पृथ्वीच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हवामान बदलामुळे मानवी आयुष्याला धोका निर्माण झाला आहे. कुठे दुष्काळ, कुठे पूर अशी जगाची सद्य परिस्थिती आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता जागतिक हवामान बदलाचा परिणाम तुमच्या खिशावरही होणार आहे. विमा कंपन्या विम्याच्या किमती वाढवणार असल्याचे सांगितले जात आहे. यामागील नेमके कारण काय? हवामान बदलामुळे तुमच्या खिशाला झळ कशी बसेल? याविषयी जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हवामान बदलामुळे वस्तूंच्या किमती तर वाढतील, पण त्यासह आता विम्याच्या किमतीही महागणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे दुष्काळ, पूर आणि वादळाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे लोकांच्या जीवालाही धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. याच कारणामुळे विम्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. म्यूनिच रे या प्रमुख पुनर्विमा कंपनीचे हवामानतज्ज्ञ एरनस्ट रौच सांगतात, “मुळात जर नुकसान झाले तर कोणाला ना कोणाला त्याची भरपाई द्यावीच लागेल. एकतर विमा कंपन्यांना किंवा राज्याला.” विम्यामागील तर्क असा आहे की, बरेच लोक विमा काढतात, मात्र केवळ काही लोकांचेच नुकसान होते आणि त्यांना नुकसान भरपाई मिळते. परंतु, वाढती लोकसंख्या आणि नैसर्गिक आपत्तींमुळे लोकांचे वाढते नुकसान बघता, विमा कंपन्या जोखीम पत्करतील आणि विमाधारकांसाठी विम्याच्या किमती वाढवतील.

हेही वाचा : NEET-UG पेपर लीक प्रकरणातील मास्टरमाईंड संजीव मुखिया कोण आहे?

मागील काही घटनांचा आढावा घेतल्यानंतर विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी लागली आहे. त्यामुळे काही कंपन्यांनी विम्याच्या किमती वाढवल्या आहेत. म्युनिक रे ही यापैकी एक कंपनी आहे. ही कंपनी हवामान बदलाच्या परिणामांचा सुमारे ५० वर्षांपासून अभ्यास करत आहे.

विमा कंपन्यांची संख्या कमी होणार?

हवामान बदलामुळे वाढते धोके लक्षात घेता कंपनीचे नुकसान होऊ नये म्हणून विम्याच्या किमतीत वाढ करावी लागत आहे. परंतु, इतका विमा भरण्यास लोक तयार नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. असेच एक उदाहरण म्हणजे स्टेट फार्म कंपनी. स्टेट फार्म ही कॅलिफोर्नियातील मोठी विमा कंपनी आहे. आता या कंपनीने विमा पॉलिसी विकणे बंद केले आहे. आपत्तींचा वाढता धोका, प्रचंड बांधकाम खर्च आणि यामुळे विमा कंपनीसमोर आलेल्या अव्हानांचे कारण पुढे करत, कंपनीने विमा पॉलिसी विकणेच बंद केले आहे. कॅलिफोर्नियामध्ये विमा कंपन्यांना गेल्या दशकांमध्ये दरवर्षी एक ते तीन अब्ज डॉलर्स नुकसान भरावे लागत होते. परंतु, आजकाल नुकसानाची रक्कम १० अब्ज डोलर्सपेक्षाही जास्त झाली आहे.

एकूण शंभर अब्ज डॉलर्सचे जागतिक नुकसान

जगाच्या इतर भागांनाही वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या घटनांचा फटका बसला आहे; ज्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान होत आहे. जर्मनीतही तीच परिस्थिती आहे. जर्मनीत पूर, वादळ, दुष्काळ आणि आग या घटनांमुळे लोकांचे अधिकाधिक नुकसान होत आहे. जर्मन हवामान सेवेने अशी चेतावणी दिली आहे की, अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होणार आहे, परिणामी अधिक विनाश होईल आणि अधिकाधिक लोक प्रभावित होतील. “नैसर्गिक आपत्तींमुळे विमा नुकसानाची रक्कम आता दरवर्षी जगभरात १०० अब्ज डॉलर्स इतकी आहे. यापैकी ८० ते ९० टक्के नुकसान हवामानाशी संबंधित आहे”, असे एरनस्ट रौच यांनी सांगितले.

नुकसान कमी करता येणार का?

