Spam Calls In India नमस्कार सर, आमची बँक क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला खास ऑफर देत आहे. तुम्ही इच्छुक आहात का? यांसारखे एक ना अनेक कॉल आपल्यापैकी सगळ्यांना रोज येतात. दिवसेंदिवस या स्पॅम कॉलचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांसाठी हे कॉल्स त्रासदायक ठरत आहेत. दिवसभरातून प्रत्येकाला एक स्पॅम कॉल तरी येतोच. या स्पॅम कॉलद्वारे आजपर्यंत अनेकांची फसवणूक झाली आहे. एका नवीन सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, सर्वेक्षणातील ग्राहकांना गेल्या वर्षभरात दररोज तीन किंवा त्याहून अधिक कॉल येतात. ‘ट्रुकॉलर’च्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, सर्वाधिक स्पॅम कॉल्स आणि स्पॅम मेसेज येणाऱ्या राष्ट्रांच्या यादीत ब्राझील, पेरू आणि युक्रेननंतर भारत चौथ्या क्रमांकावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही समस्या किती गंभीर आहे?

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या मते, लोकल सर्कलने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, ६० टक्के प्रतिसादकर्त्यांना गेल्या वर्षभरात दररोज सरासरी तीन कॉल आले आहेत. स्थानिक मंडळांनी भारतातील ३७८ जिल्ह्यांमधील ६०,००० नागरिकांच्या मुलाखती घेतल्या. या आकडेवारीत ६४ टक्के पुरुष आणि ३६ टक्के महिला होत्या. निष्कर्षांवरून असे दिसून आले की, सर्वेक्षणातील ३० टक्के नागरिकांना सरासरी एक ते दोन असे कॉल दररोज येतात. ३६ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना दररोज असे तीन ते पाच कॉल येतात. यात २१ टक्के लोकांना सहा ते १० स्पॅम कॉल; तर तीन टक्के लोकांना १० पेक्षा जास्त स्पॅम कॉल एका दिवसात येतात. या सर्वेक्षणात केवळ सहा टक्के लोक असे आहेत, ज्यांना असे कोणतेही कॉल आलेले नाहीत. सर्वेक्षणात ७० टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना आर्थिक सेवा आणि रिअल इस्टेट ऑफर करणाऱ्या लोकांकडून सर्वाधिक कॉल आले आहेत. ४८ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना अनोळखी व्यक्तींकडून सर्वाधिक कॉल आले आहेत; तर ३६ टक्के लोकांनी सांगितले की,त्यांना स्पॅम कॉल कंपन्या आणि ब्रँड्सकडून आले आहेत.

‘एनडीटीव्ही प्रॉफिट’नुसार, बजाज फायनान्स आणि एचडीएफसीकडून सर्वाधिक कॉल केले जातात. १२,००० लोकांपैकी ४० टक्के लोकांनी सर्वाधिक कॉल्स बजाज फायनान्सकडून आल्याचे सांगितले. १५ टक्के लोकांनी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सकडून; तर १२ टक्के लोकांनी एचडीएफसी बँक आणि चार टक्के लोकांनी कोटक महिंद्रा बँकेने सर्वाधिक कॉल केल्याचे सांगितले. सर्वेक्षणानुसार, फेब्रुवारी २०२३ मध्ये कंपन्या/ब्रँड्सचे वेगवेगळ्या मोबाइल फोन नंबरवरून येणाऱ्या कॉल्सची टक्केवारी २९ % होती; जी फेब्रुवारी २०२४ मध्ये ३६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या सर्वेक्षणात काही लोकांनी सांगितले की, हे कॉल त्यांना लँडलाइनवरून येतात; तर काहींचे सांगणे आहे की, हे कॉल्स त्यांना टोल फ्री नंबरवरून येतात.

सरकार यासाठी काय पाउले उचलत आहे?

स्पॅम कॉल पासून संरक्षण करण्यासाठी आणि लोकांची होत असलेली फसवणूक थांबवण्यासाठी केंद्र सरकारने इतर गोष्टींबरोबर टेलीकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात टीआरएआयने ‘नॅशनल डू नॉट कॉल’ अर्थात ‘डू नॉट डिस्टर्ब’ अशी एक यादी तयार केली आहे. या यादीचा वापर करून नागरिकांना स्पॅम कॉलची तक्रार करता येऊ शकते. टीआरएआयच्या वेबसाइटनुसार, “ग्राहक १९०९ डायल करून किंवा १९०९ क्रमांकावर एसएमएस पाठवून नोंदणी करू शकतो. तुम्ही ‘टीआरएआय डीएनडी २. ०’ या मोबाइल ॲपवरूनही नोंदणी करू शकता.” यात पुढे सांगण्यात आले आहे की, “ग्राहक सर्व कॉल्स आणि मेसेज ब्लॉक करू शकतात किंवा पुढे दिलेल्या सात श्रेणींमधून विशिष्ट कॉल्स/मेसेजही ग्राहकाला ब्लॉक करता येतात.

१. बँकिंग/विमा/आर्थिक उत्पादने/क्रेडिट कार्ड
२. रिअल इस्टेट
३. शिक्षण
४. आरोग्य
५. ग्राहकोपयोगी वस्तू आणि वाहन
६. दळणवळण/प्रसारण/मनोरंजन/आयटी

परंतु हे फार उपयुक्त ठरत नसल्याचेही सांगितले जाते. सर्वेक्षणातील ९० टक्के लोकांचे असे सांगणे आहे की, हे क्रमांक ‘डू नॉट डिस्टर्ब’ लिस्टमध्ये असूनही त्यांना यावरून कॉल येतात. “‘डू नॉट डिस्टर्ब्’ यादी ग्राहकांसाठी अद्याप पूर्णतः तयार झालेली नाही,” असे एका अहवालात सांगण्यात आले आहे. केंद्रानेही अवैध कॉल आणि मेसेज क्रमांक धारकांवर कारवाई केली आहे. डिसेंबरमध्ये संसदेत सांगण्यात आले होते की, वर्ष २०२३-२४ मध्ये फसवणूक केलेल्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कॉलला परवानगी देणाऱ्या तब्बल ६५ बेकायदेशीर टेलिकॉम सेटॲप्सवर कारवाई करण्यात आली आहे.

