गेल्या काही दिवसांपूर्वीच काही तरुणांना रशियन सैन्यात जबरदस्तीने भरती करून युक्रेनमध्ये लढण्यासाठी पाठवले जात असल्याची बातमी आली होती. याबाबत परराष्ट्र मंत्रालय सतर्क झाले असून, त्यांनी रशियन सरकारशी चर्चा सुरू केली आहे. खरं तर रशियामध्ये भारतीयांना पाठवणाऱ्या एजंट्स आणि कंपन्यांवर सीबीआयने छापा टाकल्यानंतर युक्रेनविरुद्ध रशियाच्या युद्धात भारतीय तरुणांना कशा पद्धतीने फसवून पाठवले जात आहे हे उघड झाले आहे. काहींना डिलिव्हरी बॉय म्हणून नोकरी देण्याच्या बहाण्याने पाठवले गेले आहे, तर काहींना ते रशियन सैन्यात सहाय्यक म्हणून काम असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर छावणीच्या ठिकाणी जाऊन या तरुणांची सर्व वैध कागदपत्रे घेतली जातात. मग त्यांना युद्ध प्रशिक्षण दिले जाणार असून, फ्रंट लाइनवर पाठवले जाणार असल्याचं सांगितले जाते, जेव्हा तरुण नकार देतात, तेव्हा रशियन पोलिसांमार्फत त्यांना ताब्यात घेतले जाते आणि त्यांना अज्ञात स्थळी ठेवले जाते. एकतर आमच्याशी करार करा नाही तर त्यांना १० वर्षांची शिक्षा भोगा, अशी भीती घातली जाते. त्यामुळे तरुणांना तिथल्या भाषेत करारनामा दिला जातो आणि त्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले जाते. त्यानंतर त्यांना युक्रेनविरोधातील युद्धात ढकलले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओ बनवून परदेशात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांशी संपर्क साधतात

एजंटांमध्ये दुबईस्थित फैजान खान ऊर्फ बाबा मुख्य सूत्रधार आहे. तो लोकप्रिय यू ट्युब चॅनेलच्या माध्यमातून बाबा व्लॉग्स चालवतो. त्याच्या यू ट्युब चॅनेलवरील व्हिडीओमध्ये तो रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये दिसत आहे. मी फिनलंड आणि एस्टोनिया शहरापासून १५० किमीपेक्षा कमी अंतरावर असल्याचेही तो व्हिडीओत सांगतो. त्यानंतर तो हिंदीत भारतीय तरुणांना रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये येण्याचे आवाहन करतो. याचा पहिला टप्पा म्हणजे प्रमोशन असते, फैजान खान ऊर्फ बाबासारख्याच काही खासगी व्हिसा कन्सल्टन्सीच्या विविध कंपन्या यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडीओ बनवून परदेशात नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांशी संपर्क साधतात. मग या तरुणांना रशियन आर्मीमध्ये डिलिव्हरी बॉय आणि इतर जॉब अशा विविध प्रकारच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवले जाते. सैन्यात नोकरीसाठी सीमेवर जाऊ नका, रणगाड्यांवर बसून गोळी झाडू नका, युद्धाला जाऊ नका, असेही व्हिडीओत सांगण्यात येते. असे काहीही करावे लागणार नसल्याचा त्यांना विश्वास दिला जातो. अलीकडेच हैदराबादच्या मोहम्मद अस्फानचा रशिया-युक्रेन युद्धात मृत्यू झाला, जेव्हा दूतावासाला याची माहिती मिळाली, तेव्हा सीबीआयने स्वत:हून या कन्सल्टन्सी आणि तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला.

हेही वाचाः विश्लेषण : रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचे ‘पीएफआय कनेक्शन’… ‘पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया’ पुनरुज्जीवित होतेय?

तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी ते काही व्हिडीओ तयार करून दाखवतात. इथे सर्व काही ठीक आहे, परिस्थिती ठीक आहे, रशियाने युक्रेनचा काही भाग ताब्यात घेतला आहे. इथले सैन्य युद्धक्षेत्रात आहे, तुम्हाला तिथे जाण्याची गरज नाही. त्यापेक्षा तुमची नोकरी सैन्यात मदतनीस म्हणून असेल. जसे की, कागदोपत्री काम हाताळणे, युद्धात नष्ट झालेल्या इमारती रिकाम्या करणे आणि त्यांची यादी तयार करणे अशा प्रकारे सैन्यात मदतनीस म्हणून तुम्हाला काम करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला ३ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला ४० हजार रुपये पगार मिळेल, त्यानंतर तुमचा पगार १ लाख रुपये होईल, असंही भारतीय तरुणांना सांगितले जाते.

