Indian Army jawan Dinesh Kumar killed in Pakistan shelling along LoC भारताच्या संरक्षण दलांनी बुधवारी पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या अंतर्गत भारताने पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (POJK) आणि पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमीपर्यंत कारवाई करत तब्बल नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर (एलओसी) सीमापार गोळीबार सुरू केला. भारतीय लष्कराचा एक जवान यात शहीद झाले आहेत.
हरियाणातील पलवल जिल्ह्यातील ३२ वर्षीय सैनिक लान्स नाईक दिनेश कुमार हे जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात तैनात होते. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत होते. मात्र, बुधवारी पाकिस्तानवर झालेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या गोळीबाराची तीव्रता वाढली. लान्स नाईक दिनेश कुमार कोण होते? पूंछमध्ये नक्की काय घडले? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

लान्स नाईक दिनेश कुमार कोण होते?

हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावातील रहिवासी असलेले दिनेश कुमार २०१४ मध्ये भारतीय सैन्यात सामील झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना लान्स नाईक पदावर बढती मिळाली होती. त्यानंतर ते जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात तैनात होते, अशी माहिती त्यांचे वडील दया राम शर्मा यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. त्यांच्या वडिलांनी सांगितले की, सकाळी त्यांच्या कुटुंबाला ही दुःखद बातमी मिळाली. ते म्हणाले, “आम्हाला कळवण्यात आले की, दिनेश इतर चार सैनिकांसह नियंत्रण रेषेवर (एलओसी) गस्त घालत होते आणि सीमेवर तोफगोळ्याचा मारा करण्यात आल्याने त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे आणि त्याचे बलिदान स्मरणात राहील. तो एक शूर सैनिक होता,” असे त्यांचे वडील म्हणाले. दिनेश कुमार हे कुटुंबातील पाच भावांपैकी सर्वात मोठे होते. त्यांचे दोन धाकटे भाऊ आधीच सैन्यात कार्यरत आहेत.

“त्याचे दोन धाकटे भाऊ कपिल आणि हरदूत, यांची ‘अग्निवीर’ म्हणून भरती झाले आहे. त्यांचा दुसरा धाकटा भाऊ पुष्पेंदर विद्यार्थी आहे आणि आणखी एक भाऊ विष्णू शेतकरी आहे. दिनेशची पत्नी सीमा वकील आहे आणि या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे,” असे गावातील सरपंच भूप राम यांनी ‘आउटलेट’ला सांगितले. ते म्हणाले, “दिनेश लहानपणापासूनच सैन्यात सामील होऊ इच्छित होता. संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे.” दिनेश कुमार यांच्या वडिलांनी असेही म्हटले आहे की, ते भविष्यात दिनेश यांच्या मुलाला त्याच्या वडिलांचा वारसा पुढे नेण्यासाठी सैन्यात भरती होऊ देतील.

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले, “देशातील प्रत्येक नागरिकाला तुमच्या शहीदत्वाचा अभिमान आहे. हा देश तुमचे बलिदान कधीही विसरणार नाही. या शहीदत्वाला मी सलाम करतो.” रोहतकचे खासदार दीपेंदर हुडा यांनीही कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आणि म्हटले, “मी शहीदत्वाला सलाम करतो आणि दुःखाच्या वेळी शोकग्रस्त कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो.”

नियंत्रण रेषेजवळ नक्की घडतंय तरी काय?

जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैन्याने विनाकारण गोळीबार केला आहे. भारतीय सैन्याने एका निवेदनात म्हटले की, ७ व ८ मे २०२५ च्या रात्री, जम्मू आणि काश्मीरमधील कूपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूर भागांत नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने लहान शस्त्रे आणि तोफखान्यांचा वापर करून विनाकारण गोळीबार केला. या हल्ल्याला भारतीय सैन्याने योग्य प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आल्याचा सलग १४ वा दिवस होता. पुंछ जिल्ह्यात या हल्ल्याचे सर्वाधिक नुकसान झाले. या भागात पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेल्या गोळीबारात बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला, ज्यात चार लहान मुलांचाही समावेश आहे; तर जवळपास ४० लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

गावातील काही रहिवाशांनी या भयानक घटनेचे वर्णन केले आहे. “अचानक सीमेपलीकडून गोळीबार सुरू झाला. या भागातील लोकांसाठी ती रात्र भयानक होती,” असे अब्दुल हुसेन यांनी ७ मे रोजी ‘एएनआय’ला सांगितले. “सरकारने वचन दिलेल्या बंकरपैकी तीस टक्के पूर्णपणे बांधले गेले आहेत, मात्र उर्वरित अद्याप बांधलेले नाहीत,” असेही ते म्हणाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका महिलेने सांगितले, “पहाटेच्या वेळी अचानक गोळीबार झाला. त्यात आमच्या घराचे खूप नुकसान झाले. आता आम्ही कुठे जाणार हे आम्हाला माहीत नाही.” या गोळीबारात जवळच्या गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ ही मोहीम सुरू केल्यानंतर एका दिवसातच पाकिस्तानने सीमारेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केला. भारताकडून ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (पीओजेके) मध्ये असलेल्या नऊ दहशतवादी तळांवर २४ क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. ही सर्व दहशतवादी तळे लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद (जेईएम) आणि हिजबुल मुजाहिद्दीन (एचएम) यांचे केंद्र होते, असे भारताने सांगितले. या कारवाईविषयी सांगताना संरक्षण मंत्रालयाने म्हटले की, आमच्याकडून कोणत्याही पाकिस्तानी लष्करी सुविधांना लक्ष्य करण्यात आले नाही. लक्ष्यांची निवड आणि अंमलबजावणीच्या पद्धतीमध्ये भारताने बराच संयम दाखवला आहे,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who was the indian army jawan killed in pakistan shelling along loc rac