टीआरएआयने डीओटीला इंटरनॅशनल लाँग डिस्टन्स ऑपरेटर्स (आयएलडीओ) ला कॉलिंग लाइन आयडेंटिफिकेशन (सीएलआय) स्पॅम कॉल बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह ज्या ॲप्सवरुन लोकांची फसवणूक करण्यात आली, ते ॲप दूरसंचार विभागाकडून बंद करण्यात येणार आहे. अशा कॉल्सला परवानगी देणाऱ्या ॲप्सवर बंदी घालण्यात येणार आहे. हे ॲप्स गुगल प्ले स्टोअर आणि आयओवर असल्यास हटविण्यात येणार आहे,असे संसदेत सांगण्यात आले आहे. कायदा अंमलबजावणी एजन्सीज आणि टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर (टीएसपी) यांच्या समन्वयाने अशा बेकायदेशीर टेलिकॉम सेटअपचा शोध घेतला जात आहे.

अशा बेकायदेशीर सेटअपचा वापर देशविरोधी कारवाया, सायबर-गुन्हे आणि आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने केला जातोय. आतापर्यंत, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अशा ६५ बेकायदेशीर सेटअपवर, २०२२-२३ या आर्थिक वर्षात ६२ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये ३५ बेकायदेशीर सेटअपवर कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय कॉल रोखण्यासाठी, अवैध सीएलआय किंवा सीएलआय उपसर्ग जसे की +११, ०११, ११, +९११ ते +९१५, असे आंतरराष्ट्रीय इनकमिंग कॉल बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,”असे संसदेत सांगण्यात आले.

साथी पोर्टलवर करा तक्रार

‘डीओटी’द्वारे नागरिक-केंद्रित संचार साथी पोर्टलही सुरू करण्यात आले आहे. नागरिकांना आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल्सची तक्रार करण्यास, त्यांच्या नावाने घेतलेले मोबाइल कनेक्शन तपासण्यासाठी आणि या मोबाइल कनेक्शनची तक्रार करता यावी यासाठी हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. “ग्राहकांनी तक्रार केलेल्या या मोबाइल नंबरवर कारवाई करण्यात येत असून असे नंबर पूर्णतः बंद करण्यात येत आहे. अशी सुमारे १३. ०८ लाख मोबाईल कनेक्शन बंद करण्यात आले असल्याचे संसदेत सांगण्यात आले. ‘इंडिया टुडे’च्या मते, नोव्हेंबरमध्ये केंद्राने घोटाळे आणि आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित ७० लाख अवैध नंबर ब्लॉक केले आहेत.

तज्ञ काय सांगतात?

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तात असे सांगण्यात आले आहे की, फेब्रुवारी २०२३ पर्यंत तीन किंवा त्याहून अधिक कॉल प्राप्त करणाऱ्या प्रतिसादकर्त्यांची संख्या आता कमी झाली आहे. स्थानिक मंडळांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, “टेलीकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया (टीआरएआय) निर्देशांची योग्य अंमलबजावणी केल्याने मोबाइल ग्राहकांची स्पॅम कॉल्सची समस्यां काही प्रमाणात कमी झाली आहे.”

डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स असोसिएशनचे महासंचालक टिळक राज दुआ यांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले की, ही समस्या गंभीर आहे आणि या समस्येकडे निश्चितपणे लक्ष देण्याची गरज आहे. टीआरएआयने या संदर्भात अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ज्येष्ठ विधिज्ज्ञ संजय के. चढ्ढा म्हणाले की, ग्राहकांनीही सतर्क होणे आवश्यक आहे. असे स्पॅम कॉल सतत येत असल्यास सात दिवसांच्या आत ग्राहकाला सर्व्हिस प्रोव्हायडरकडे जावे लागेल. जर सर्व्हिस प्रोव्हायडर प्रतिसाद देत नसतील; तर तुम्हाला टीआरएआयकडे जाण्याचा अधिकार आहे.

हेही वाचा : Chenab Bridge: जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच रेल्वे पूल तयार; पंतप्रधान मोदींसाठी कसा ठरणार गेम चेंजर? 

टिळक दुआ म्हणाले की, नागरिक कॉल ब्लॉकिंग ॲप्स वापरू शकतात. अनेक स्मार्टफोनमध्ये इनबिल्ट कॉल ब्लॉकिंग फीचर्स आहेत. ‘मनीकंट्रोल’च्या एका लेखात म्हटले आहे की, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट ईमेल स्पॅम फोल्डर किंवा इनबॉक्समध्ये मेल पाठवायचे की नाही, हे ठरवण्यासाठी मशीन लर्निंग आणि एआय वापरतात. प्रत्येक मिनिटाला ही यंत्रणा लाखो असुरक्षित किंवा नको असलेले ईमेल स्पॅम फोल्डरमध्ये पाठवते, असे लेखात सांगण्यात आले आहे. स्पॅम, फिशिंग आणि मालवेअर स्कॅमची दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी सरकार कोणती पावले उचलणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spam call is now headaches for people what is the solution rac