Water Shortage at Karachi Airport: गेल्या महिन्याभरापासून भारत व पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. पाकिस्तानमधील दहशतवाद्यांनी पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी हल्ला केल्यानंतर १५ दिवसांत म्हणजेच ७ मे रोजी भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. याशिवाय पाकिस्तानशी असणारा सिंध जलकरारदेखील भारतानं रद्द केला. या पार्श्वभूमीवर एकीकडे भारतानं घरात घुसून केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानवर नामुष्की ओढवलेली असताना दुसरीकडे पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री हिना बयत यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होऊ लागली आहे.

हिना बयत यांचा Video व्हायरल

अभिनेत्री हिना बयत यांनी काढलेला एक सेल्फी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हिना बयत यांनी पाकिस्तानमधील अतिशय गजबजलेल्या व मोठ्या शहरातील आंतरराष्ट्रीय विमानतळ असणाऱ्या कराची एअरपोर्टवरची परिस्थिती सांगितली आहे. “आज यॉम-ए-तकबीरचा दिवस आहे. मी कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभी आहे. ज्या दिवशी आपण सगळ्यांनी पाकिस्तानचं यश साजरं केलं पाहिजे, त्या दिवशी मी बघतेय की कराची विमानतळावर एकाही स्वच्छतागृहात पाणी नाहीये”, असं हिना बयत यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं.

“इथे कुठेच पाणी नाहीये. लोकांना प्रार्थना म्हणायच्या आहेत. पालकांना त्यांच्या मुलांना स्वच्छतागृहात न्यायचं आहे. पण तिथे पाणीच नाहीये”, अशी व्यथा हिना बयत यांनी या व्हिडीओमध्ये मांडली आहे.

इथे पाहा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ!

पाकिस्तानच्या सद्यस्थितीवर संताप

दरम्यान, हिना बयत यांनी या व्हिडीओमध्ये पाकिस्तानच्या सध्याच्या अवस्थेवरदेखील संतप्त भूमिका मांडली आहे. “आपले विमानतळ, आपल्या संस्था आणि आपल्या व्यवस्थांची अवस्था इतकी वाईट का झाली आहे? शिवाय कुणीही हे मानायला तयार नाहीये की या चुका आहेत आणि त्या सुधारायला हव्यात. अनेक नवे प्रकल्प सुरू केले जात आहेत. नव्या रेल्वेगाड्यांची चर्चा केली जात आहे. पण अस्तित्वात असलेल्या सुविधांचं काय? अगदी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाण्याच्या उपलब्धतेसारख्या बाबीकडेही दुर्लक्ष केलं जात आहे. हे खरंच फार दुर्दैवी आहे”, असंही हिना बयत यांनी या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

सोशल मीडियावर पाकिस्तान ट्रोल!

सध्या हिना बयत यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पाकिस्तानमधील परिस्थितीवर टीका-टिप्पणी होऊ लागली आहे. एकीकडे भारतावर विजय मिळवल्याच्या बाता करणाऱ्या पाकिस्तानमध्ये मूलभूत सुविधांचीही इतकी वाईट अवस्था असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर नेटिझन्सकडून व्यक्त केल्या जात आहेत.