पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात पारंपरिकपणे मैत्रीपूर्ण संबंध नाहीत. परंतु, बुधवारी (१३ नोव्हेंबर) कराचीहून एक मालवाहू जहाज बांगलादेशच्या आग्नेय किनारपट्टीवर दाखल झाले. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये प्रथमच थेट सागरी संबंध प्रस्थापित होत असल्याचे हे चिन्ह आहे. हे पाऊल पाकिस्तान-बांगलादेशच्या गुंतागुंतीच्या संबंधात ऐतिहासिक बदल दर्शविते. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील नवीन अंतरिम सरकारच्या नेतृत्वाखाली दोन देशांमधील संबंध आणखी घट्ट होण्याचे हे संकेत आहेत. बांगलादेशमध्ये अंतरिम सरकारने १०० दिवस पूर्ण केले आहेत. या दोन देशांतील वाढत्या संबंधांचा भारतावर काय परिणाम होणार? विशेषतः भारताच्या सुरक्षेवर याचा काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत-बांगलादेशमध्ये द्विपक्षीय व्यापार?

गेल्या बुधवारी, ‘एमव्ही युआन शियान फा झोंग’ हे जहाज बांगलादेशातील बंदरावर आले आणि पाकिस्तानमधील माल उतरवून लगेच निघून गेले. बंदर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, १८२ मीटर लांबीच्या जहाजाने पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिरातीमधून माल आणला, ज्यात बांगलादेशच्या प्रमुख वस्त्र उद्योगासाठी कच्चा माल आणि मूलभूत खाद्यपदार्थांचा समावेश आहे. ‘ढाका ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार, सर्वात मोठी शिपमेंट सोडियम कार्बोनेट (सोडा ऍश) होती, ज्याचा वापर प्रामुख्याने कापड उद्योगात केला जातो. सोडियम कार्बोनेट ११५ कंटेनरमध्ये आणण्यात आले होते.

हेही वाचा : डोळ्यांतून अश्रू का येतात? काय आहे आपल्या रडण्यामागील विज्ञान?

पाकिस्तानचे उच्चायुक्त सय्यद अहमद मारूफ म्हणाले की, थेट शिपिंग मार्ग संपूर्ण प्रदेशातील व्यापार वाढविण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. “हा उपक्रम सध्याच्या व्यापाराला गती देईल आणि छोट्या व्यापाऱ्यांपासून मोठ्या निर्यातदारांपर्यंत दोन्ही बाजूंच्या व्यवसायांसाठी नवीन संधींना चालना देईल,” असे ते म्हणाले. बांगलादेशमधील मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने पाकिस्तानी वस्तूंवरील आयात निर्बंध शिथिल केल्यानंतर ही थेट शिपमेंट झाली आहे. याआधी अशा मालाचे आगमन झाल्यावर अनिवार्य तपासणी करणे आवश्यक होते, ज्यामुळे या प्रक्रियेत विलंब होत असे. मुहम्मद युनूस म्हणाले, “आपले संबंध पुनरुज्जीवित करण्यासाठी सागरी संबंध मजबूत करणे आवश्यक आहे.” विविध क्षेत्रांत सहकार्य वाढवण्यासाठी पाकिस्तान-बांगलादेश संबंध वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

पाकिस्तानकडून जहाजाचे बांगलादेशात डॉकिंग दोन देशांतील संबंधांसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. (छायाचित्र-फायनान्शियल एक्सप्रेस)

पाकिस्तान-बांगलादेश संबंध अधिक दृढ

पाकिस्तानकडून जहाजाचे बांगलादेशात डॉकिंग दोन देशांतील संबंधांसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे. १९७१ मध्ये स्वातंत्र्ययुद्धानंतर दोन्ही देश विभाजित झाले. या स्वातंत्र्ययुद्धात लाखो लोक मारले गेले होते. आजवर बांगलादेशच्या नागरिकांच्या मनात या स्मृति खोलवर रुजल्या आहेत. शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशने पाकिस्तानला वेठीस धरले होते. दुसरीकडे त्यांनी बांगलादेश आणि भारताचे संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. उदाहरणार्थ, ऑगस्ट २०२२ मध्ये हसीना सरकारने चटगाव बंदरात नव्याने तयार केलेल्या चिनीनिर्मित फ्रिगेट युद्धनौका पीएनएस तैमूरला चटगाव बंदरात डॉक करण्याची परवानगी नाकारली होती. कंबोडियन आणि मलेशियाच्या नौदलांबरोबर केलेल्या सरावानंतर ही युद्धनौका शेवटी श्रीलंकेतील बंदरात दाखल झाली.