हेही वाचाः डिजिटल व्यवहार, दात्यांचा ‘केवायसी’ तपशील हाताशी…मग स्टेट बँकेला निवडणूक रोखे तपशील जाहीर करण्यास इतका वेळ का लागतो?

सीबीआयने १३ ठिकाणी टाकले छापे

याप्रकरणी नुकतीच सीबीआयने कारवाई केली आहे. सीबीआयने दिल्ली, तिरुवनंतपुरम, मुंबई, अंबाला, चंदीगड, मदुराई आणि चेन्नई अशा ७ राज्यांमधील १३ ठिकाणी छापे टाकले आहेत. दिल्लीतील एका व्हिसा सल्लागार कंपनीने सुमारे १८० भारतीय तरुणांना रशियाला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. याशिवाय किती तरुणांना वॉर झोनमध्ये पाठवले गेले, याचाही तपास सीबीआय करीत आहे. बहुतांश तरुणांना स्टुडंट व्हिसावर रशियाला पाठवण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. किती तरुणांना स्टुडंट व्हिसावर रशियाला पाठवण्यात आले, कोणी विद्यापीठात प्रवेश घेतला आणि किती जणांनी प्रवेश घेतलाच नाही हे शोधण्याचे काम सध्या सीबीआय करीत आहे. बहुतांश तरुण विद्यार्थी स्टुडंट व्हिसावर रशियाला पोहोचल्यानंतर विद्यापीठात प्रवेश घेण्याऐवजी बेकायदेशीरपणे नोकरीला लागल्याचंही तपासात दिसून आले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्रीय तपास संस्थेच्या एफआयआरमध्ये भारतात कार्यरत असलेल्या १७ अन्य व्हिसा सल्लागार कंपन्या, त्यांचे मालक आणि एजंट यांचा समावेश आहे. एजन्सीने त्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी कट, फसवणूक आणि मानवी तस्करी संबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींनी आपल्या एजंटांमार्फत भारतीय नागरिकांना रशियन सैन्यात नोकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस, चांगले जीवन आणि शिक्षण या बहाण्याने रशियात पाठवले जाते, असाही आरोप सीबीआयने केला आहे. याशिवाय एजंटांकडून बेकायदेशीरपणे मोठी रक्कमही गोळा करण्यात आली होती. एवढेच नाही तर रशियातील खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने या एजंटांनी विद्यार्थ्यांची फसवणूक केलीय. त्यांना रशियाला पाठवण्यात आले आणि नंतर तिथल्या एजंटांच्या मदतीने सैन्यात पाठवले. हे तरुण रशियाला पोहोचल्यानंतर तेथील एजंटांमार्फत त्यांचे पासपोर्ट जप्त केले जातात आणि त्यांना सशस्त्र दलात भरती होण्यास भाग पाडले जाते. “त्यांना लढाऊ भूमिकांचे प्रशिक्षण दिले जात होते,” असेही सीबीआय एफआयआरमध्ये नमूद केले आहे. भारतीय तरुणांना रशियन सैन्याचा गणवेश दिला जात असून, तिथल्या सैन्याच्या तुकडीत त्यांना भरती केले जाते. त्यानंतर या भारतीय तरुणांना रशिया-युक्रेन युद्धाच्या संदर्भात हल्ल्याची भीती असलेल्या ठिकाणी तैनात केले जात आहे आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांचे जीवन गंभीर धोक्यात टाकले जात आहे, असेही सीबीआयचे म्हणणे आहे.

आतापर्यंत ३७ पीडित समोर आले

अलीकडेच हैदराबादच्या मोहम्मद अस्फानचा या युद्धात मृत्यू झाला, जेव्हा दूतावासाला याची माहिती मिळाली, तेव्हा सीबीआयने स्वत:हून या कन्सल्टन्सी आणि तिच्या संचालकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आणि छापा टाकला. सर्व कागदपत्रांसह ५० लाख रुपये जप्त केले. असे सुमारे ३७ पीडित समोर आले आहेत, ज्यांना फसवून लष्करात लढण्यासाठी रशियाला पाठवण्यात आले होते, ज्यात एक तरुण मृत्युमुखी पडला असून, अनेक जखमी झालेत. MEA, CBI सह गृहमंत्रालय रशियातून तरुणांना भारतात आणण्याचा प्रयत्न करत असून, या कंपन्या चालवणाऱ्या लोकांवर कडक कारवाई केली जात आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How is the indian youth getting involved in russia ukraine war by showing the lure of big salary vrd