कोल्हापूर: दहा दिवस झोडपून काढलेल्या पावसाने बुधवारी कोल्हापूर जिल्ह्यात विश्रांती घेतली. अजूनही जिल्ह्यातील १३ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी २० मिमी पावसाची नोंद झाली असून, गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ८२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, संभाव्य पूर परिस्थितीची शक्यता गृहीत धरून ८१ कुटुंबीयांना आज सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना आज महापालिका प्रशासनाने परिसरात जाऊन केल्या. साधारणत: ३० कुटुंबे परगावी स्थलांतरित झाली असून उर्वरित कुटुंबे दोन दिवसांत स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.
काल हवामान विभागाने जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता. रात्री काही भागांत मुसळधार पाऊस झाला. आज पावसाने उसंत घेतली. सकाळपासून सूर्यदर्शन राहिले. येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाने धरणे आणि नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राधानगरी धरण ५० टक्के, तुळशी धरण ५२ टक्के भरले आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बुधवारी बापट कॅम्प, कदमवाडी, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, इंद्रजीत कॉलनी .परिसरातील ३७ मिळकतींना नोटीस बजावली आहे. भूखंड नियंत्रित सतर्कता क्षेत्रामध्ये बांधकाम असल्याने प्रति १० चौ. मी. क्षेत्राकरिता १ लाइफ जॅकेट, २० हून अधिक सदनिका असणाऱ्या इमारतीस रेस्क्यू बोट, इमर्जन्सी लाइट इत्यादि सुविधा कार्यान्वित कराव्यात; अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे त्यांना कळवण्यात आले आहे.
कोल्हापुरात ३० कुटुंबांचे स्थलांतर
संभाव्य पूर परिस्थितीची शक्यता गृहीत धरून तावडे हॉटेल परिसरात फिरस्ते ८१ कुटुंबीयांना आज सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना आज महापालिका प्रशासनाने परिसरात जाऊन केल्या. साधारणत: ३० कुटुंबे स्थलांतरित झाली असून, उर्वरित कुटुंबे दोन दिवसांत स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.