संजय जाधव
भारतीयांमध्ये- अगदी लहान मुलांतही- लठ्ठपणाचे प्रमाण वाढण्याची समस्या गंभीर असल्याचा सूर लॅन्सेट या संशोधनपत्रिकेतील एका शोधनिबंधाने नुकताच आकडेवारीसह लावला…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमके संशोधन काय?

देशभरात २०२२ मध्ये ५ ते १९ वयोगटातील सव्वा कोटी मुले लठ्ठ असल्याचे आढळून आले. त्यात ७३ लाख मुले आणि ५२ लाख मुलींचा समावेश होता. लठ्ठपणा असलेल्या मुलांच्या संख्येत १९९० पासून २०२२ पर्यंत ४० लाखांनी वाढ झाली आहे. मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण ३ टक्के आढळून आले. प्रौढांमध्येही लठ्ठपणाच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. विशेषत: महिलांमध्ये हे प्रमाण वाढत असून, ते ९.८ टक्के आहे. तसेच ५.४ टक्के पुरुषांमध्ये लठ्ठपणा आढळून येत आहे. महिलांमध्ये लठ्ठपणा आढळून येणाऱ्या १९७ देशांपैकी भारत १८२ व्या स्थानी असून, पुरुषांचा विचार करता १८० व्या स्थानी आणि मुले आणि मुलींच्या बाबतीत १७४ व्या स्थानी आहे.

हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ते आता थेट भारताचे नवे लोकपाल; जाणून घ्या मराठमोळ्या अजय खानविलकरांचा प्रवास!

लठ्ठपणा कसा ठरवला जातो?

जागतिक आरोग्य संघटनेने लठ्ठपणाचे निकष ठरवून दिले आहेत. यानुसार, एखाद्या व्यक्तीच्या शरीरात त्याच्या आरोग्याला धोका निर्माण होईल एवढी अतिरिक्त चरबी जमा होणे याला लठ्ठपणा म्हणतात. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) २५ च्या वर असेल तर ती व्यक्ती जास्त वजन असलेली आणि बीएमआय ३० च्या वर असेल तर लठ्ठ समजली जाते. देशात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. हृदयविकार आणि मधुमेह हे त्यात प्रमुख आहेत. यामागे लठ्ठपणा हे मुख्य कारण ठरत आहे. टाइप २ मधुमेहासाठी लठ्ठपणा कारणीभूत ठरत आहे.

अरबट-चरबट खाण्यामुळेच?

भारतात लठ्ठपणा वाढण्यासाठी बदललेल्या आहारावर आहारतज्ज्ञांनी बोट ठेवले आहे. भारतीय पारंपरिक खाद्यापदार्थ सोडून जंक फूड आणि फास्ट फूडला पसंती देत आहेत. डाळी, धान्ये, फळे आणि भाज्या यांचे प्रमाण आहारातून कमी झाले आहे. आपल्या पारंपरिक खाद्यापदार्थांमध्ये मीठ, रिफाइंड तेल, साखर आणि मांस यांचे प्रमाण कमी होते. आपण आता अधिक ऊर्जा आणि कमी पोषणमूल्य असलेल्या आहाराकडे वळलो आहोत. त्यात प्रक्रियायुक्त कर्बोदके, जास्त चरबी, मांस उत्पादने आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यापदार्थांचा समावेश अधिक आहे.

बदलत्या सवयी कारणीभूत?

आपल्या शारीरिक हालचाली कमी झाल्याचे महत्त्वाचे कारण लठ्ठपणा वाढण्यामागे असल्याचे आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मागील चार दशकांत कामाचे स्वरूप बैठे म्हणजे एकाच जागी बसून करण्याचे होत गेले आहे. राष्ट्रीय पोषण नियंत्रण विभागाच्या सर्वेक्षणानुसार, १९७५ ते १९७९ या कालावधीत बैठ्या कामाचे प्रमाण ३४ टक्क्यांवर पोहोचले. त्यानंतर २०१२ पर्यंत हे प्रमाण ७४ टक्क्यांवर पोहोचले. त्यामुळे भारतात लठ्ठपणा वाढण्यासाठी कामाचे बदललेले स्वरूपही कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : भारताने मॉरिशसच्या आगालेगा बेटावर निर्माण केलेल्या हवाई तळाचे महत्त्व काय आहे? त्याचा भारताला कसा फायदा होईल?

महिलांमध्ये प्रमाण अधिक का?

देशात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये लठ्ठपणा अधिक असल्याचे समोर आले आहे. शारीरिक व्यायाम करण्यास पुरेसा वेळ न मिळणे हे महिलांमध्ये लठ्ठपणा वाढण्यास प्रमुख कारण आहे. याचबरोबर महिलांना पुरेसा पोषक आहार मिळत नसल्याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. कारण कुटुंबातील इतर सदस्यांच्या पोषण आहाराला जास्त महत्त्व देऊन महिलांच्या आहाराकडे दुर्लक्ष केले जाते. तसेच, महिलांना आरोग्यसुविधा आणि शिक्षण पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने त्यांना लठ्ठपणाबद्दल योग्य माहिती आणि उपचार मिळत नाहीत. महत्त्वाचे म्हणजे महिलांमध्ये लठ्ठपणा वाढण्यास त्यांच्या शरीरातील नैसर्गिक बदल कारण ठरतात. त्यात मासिक पाळी, प्रसूती, रजोनिवृत्ती यांसह इतर बाबींचा समावेश आहे.

आहार-व्यायामाने नियंत्रण शक्य?

वेळीच उपाययोजना केल्यास लठ्ठपणाचे प्रमाण कमी करता येणे शक्य आहे. यासाठी आहाराच्या सवयी बदलायला हव्यात. अतिरिक्त साखर असलेले पदार्थ टाळायला हवेत. याचबरोबर सरकार, समाज आणि व्यक्तिगत पातळीवर याबाबत जागरूकता व्हायला हवी. प्रत्येकाला तंदुरुस्त राहण्यासाठी रोज किमान ६० मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. तसेच आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या खाद्यापदार्थांच्या विक्रीवर निर्बंध आणायला हवेत. जंक फूडच्या वेष्टनावर त्यातील पोषणमूल्ये ठळकपणे द्यायला हवीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis obesity problem rising in india print exp zws