Mahatma Gandhi Death Anniversary भारतीय इतिहास आणि राजकारणातील महात्मा गांधी यांचे कार्यकर्तृत्व आणि भूमिका अतुलनीय आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, स्वदेशीचा पुरस्कार, भारत- पाकिस्तान फाळणी अशा अनेक संदर्भात गांधीजींचा उल्लेख नेहमीच केला जातो. याशिवाय गांधीजी आणि सिनेमा असे विरोधाभासी चित्र देखील आपण पाहू शकतो. त्यांना सिनेमाची आवड नव्हतीच, त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच सिनेमे पाहिले. म्हणूनच ज्या क्षणी त्यांनी भारतात पहिला चित्रपट पाहिला, तो क्षण ऐतिहासिक मानला गेला. वयाच्या ७५ व्या वर्षी गांधीजींनी पहिल्यांदा आपले सिनेमाविषयी असणारे सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवले, ही घटना कुठल्याही चमत्काराशिवाय कमी नव्हती. इतकेच नाही तर या चित्रपटाचा आणि गांधीजींच्या रामभक्तीचा जवळचा संबंध आहे, त्याविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गांधीजींचा पहिला हिंदी सिनेमा

प्रकाश मकदूम यांनी ‘द महात्मा ऑन सेल्युलॉइड: अ सिनेमॅटिक बायोग्राफी, २०२२’ या पुस्तकात नमूद केले आहे की, १९४४ साली महात्मा गांधी यांनी पहिला हिंदी सिनेमा पाहिला. या सिनेमाचे नाव होते ‘राम राज्य’. राम राज्य हा एकमेव हिंदी सिनेमा गांधीजींनी पाहिला, असे इतिहासकार मानतात. विजय भट्ट हे या सिनेमाचे निर्माते होते. शोभना समर्थ आणि प्रेम आदिब मुख्य भूमिकेत होते. बापूंनी यापूर्वी फक्त ‘मिशन टू मॉस्को’ हा इंग्रजी चित्रपट पाहिला होता. अगदीच महात्मा गांधी हे चित्रपटशौकीन नव्हते परंतु ‘रामराज्य’ त्यांच्यासाठी अपवाद ठरला.

अधिक वाचा: केकचा शोध कोणी लावला; हे कसे घडले?

गांधीजी आणि विजय भट्ट यांची भेट

जान्हवी भट्ट (विजय भट्ट यांची नाथ) यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये २०१९ मध्ये लिहिलेल्या लेखात गांधीजी आणि विजय यांच्या भेटीचे सविस्तर वर्णन केलेले आहे. विजय भट्ट हे १९३० च्या उत्तरार्धात त्यांच्या मित्रांसह वलसाडला सहलीसाठी गेले होते, तिथे त्यांनी गांधीजींची पहिली भेट घेतली. या भेटी दरम्यान गांधीजींना ज्या वेळेस कळले की, भट्ट हे चित्रपट निर्माते आहेत, त्यावेळी त्यांनी “तुम्ही नरसी मेहता यांच्यावर चित्रपट का करत नाही?” असा प्रश्न केला. नरसी मेहता हे गुजरातचे संत कवी होते. “वैष्णव जन तो तेणे रे कहिये जे…” हे त्यांनी रचलेले भजन गांधीजींचे आवडते होते. यानंतर विजय भट्ट यांनी लगेचच गांधीजींनी सुचविलेल्या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली.

गांधीभेटीची परिणती म्हणून १९४० साली त्यांनी नरसी मेहता हा चित्रपट प्रदर्शित केला. गुजराती आणि हिंदीत असलेला हा चित्रपट भारतभर गाजला. या सिनेमात मुख्य भूमिकेत विष्णुपंत पागनीस आणि दुर्गा खोटे होते. परंतु विजय भट्ट यांना हा सिनेमा महात्मा गांधीजींना दाखवता न आल्याने त्यांच्या मनात याची खंत होती. म्हणूनच १९४३ साली त्यांनीच निर्मिती आणि दिग्दर्शन केलेला ‘राम राज्य’ हा चित्रपट गांधीजींना दाखविण्याचे ठरविले. १९४४ साली गांधीजी शांतीकुमार मोरारजी यांच्या जुहू येथील बंगल्यावर उपचार घेत होते. या कालखंडात भट्ट हे गांधीजींची भेट घेण्यास गेले. गांधीजींच्या सचिव सुशीला नायर यांनी विजय भट्ट यांना चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी फक्त ४० मिनिटे दिली होती. चित्रपट सुरु झाल्यावर गांधीजी चित्रपट पाहण्यात तल्लीन झाले, त्यामुळे ४० मिनिटाची कधी ९० मिनिटे झाली हे कळलेही नाही.