परंतु, हसीना यांची हकालपट्टी झाल्यापासून मुहम्मद युनूसच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानशी संबंध अधिक दृढ करून पर्यायी मार्ग स्वीकारला आहे. ११ सप्टेंबर रोजी पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना यांची ७६वी पुण्यतिथी ढाका येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये उर्दू शायरीने साजरी करण्यात आली. वृत्तात असे म्हटले आहे की, कार्यक्रमातील सहभागींनी जिना यांची प्रशंसा केली आणि एकाने असेही म्हटले की, जिना हे आपल्या राष्ट्राचे पिता आहेत आणि पाकिस्तानशिवाय आज बांगलादेश अस्तित्वात नसता.

मुहम्मद युनूसच्या नेतृत्वाखालील सरकारने पाकिस्तानशी संबंध अधिक दृढ करून पर्यायी मार्ग स्वीकारला आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

हसीनाच्या हकालपट्टीनंतर दोन्ही देशांमधील व्हिसा प्रक्रियाही सुलभ झाली आहे. सप्टेंबरमध्ये इस्लामाबादने जाहीर केले की, बांगलादेशी व्हिसा शुल्काशिवाय देशात प्रवास करू शकतात. बांगलादेशनेही पाकिस्तानला नव्याने तोफखाना दारुगोळा पुरवण्याचे आवाहन केले आहे. या ऑर्डरमध्ये ४० हजार दारुगोळा, ४० टन आरडीएक्स स्फोटक आदी बाबींचा समावेश आहे. यापूर्वीही असे आदेश देण्यात आले आहेत, मात्र भारतीय अधिकाऱ्यांनी हे निदर्शनास आणून दिले की ही संख्या नेहमीपेक्षा खूप जास्त आहे. २०२३ मध्ये पूर्वीची ऑर्डर १२ हजार दारूगोळ्यांसाठी होती. ढाका युनिव्हर्सिटीतील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक डॉ. शाहिदझ्झमन यांचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला, ज्यात त्यांनी भारताविरुद्ध संरक्षण म्हणून पाकिस्तानशी अणु करार करण्याविषयी आपले मत मांडले होते.

भारतावर याचा काय परिणाम होणार?

बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक घट्ट होणे ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. पण तज्ज्ञांचे मत आहे की, बांगलादेशने निर्बंध शिथिल केल्याने अवैध शस्त्रे आणि अमली पदार्थांच्या हालचाली वाढू शकतात. विल्सन सेंटरच्या दक्षिण आशिया संस्थेचे संचालक मायकेल कुगेलमन यांनी ‘दिस वीक इन आशिया’ला सांगितले की, भारताला या दोघांमधील वाढत्या संबंधांबद्दल काळजी वाटणे सहाजिक आहे. त्यांनी २००४ च्या घटनेचा संदर्भ दिला, जिथे भारतातील दहशतवादी संघटना ULFA (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ असोम) साठी शस्त्रास्त्रांची खेप बांगलादेशच्या चितगाव येथे रोखण्यात आली. ही शिपमेंट पाकिस्तानने प्रायोजित केल्याचा आरोप भारताने त्यावेळी केला होता.

हेही वाचा : इस्रोने नव्हे तर एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ने केले भारतीय उपग्रह ‘जीसॅट-एन २’चे प्रक्षेपण; कारण काय? या उपग्रहाचा फायदा काय?

मुहम्मद युनूस काय म्हणाले?

मुहम्मद युनूस यांनी भारत आणि बांगालदेशमधील संबंध दृढ करण्याच्या महत्त्वावर जोर दिला आहे. “दोन्ही देशांमधील संबंध खूप जवळचे असले पाहिजेत. याला पर्याय असू शकत नाही. त्यांना याची गरज आहे, आम्हाला याची गरज आहे, ” असे त्यांनी बांगलादेशी दैनिक ‘प्रथम आलो’ला सांगितले. “ते अर्थशास्त्र असो, सुरक्षा असो किंवा पाण्याबद्दल असो, हे सर्वच क्षेत्रांसाठी आवश्यक आहे, ” असे ते पुढे म्हणाले. दोन देशांमधील अलीकडील तणावाबद्दल विचारले असता युनूस म्हणाले की, बांगलादेशातील अलीकडील घटनांमुळे भारत निराश झाला असावा, त्यांना बदलांमुळे आनंद झाला नाही,” असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistan and bangladesh establish direct sea route india worry rac