‘ऑपरेशन सिंदूर’ मोहीम अवघ्या २३ मिनिटांत तडीस नेताना भारतीय सैन्यदलांनी केवळ पाकिस्तानला नव्हे तर, चीनने ज्या हवाई संरक्षण प्रणाली त्यांना पुरविल्या होत्या, त्यांनाही चकवा दिला. या काळात पाकिस्तानने वापरलेले चिनी ड्रोन, लढाऊ विमाने आणि अन्य सामग्रीची या निमित्ताने पहिली युद्ध चाचणी झाल्याचे मानले जाते. पण भारतीय सैन्यदलांनी स्वदेशी आणि आधुनिक आयुधांनी पाकिस्तानचे कुटील मनसुबे हाणून पाडले.
चिनी शस्त्रास्त्रांशी युद्ध
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ ठिकाणी अचूक लक्ष्यभेदी हल्ले चढविले. २३ मिनिटांत ही मर्यादित लष्करी कारवाई झाली. परंतु, त्याचा थांगपत्ता पाकिस्तानला हवाई संरक्षण कवच देणाऱ्या चिनी प्रणालींना लागला नाही. नंतर पाकिस्तानातील अनेक चिनी हवाई संरक्षण रडार प्रणालींना निष्प्रभ करण्यात आले. पाकिस्तानने चिनी, तुर्की ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतीय लष्करी आस्थापना तसेच नागरी भागात हल्ल्याचे प्रयत्न केले. ते एकात्मिक मानवरहित हवाई प्रणालींचे जाळे (अनमॅन्ड एरियल सिस्टिम्स) आणि हवाई संरक्षण प्रणालींद्वारे निष्क्रिय करण्यात आले. स्वदेशी आकाश प्रणाली, रशियन एस – ४०० प्रणालीची कामगिरी महत्त्वाची ठरली. पाकिस्तानी हवाई दलाने अमेरिकी एफ – १६ च्या जोडीला चिनी जेएफ – १७ थंडर, जेएफ – १० ही लढाऊ विमाने सज्ज ठेवली होती. भारतीय हवाई दलाच्या राफेल बहुउद्देशीय लढाऊ विमानांची कामगिरी उजळून निघाली. ड्रोन युद्धात आर्मी एव्हिएशन कोअरने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
पुरावे सादर
पाकिस्तानच्या निष्प्रभ केलेल्या लष्करी सामग्रीचे पुरावे भारतीय सैन्य दलाने सादर केले. यात चिनी पीएल – १५ क्षेपणास्त्रांचे तुकडे, विहाव नावाचे तुर्की ड्रोन, लांब पल्ल्याचे रॉकेट, क्वाडकॉप्टर आणि व्यावसायिक ड्रोनचा समावेश आहे. पाकिस्तानने परदेशातून मिळालेल्या शस्त्रास्त्रांचा वापर केला. यात चिनी सामग्रीचा अधिक्याने समावेश होता. तरीदेखील भारताच्या स्वदेशी आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली श्रेष्ठ ठरल्याचे दिसते.
पाकिस्तानचे अवलंबित्व
लष्करी सामग्रीसाठी पाकिस्तान चीनवर पूर्णत: अवलंबून आहे. सध्याच्या संघर्षावेळी चीनने पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरविल्याचा आक्षेप होता. अर्थात चीनने तो फेटाळला. मागील पाच वर्षात पाकिस्तानने आयात केलेल्या शस्त्रांस्त्रापैकी ८१ टक्के शस्त्र एकट्या चीनची आहेत. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेच्या (सिप्री) अहवालानुसार चीन आज पाकिस्तानचा आघाडीचा पुरवठादार बनला आहे. त्याच्याकडून लढाऊ विमाने, युद्धनौका, हेरगिरी जहाज, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, ड्रोन अशी बरीच सामग्री पाकिस्तानला मिळाली. उभयतांमध्ये हँगोरवर्गीय आठ पाणबुड्यांसाठी पाच अब्ज डॉलरचा करार झाला आहे. यातील दोन पाणबुड्या पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झालेल्या आहेत. चीन कुठल्याही अटी लादत नसल्याने हा व्यवहार पाकिस्तानला आकर्षक वाटतो.
स्वदेशी संरक्षण उद्योगांचा विस्तार
जगातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र आयातदार ही भारताची ओळख बदलण्यासाठी स्वदेशी शस्त्रास्त्र निर्मितीला चालना दिली गेली. खासगी उद्योजक या क्षेत्रात उतरले. नुकत्याच संपलेल्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताची संरक्षण सामग्री निर्यात २३ हजार ६०० कोटींवर पोहोचली. जी मागील वर्षी २१ हजार ८३ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. देशातील ड्रोन उद्योग विस्तारत असून २०३० पर्यंत तो ११ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. २०२९ पर्यंत संरक्षण सामग्रीची निर्यात ५० हजार कोटीपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. सिंदूर मोहिमेच्या यशात स्वदेशीकरणाच्या धोरणाचे योगदान आहे.
इस्रोची कामगिरी
या मोहिमेत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) महत्त्वाचे योगदान दिले. राष्ट्रीय सुरक्षेसाठी जवळपास १० उपग्रह अहोरात्र कार्यरत असल्याचे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी म्हटले होते. भारताने उपग्रह व ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे वापर करून किनारपट्टी व उत्तर सीमेवरील प्रदेशाचे निरीक्षण करण्याची गरज त्यांनी मांडली.
निर्यातीवर प्रभाव
भारत-पाकिस्तान संघर्षात वापरलेली शस्त्रास्त्रे, हवाई संरक्षण प्रणाली, ड्रोन आदींचा प्रभाव भारत आणि चीनच्या संरक्षण सामग्रीच्या निर्यातीवर पडू शकतो. याविषयी परस्परविरोधी मते व्यक्त होतात. भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानातील लक्ष्य गाठल्याने चिनी बनावटीचे पाकिस्तानी रडार व क्षेपणास्त्र संरक्षण त्यांना रोखण्यात अयशस्वी झाल्याचे सूचित करते. याचा चिनी प्रणालींच्या विश्वासार्हतेवर परिणाम होईल, असे काहींचे म्हणणे आहे. भारताच्या स्वदेशी आयुधांची कामगिरी निर्यातीला बळ देणारी ठरू शकते. तर चीनसाठी हा संघर्ष त्यांच्या शस्त्रास्त्र प्रणालींचे थेट प्रदर्शन म्हणून कामास येऊ शकतो, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या शस्त्र विक्रीत वाढ होईल, असेही काही जण मानतात.
© The Indian Express (P) Ltd