप यादव आणि वाद यांचं नातं जुनंच
लालूप्रसादांचे पुत्र या नात्याने संधी मिळाली तरी राजकारणात त्यांना प्रभाव पाडता आला नाही. तेजप्रताप हे २०१५ ते १७ या काळात राज्यात आरोग्य मंत्री होते. मात्र ते प्रशासकीय कौशल्य दाखवू शकले नाहीत. याच वर्षी होळीच्या कार्यक्रमात त्यांनी सुरक्षा सेवेतील पोलिसाला नृत्य करायची सक्ती केली अन्यथा निलंबनाचा धाक दाखवल्याची चित्रफित प्रसारित झाली होती. पुढे संबंधित कर्मचाऱ्याला त्यांच्या सुरक्षा ताफ्यातून हटविण्यात आले. २०२१ मध्ये विधानसभा निवडणुकीत जिंकण्याची खात्री नसल्याने वैशाली जिल्ह्यातील महुआा या त्यांचा जुना मतदारसंघ बदलून समस्तीपूरमधील हसनपूर येथून त्यांना विधानसभेला संधी देण्यात आली. ते निवडून आले, त्यात पक्षाचा व जातीय समीकरणांचा मोठा वाटा आहे. यापूर्वी त्यांनी अंतर्गत बंडाळीचा प्रयत्न केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तीन समर्थकांना संधी द्यावी म्हणून आग्रह धरला होता. पुढे तीन जणांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले होते. मात्र राज्यातील राजकीय स्थिती पाहता नंतर धाकटे बंधू तेजस्वी यांचे नेतृत्व मान्य करावे लागले. आताही पक्षात तेजस्वी हेच मुख्यमंत्रीपदाचे स्पष्ट दावेदार आहेत.