एरनस्ट रौच सांगतात, इमारती आणि पायाभूत सुविधांचे मूल्य वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे आणि किनाऱ्यावरील प्रदेश किंवा नद्यांजवळील विशेषत: असुरक्षित भागात बांधकाम अजूनही सुरू आहे. खरं तर जगातील सर्व नैसर्गिक आपत्तींपैकी केवळ अर्ध्याच आपत्तींचा विम्यात समावेश होतो. उदाहरणार्थ, जर्मनीमध्येही सर्व इमारतींपैकी केवळ निम्म्या इमारतींनाच विम्याद्वारे नुकसान भरपाई मिळाली. जर्मनीमध्ये अलीकडच्या काही वर्षांत अपवादात्मक उष्ण आणि कोरडा उन्हाळा आणि २०२१ मधील विनाशकारी पूर, यामुळे ८० अब्ज युरोपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, असे जर्मनीच्या पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे. या आकड्यामध्ये इमारती आणि पायाभूत सुविधांना झालेले नुकसान, कापणीचे नुकसान, तसेच इतर नुकसानांचा समावेश आहे. यासह कामगार उत्पादकता कमी झाल्यामुळे होणारे नुकसानही यात समाविष्ट आहे.

रौच सांगतात की, जर्मनीमध्येही एके दिवशी कॅलिफोर्नियासारखीच स्थिती निर्माण होईल. रौच यांचा असा विश्वास आहे की काही प्रदेशांना विमा संरक्षण मिळणे अशक्य वाटू शकते. अगदी जगाच्या त्या भागांमध्येही, जेथे विमा कंपन्या त्यांना हवे ते शुल्क आकारू शकतात. येत्या काही वर्षांत जर्मनीमध्ये हवामान बदलामुळे होणारा एकूण आर्थिक खर्च प्रचंड वाढेल, असे जर्मन सरकारला आढळून आले आहे. तापमानात किती वेगाने वाढ होते यावर पुढील परिस्थिती अवलंबून आहे. यामुळे २०५० पर्यंत २८० युरो ते ९०० अब्ज युरोपर्यंत नुकसान होऊ शकते.

नुकसान कमी होण्यासाठी आवश्यक पावले उचलणे महत्त्वाचे

जेव्हा खर्च नियंत्रित करण्याचा विचार येतो तेव्हा हवामान बदल मर्यादित करण्याच्या प्रयत्नांबरोबरच नुकसान कसे कमी करता येईल, याच्या उपाययोजना आखणे अधिक महत्त्वाचे आहे. रौच यांच्या मते, हे उपाय सर्वात महत्त्वाचे आहेत. विशेषतः ज्या भागात नैसर्गिक आपत्तींची जोखीम जास्त आहे आणि विमा कंपन्या परवडणाऱ्या पॉलिसी देऊ शकत नाहीत. २००२ आणि २०१३ मध्ये देशातील प्रमुख नद्यांना पूर आल्यानंतर जर्मनीमध्ये पूर संरक्षण उपायांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे, असे रौच सांगतात. त्यांच्या मते जगभरातील किनारपट्टी भागातही अशाच उपाययोजना लागू करणे आवश्यक आहे. जर्मन इन्शुरन्स असोसिएशनने (जीडीव्ही) देखील कारवाईचे आवाहन केले आहे. पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात कोणतीही नवीन इमारत होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा : मूर्ती लहान पण किर्ती महान! कादंबरीकार आणि प्राध्यापक झाल्यानंतर आता होणार पदवीधर; कोण आहे १२ वर्षांचा चिमुरडा?

वेळेत उपाययोजना महत्त्वाच्या

वाढत्या तापमान वाढीमुळे जलद कृती आवश्यक असल्याचे जर्मनीतील उद्योग समूहाचे मत आहे. “जर आम्ही वेळेत प्रतिबंधक उपाययोजना करण्यात अयशस्वी झालो, तर आमच्या अंदाजानुसार जर्मनीमध्ये पुढील १० वर्षांत केवळ हवामानाच्या नुकसानीमुळे विम्याच्या किमती दुप्पट होतील”, असे जर्मन विमा असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जोर्ग अस्मुसेन यांनी सांगितले. युरोपिय पर्यावरण एजन्सीने आपल्या पहिल्या युरोपियन हवामान जोखीम मूल्यांकनात निष्कर्ष काढला की, प्रतिबंधाच्या बाबतीत संपूर्ण युरोपमध्ये खूप मंद गतीने काम सुरू आहे. जगभरातही नैसर्गिक आपत्तींचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना जलद गतीने होणे महत्त्वाचे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Climate change make insurance expensive rac