महापूराने हरवलेलं कोल्हापूरचं वैभव पुन्हा निर्माण करण्यासाठी सगळयांनी मिळून प्रयत्न करुया, शासन, समाज आणि गणेशोत्सव मंडळानीही याकामी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांसाठी भरीव कार्य करुया, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे बोलतांना केले.
कोल्हापूर पोलीस दलाच्यावतीने येथील केशवराव भोसले नाटयगृहात आयोजित केलेल्या गणराया ॲवॉर्ड वितरण सोहळयाप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. समारंभास श्रीमंत शाहु महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची  प्रमुख उपस्थिती होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदाच्या भीषण महापूराच्या काळात शासन, प्रशासनाबरोबरच संपूर्ण कोल्हापूरकरांनी तसेच विविध सेवाभावी, स्वयंसेवी संस्थासोबत विविध गणेश मंडळानी पूरग्रस्तांसाठी बचाव आणि  मदत कार्यात फार मोठे योगदान दिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, महापूराच्या काळात सर्वांच्या सक्रीय योगदानामुळे जीवीतहानी टाळता आली, तसेच सर्वच पूरग्रस्तांना वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणे शक्य झाले, हेही तितकेच महत्वाचे आहे. यापुढे पूरग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी शासन कटिबध्द आहेच, मात्र शासनाबरोबरच संपूर्ण कोल्हापूरकरांनी पूरग्रस्तांना पुन्हा उभं करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेच आहे. याकामी गणेशोत्सव मंडळानीही सक्रीय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि अतिशय साधेपणाने साजरा करुया, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पूरग्रस्तांना येत्या वर्षभरात सगळयांनी मिळून जेवढी मदत करता येईल, तेवढी करुया, पूरग्रस्तांना शासन आणि लोकसभागातून पुन्हा गतवैभव मिळवून देऊया, पुरग्रस्तांना रोजगार मिळवून देण्याकामीही गणेश मंडळानी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव झाल्यानंतर लगेचच गणेश मंडळासाठी गणराया ॲवॉर्डचे वितरण करावे, तसेच बक्षिसाच्या रक्कमेतही वाढ केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

पूरग्रस्तांना शासनस्तरावरुन जी जी मदत करावी लागेल ती केली जाईल, असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, पूरग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून पूरग्रस्तांसाठी सर्वती मदत करण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. पूरग्रस्त शेतमजुरांना रोजगार देण्यासाठी गावातच विविध प्रकारची कामे निर्माण करुन त्यांना आगामी तीन महिन्यासाठी रोजगार हमीच्या कामानुसार मजुरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचेही ते म्हणाले.

याप्रसंगी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले की, पूरग्रस्तांसाठी कोल्हापूरकरांनी बचाव व मदत कार्यात घेतलेला पुढाकार महत्वाचा असून संकटकाळी धाऊन जाण्याचे काम जगात आदर्शावतच आहे. पूरग्रस्त भागासाठी विशेष मास्टर प्लॅन तयार करुन मदत कार्याने  व पुनर्वसनाचे काम व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur flood ganpati utsav 2019 chandrakant patil nck