भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला मॉरिशसमधील आगालेगा बेटावर हवाई तळाचे उद्घाटन केले. हा हवाई तळ भारताच्या मदतीने तयार करण्यात आला असून, तो भारताच्या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याद्वारे भारताला आता पश्चिम हिंद महासागरात आपली उपस्थिती सुनिश्चित करण्यास आणि चीनच्या विस्तारवादी धोरणाला शह देण्यास मदत होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा हवाई तळ ज्या बेटावर तयार करण्यात आली आहे, ते आगालेगा बेट मॉरिशसपासून ११०० किलोमीटर, तर मालदीवपासून २,५०० किलोमीटर दूर आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत भारत या बेटावर आपले लष्करी तळ उभारत असल्याचे वृत्त येत होते. मात्र, हे लष्करी तळ नसून, या ठिकाणी भारताच्या मदतीने हवाई तळ आणि इतर विकास प्रकल्प तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनीही या वृत्ताचे खंडन करत, यात काहीही तथ्य नसल्याचे म्हटले होते.

भारतानेही आगालेगा बेटावरील प्रकल्प म्हणजे भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच मॉरिशस हा भारताच्या ‘सागर’ योजनेतील एक महत्त्वाचा भागीदार देश असल्याचेही भारताने म्हटले आहे. याशिवाय या प्रकल्पांमुळे दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वासही भारताकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, सामरिक आणि सैन्य सुरक्षेच्या दृष्टीने भारतासाठी ही हवाई तळ इतका महत्त्वाचा का आहे? त्यामुळे भारताला नेमका कसा फायदा होईल? याविषयी जाणून घेऊ या.

हेही वाचा – भारतीय नृत्य कलाकाराची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या; कोण होते अमरनाथ घोष?

सुरक्षेच्या दृष्टीने हा हवाई तळ महत्त्वाचा का?

सामरिकदृष्ट्या विचार केला तर आगालेगा बेट आणि येथील हवाई तळ रणनितीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्याद्वारे भारताला हिंद महासागरात आपली उपस्थिती मजबूत करण्यास मदत होईल. तसेच भारताला चीनच्या विस्तारवादी धोरणांतर्गत येणाऱ्या ‘स्ट्रिंग ऑफ पर्ल्स’ योजनेचा प्रतिकार करण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय आता भारतीय नौदलाला पी-८१आय सारखी विमानेदेखील या बेटावर उतरवता येतील. विशेष म्हणजे आता भारताला पश्चिम आणि दक्षिण हिंद महासागर, तसेच आफ्रिकेच्या पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीवरही लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे मागील काही महिन्यांपासून हौथींच्या (येमेनमधील बंडखोर चळवळीचा एक गट) हल्ल्यामुळे लाल समुद्र भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे लाल समुद्रातून जाणारी सागरी वाहतूक आता केप ऑप गुड होपमार्गे वळवण्यात आली आहे. अशावेळी आगालेगा बेट भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.

दुसरीकडे मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी या बेटावरील भारताच्या लष्करी तळासंदर्भातील वृत्ताचे खंडन केले असले तरी अशा बेटांवर लष्करी तळ उभारण्याची संकल्पना काही नवीन नाही. यापूर्वी अमेरिकेने चागोस द्वीपसमूहातील डिएगो गार्सिया या सर्वांत मोठ्या बेटावर लष्करी तळ उभारले आहेत. तसेच २०१७ मध्ये चीननेही जिबूतीमध्ये आपले लष्करी तळ उभारले होते.

हेही वाचा – विश्लेषण :भारतात प्रचंड प्रमाणात अमली पदार्थ का सापडताहेत?

भारत-मॉरिशस यांच्यातील लष्करी संबंध कसे?

भारत-मॉरिशस हे दोन्ही देश विविध क्षेत्रांत एकमेकांना सहकार्य करतात. लष्करी सहकार्याबाबत बोलायचे झाल्यास भारतातील काही संरक्षण अधिकारी हे मॉरिशसच्या संरक्षण दलात प्रतिनियुक्त केले जातात. परराष्ट्र मंत्रालयानुसार, भारतीय संरक्षण दलातील एकूण २० अधिकारी मॉरिशस संरक्षण दलात प्रतिनियुक्तीवर पाठविले जातात. त्यामध्ये नौदल, वायुदल व भूदल अधिकाऱ्यांचा समावेश शकतो. त्याशिवाय भारताने मॉरिशसला सहा हेलिकॉप्टर्स, पाच जहाजे, तीन विमाने आणि १० इंटरसेप्टर बोटीदेखील दिल्या आहेत. तसेच भारताने मॉरिशसला कोस्टल सर्व्हिलन्स रडार सिस्टीम उभारण्यासही मदत केली आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये भारताने संरक्षण उपकरणांच्या खरेदीसाठी मॉरिशसला १०० दशलक्ष डॉलर्सची मदतही केली होती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is military significance of airstrip that india has developed in mauritius spb
Show comments