मकदूम यांनी नमूद केल्याप्रमाणे मूळ चित्रपट १४४ मिनिटाचा होता. तो दिवस गांधीजींच्या मौनाचा होता, त्यामुळे चित्रपट नेमका कसा होता, त्यांना त्याबद्दल नेमके काय वाटले याचे त्यांनी शब्दात वर्णन केले नाही. पण त्यांनी शेवटी भट्ट यांच्या पाठीवर कौतुकाची शाबासकी दिली. ही कौतुकाची थाप भट्ट यांच्यासाठी, त्यांच्या आयुष्यातील सर्वात महान क्षणांपैकी एक असल्याचे त्यांच्याकडून अनेकदा नमूद करण्यात आले होते.

राम राज्य एक अभिजात सिनेमा

रामराज्य हा एक अभिजात सिनेमा म्हणून ओळखला जातो. कारण आशय आणि सादरीकरणाच्या बाबतीत हा चित्रपटकाळाच्या खूप पुढे होता. या सिनेमाचा मूळ ढाँचा हा मेलोड्रामा किंवा चमत्कारांवर अवलंबून नव्हता. विजय भट्ट यांनी रामाला एक आदर्श मुलगा, भाऊ, पती आणि राजकारणी म्हणून चित्रित केले. कर्तव्याची भावना आणि वैयक्तिक आनंद यांच्यामध्ये ग्रासलेल्या माणसाच्या आंतरिक गोंधळावर लक्ष केंद्रित करून त्याला मार्गदर्शक ठरेल अशाप्रकारे सिनेमाची निर्मिती केली. इतकेच नाही तर या चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान त्यांनीही नीतिनियमांना विशेष प्राधान्य दिले. प्रेम आदिब आणि शोभना समर्थ या दोघांनी भट्ट यांच्या सूचनेनुसार धूम्रपान आणि मद्यपान थांबवण्यास सहमती दर्शविली.

अधिक वाचा: स्त्रियांचे अश्रू पुरुषांमधील आक्रमकता खरंच कमी करतात? काय सांगते नवीन वैज्ञानिक संशोधन…

प्रेक्षकांचा प्रतिसाद

राम राज्य हा सिनेमा १०० दिवसांहून अधिक काळ चालला. या चित्रपटाच्या कलाकारांचा आणि निर्मिती सदस्यांचा भारतभर सत्कार करण्यात आला. प्रेक्षक तर पडद्यासमोर श्रीफळ व आरती घेऊन बसत होते. प्रत्यक्ष रामाचे दर्शन होणार अशीच भावना प्रेक्षकांमध्ये होती. या चित्रपटाने भट्ट यांना व्यावसायिक यश आणि समीक्षकांची प्रशंसा मिळवून दिली. भट्ट यांनी ५ मे १९४७ रोजी न्यूयॉर्क शहरातील प्रतिष्ठित ‘म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये (मोमा) रामराज्य या सिनेमाचा प्रीमियर केला. प्रीमियरनंतर पत्रकार परिषदेत एका तरुण अमेरिकन महिलेने विजय भट्ट यांना विचारले की रामाने अग्निपरीक्षेनंतर सीतेचा त्याग का केला?, भट्ट यांनी उत्तर दिले, “आमच्या संस्कृतींमध्ये हाच फरक आहे. पश्चिमेकडे, ग्रेट ब्रिटनमध्ये एका राजाने ज्या स्त्रीशी लग्न केले होते, तिच्यासाठी त्याचे राज्य सोडले. इथे रामाने आपल्या प्रजेसाठी आपल्या पत्नीला सोडले, त्याचे तिच्यावर खूप प्रेम होते, तरीही प्रजेसाठी नंतरचे जीवन ते एकांतवासात जगले.” एकूणच या सिनेमातून भारतीय संस्कृती आणि नीतिमूल्ये रुजविण्याचा प्रयत्न भट्ट यांनी केला होता.

गांधीजींनी पाहिलेला पहिला सिनेमा

राम राज्य हा गांधीजींनी पाहिलेला पहिला हिंदी सिनेमा असला तरी एकूणच त्यांच्या आयुष्यातला पहिला सिनेमा नव्हता, गांधीजींच्या आयुष्यातील पहिला सिनेमा ‘मिशन टू मास्को’ हा होता. हा त्यांनी राम राज्य पाहण्याच्या काही दिवस आधीच पाहिला होता. हा सिनेमा त्यांनी उद्योगपती शांतीकुमार मोरारजी यांच्या आग्रहास्तव पाहिला होता, ज्यावेळेस मोरारजी यांनी हा सिनेमा कसा वाटला हे विचारले त्यावेळी गांधीजी म्हणाले, ‘मला आवडला नाही’. मकदूम यांनी नमूद केल्याप्रमाणे मूलतः गांधीजींना त्या सिनेमात दाखविलेला बॉलरूम डान्स आवडला नव्हता, शिवाय त्या चित्रपटात दर्शविण्यात आलेली स्त्रियांची वेशभूषा त्यांना योग्य वाटली नव्हती. मात्र राम राज्य हा गांधींजींच्या भावनिकदृष्ट्या जवळचा विषय होता म्हणूनच चित्रपट संपल्यानंतर भट्ट यांना पाठीवर कौतुकाची थाप मिळाली!

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What exactly is the connection between mahatma gandhis first hindi film and ram svs